हे जग निसर्गनियमानुसार चालते. म्हणजे जे पेरले ते उगवते. तसेच पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते. त्या नियमानुसार कोणतीही गोष्ट करण्यासाठी कधीही वेळ "निघून गेलेली" नसते. वेळ/काळ परत परत येत राहतो. जीवन आपल्याला पुन्हा पुन्हा संधी देत असते. ती आपल्याला फक्त दिसली पाहिजे. जीवनाकडे सकारात्मक दृष्ट्या पाहिल्यास काहीही अशक्य नसते. प्रयत्न करीत राहावे आणि फळ निसर्गावर सोडून द्यावे. चांगल्या गोष्टी पेरत जाव्या. निसर्ग नियमानुसार फळ मिळतेच. चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळते आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते. चांगले कर्म करा आणि चांगल्या फळाची अपेक्षा जरूर करा. मात्र आपल्या कर्माचे आपण स्वत: मूल्यमापन करू नका. ते काम निसर्गावर सोपवा. कारण आपण चांगले आणि साधे आहोत, गर्विष्ठ नाही आहोत याचासुद्धा अनेकांना व्यर्थ गर्व असतो. आपण बोलतो, करतो तेच फक्त सत्य आणि योग्य असे समजू नका. सत्याचे मूल्यमापन स्वत: करू नका. सत्याला नेहेमी तीन बाजू असतात. एक स्वत:ची, दुसरी इतरांची आणि तिसरी म्हणजे खरे सत्य जे निसर्ग ठरवतो. तसेच कुणाचीही सतत आणि विनाकारण निंदा, द्वेष, तुलना, निर्भत्सना करू नका कारण कुणीही परिपूर्ण नसतो. कारण या जगातला प्रत्येक मानव हा निसर्गाची निर्मिती असतो आणि आणि तो एकमेव असतो. कोणतेही दोन व्यक्ती एकसारखे नसतात. त्यामुळे कुणाही दोन व्यक्तींमध्ये तुलना करू नका. कारण आवडता आणि नावडता व्यक्ती अशी तुलना केल्यास आवडत्या व्यक्तीचे दोष आपल्याला गुण वाटतात आणि नावडत्या व्यक्तीचे गुण आपल्याला दिसतच नाहीत. तसेच स्वत:ची इतरांशी तुलना करू नका. त्यापेक्षा "पूर्वीचा स्वत: आणि आजचा स्वत:" यात तुलना करा. एखाद्यातले चांगले गुण शोधून ते गुण वाढवण्यासाठी त्याला प्रेरणा द्या. प्रेरणेचे आणि कौतुकाचे दोन शब्द सुद्धा एखाद्याच्या जीवनात अभूतपूर्व बदल घडवू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या आवडीनिवडी आणि श्रद्धेला नावे ठेवू नका. एखाद्याच्या आशेच्या आणि स्वप्नांच्या दिव्याला विझवू नका. आजच्या धकाधकीच्या जीवनात इतरांना इतके प्रेम, प्रशंसा, कौतुक, आधार द्या की द्वेष, निंदा, शत्रुत्व याला वेळ मिळणार नाही. आपण आधी स्वत:वर प्रेम करायला शिका, स्वत:चे मन आणि शरीर निरोगी ठेवा मग तुम्ही इतरांवर प्रेम करायला शिकाल. एखाद्या घटनेवर किंवा कुणी काही बोलल्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो ते आपले कर्म. पण जर कुणी मुद्दामहून आपल्याला डिवचत असेल, आपल्याला कुणी धोका दिला असेल तर त्याला एकदा माफ जरूर करा आणि विसरून जा. पण त्यानंतरसुद्धा पुन्हा तेच घडल्यास पुन्हा माफ करू नका. नेहेमी सगळ्यांना मदत करा आणि विसरून जा. त्याची परतफेड व्हावी अशी अपेक्षा करू नका पण ज्याला मदत केली त्याला त्याची किंमत आणि जाणीव नसेल तर कृपया पुन्हा मदत करू नका. त्याला योग्य ती जागा जरूर दाखवा. भिडस्त बनू नका. उफाळून स्फोट होईपर्यंत कुणाकडून दबले जावू नका. मग तो कुणीही असो कारण अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्या इतकाच दोषी असतो. हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग सुद्धा त्याचेवर अन्याय करणाऱ्या मानवाला त्याची जागा दाखवतोच. तसेच जगातले लोक हीच आपली संपत्ती. या जगातला आपल्या संपर्कात येणारा प्रत्येक माणूस हा आपल्यासाठी महत्वाचा असतो, कुणीही कमी किंवा जास्त नसतो. प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी शिकायचे असते. जसे निसर्गातले प्रत्येक झाड, कीटक प्राणी याच्या अस्तित्वाचा काहीतरी अर्थ असतो. जोडलेली माणसे ही आपली सर्वश्रेष्ठ संपत्ती. त्यांना टिकवून ठेवण्यासाठी एखादा गैरसमज झालाच तर पूर्वग्रहदुषित मनाने गैरसमज करण्याआधी समोरच्याचे म्हणणे पूर्ण आणि लक्ष देवून ऐकले पाहिजे. तसे न करता आपलेच म्हणणे सत्य आहे असे मानून आपलाच मुद्दा लावून धरणे योग्य नाही. गैरसमज हे दोन्ही बाजूंच्या मताला सारखेच व्यक्त करायला दिल्याने दूर होतात, आपलेच म्हणणे पुढे दामटण्याने नाही! या जगात प्रत्येकाला आपले स्वतंत्र मत असण्याचा अधिकार आहे. जे इतरांच्या मताचा आदर करत नाहीत ते एक प्रकारे निसर्गाला विरोध करत असतात कारण निसर्गाने प्रत्येकाला इतरांपेक्षा वेगळे बनवले आहे. ज्याचा मेंदू आणि हृदय यांची दारे नेहेमी बंदच असतात, त्याला कुणाचेच नवीन मत ऐकून घ्यायचे नसते तेव्हा त्याला कितीही समजावून सांगितले तरी उपयोग नाही आणि ज्याचा मेंदू आणि हृदय यांची दारे नेहेमी उघडे असतात त्याला फारसे समजावून सांगण्याची गरज पडत नाही.
माझे म्हणणे पटले तर तसे जरूर सांगा!
नाही पटले तरी हरकत नाही. कारण प्रत्येकाचे मत वेगळे असते, नाही का?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel