"सून-मुलगा अति नालायक-वाईट आणि आई-वडील-नणंद ही देवत्त्वापेक्षाही आदर्श माणसं" अशा धर्तीचे मराठी चित्रपट बंद होत आहेत, मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक प्रगल्भ होत आहेत असे वाटायला लागले असतांनाच ....
"स्वातंत्र्याची ऐशी तैशी" हा चित्रपट आला. अन वाटलं... कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहाणार. नाण्याच्या एकाच बाजू साठी बनवले जाणारे चित्रपट असतात. नाण्याला दुसरी बाजू असते हेच मुळी त्यांना मान्य नसतं.
मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक यांना पक्के माहिती आहे की, मराठी चित्रपट (बक्कळ पैसा मिळवून देणाऱ्या मल्टीप्लेक्स सह) चालण्याचे एकमेव हक्काचे ठीकाण- पुणे.
आणि पुणे येथे पेन्शनर वृद्ध वयस्कर मंडळी जास्त राहातात. मग त्यांच्या मनाला कॅश करुया. मग असे चित्रपट काढतात. पैसे कमावतात.
तरूण मंडळी इमाने इतबारे आपल्या आई वडीलांची सेवा करतात. यात वाद नाही. आदर्शपणाने नव्हे तर प्रॅक्टीकली!
शक्य होईल तसे ते आई-वडीलांची हौस मौज करतच असतात, गरजा पुरवतच असतात. कारण कोणतेच आई वडील सुद्धा आपल्या मुलांना आदर्शपणे वाढवत नाहीत. तेही प्रॅक्टीकली विचार करूनच शक्य तेवढे शिक्षणच मुलांना देतात. स्वतःसाठी काही राखून. मग इच्छा मारून मुलेही न आवडणारे शिक्षण पूर्ण करतातच की. आई-वडीलांखातर अनेक स्वप्नांवर पाणी सोडतातच की.
मग अशा सिनेमांमुळे तरुणांची गळचेपी, मुस्कटदाबी होते. उगाच असे आदर्शवादी चित्रपट बघण्यासाठी "मुला-सूनेवर" दबाव टाकला जातो. हे सत्य आहे. सगळीकडेच नसेल पण हे ९० टक्के सत्य आहे.
नुकतंच, सुलोचना दिदी म्हणाल्या होत्या की, प्रेक्षकांनी जास्तीत जास्त मराठी चित्रपट पाहिले पाहिजेत. पण, निर्माते-लेखक-दिग्दर्शक यांचेकडे असल्या "आगलाव्या" चित्रपटांशिवाय दुसरे काही दाखवायला नसेल तर माझ्यासारखे असंख्य त्रस्त प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवतीलच.
चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे कोणताच मुलगा-सून टोकाचे वाईट नसतातच. बहुतेक सासवा सुद्धा तश्या नसतात...
मात्र हुंड्यासाठी सुनेला जाळून मारणाऱ्या सासवा आजही आहेत. त्यांना कायदेशीर पणे अटकही होते असे दाखवणारे चित्रपट का बनवत नाहीत? अशा सासवा म्हणजे खुनीच की. पुरुष बिचारा एक खून केला की तुरुंगात खितपत पडतो. मात्र घराघरातींल अशा "दहशतवादी" बायकांचे काय करायचे?
सासू-सून वाद हे पिढीततले अंतर असल्याने आहे, हे समजू शकते, पण...
एकाच वयाचे, एकाच काळातले असूनही नणंद-भावजय एकमेकांना समजावून का घेऊ शकत नाही?
अशा दहशतवादाला खतपाणी घालणारे हे चित्रपट! बंद झाले पहीजेत असं मी म्हणत नाही, पण, कथा ही दोन्ही बाजू मांडणारी हवी.
महेश मांजरेकर नेहेमी हट के चित्रपट बनवतात. त्यांचे कडून एक तरी "मुलगा-सून" यांची बाजू मांडणारा चित्रपट पुढे येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
हिंदी चित्रपटही पूर्वी असे चित्रपट काढून वीट आणायचे (अवतार- राजेश खन्ना, आताशा अलेले उमीद, बाघबान)
काय वाटते आपल्याला? असले अतिशयोक्तीपूर्ण चित्रपटांची आवश्यकता आहे का?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel