'स्लमडॉग मिलेनियर' हा चित्रपट भारतीयांनी बघितला. त्याला ऑस्कर मिळाले. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून. तसेच 'जय हो' या गाण्याला ही पुरस्कार मिळालेत. या चित्रपटात एका दृष्टीकोनातून बघितल्यास असे वाटते की, यात भारतातील सत्य पण वाईट गोष्टी म्हणजे झोपडपट्टी, गरिबी, दंगे, बाल गुन्हेगारी असे प्रकार दाखवलेत. या पूर्वी लगान ऑस्कर मध्ये जावूनही त्याला पुरस्कार मिळाला नाही कारण त्यात इंग्रज लोकांविरुद्ध आपण जिंकतो असे दाखवले आहे. लगान हा सगळ्याच बाबतीत 'स्लमडॉग मिलेनियर' पेक्षा सरस होता. या चित्रपटामुळे भारतात फक्त गरिबी, घाण, गुन्हेगारी हेच फक्त आहे असा गैरसमज होण्याची शक्यता आहे वगैरे.

दुसर्‍या वेगळ्या द्रूष्टीकोनातून बघितले असता असे दिसून येते की, या चित्रपटात कोठेही भारतातले राजकारण, झोपडपट्टीमागची कारणं वगैरे अशा गोष्टींवर भाष्य केलेले नाही. उलट प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एक झोपडीतला मुलगा आपल्या अनुभवांच्या जोरावर 'कौन बनेगा करोडपती' मधल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर देतो, अशी सकारात्मक प्रभाव पाडणारी कथा आहे. तसेच 'जय हो' हे गाणे खरोखरीच ऑस्करच्या लायकीचेच आहे, यात दुमत व वाद नाहीच. खरे तर, ब्रिटिश दिग्दर्शक असल्यामुळे त्याने यात मुद्दामहून गरिबी दाखवली आहे असे म्हणणे चूक ठरेल कारण, विकास स्वरूप नावाच्या भारतीय लेखकाच्या कादंबरीवर ही कथा आधारली आहे.

आणि काय फक्त ब्रिटिश लोकच फक्त आपल्याच देशावर असे गरिबी दर्शवणारे चित्रपट बनवतात असे थोडेच आहे? आपण तर सतत आपल्या भारतीय चित्रपटांमध्ये व पुस्तकांमध्ये पाश्चिमात्य देशांच्या मुक्त सेक्स वर भाष्य करत असतो. ते कसे चांगले नाहीत आणि आपण भारतीय लोकांचीच संस्कृती कशी चांगली आहे हेच दाखवत असतो. (उदा: नमस्ते लंडन, परदेस, पूरब और पश्चिम वगैरे) .काही वेळेस अशा चित्रपटांत अतिशयोक्तीच जास्त असते. पण त्यावर ते कधी आक्षेप घेत नाहीत. अशा भारतीय चित्रपटांत सुद्धा ब्रिटीश लोक अभिनेते असतातच. खरे तर, जे आपल्याजवळ नसते (किंवा जे आपल्या देशात नाही) त्याबद्दल आपल्याला जास्त आकर्षण असते. मग ब्रिटीश अमेरिकनांना आपल्या भारतात जास्त प्रमाणात असलेल्या गरिबीबद्दल आकर्षण, कुतुहल वाटणे स्वाभाविक आहे. उलट आपणच भरपूर चित्रपटांद्वारे पाश्चिमात्य देशांना (मुक्त सेक्स या एकाच मुद्द्यावर) बदनाम करून ठेवले आहे. त्या देशांच्या बाकीच्या अनेक चांगल्या गोष्टींना मात्र दृष्टिआड केलेले आहे.

जसे इतर देश अजूनही समजतात की भारत हा गारुडी, जंगल, साधू यांनी भरलेला देश आहे तसेच आपणही पाश्चिमात्य देशांच्या एकाच गोष्टिंवर भाष्य करतो, नजर ठेवून असतो ते म्हणजे तिथला मुक्त सेक्स व ढासळलेली कुटूंबव्यवस्था. कधीकधी अनुकरणही करतो. पण त्यामागचे कारण शोधत नाहीत. म्हणजे, तेथे प्रत्येक जण आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आहे. जबरदस्तीने लादलेले नातेसंबंध नाहीत. दोष हे प्रत्येक देशात आहेत. कोणताही देश परिपूर्ण नाही. आपल्या भारतीय संस्कृतीचे जसे गुण आहेत तसे दोषही आहेत. नातेसंबंधांचा अति बाऊ केला जातो. त्यामुळे कधी कधी व्यक्तिविकासाला वाव राहात नाही. मुलांची नोकरी मिळेपर्यंत पालकांवर अवलंबून राहाण्याही प्रवृत्ती आहे. इतर देशात ते लवकरच कमावू लागतात. आपले कडे भरमसाठ लोकसंख्या आहे. त्यमुळे बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आहे. फक्त एकदाच जेव्हा या देशातला प्रत्येकजण लोकसंख्या वाढीबाबत गंभीरतेने विचार करू लागेल, तेव्हाच आणि फक्त तेव्हाच आपल्या भारताचा खरा विकास व्हायला सुरु होईल. अन्यथा भारत महासत्तेकडे कधीच वाटचाल करु शकणार नाही.

तेव्हा थोडक्यात सांगायचे झाले तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायलाच हवे. मग ते एकमेकांच्या देशांवर चित्रपटांतून भाष्य करणारे असो की दुसरे कुठले!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel