“आम्ही ठाकरं ठाकरं, या रानाची पाखरं!
या जांभर्‍या गर्दीत, मांडुन इवले घर!”


हे मराठी गीत कोण बरे विसरेल?


पण आजची वेगवान प्रसारमाध्यमे, इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग साईटस यांच्या प्रचंड माहितीच्या भडिमाराच्या युगात तसेच कथित सोशलायझेशन च्या युगात हे गीत बदलून काहीसे असे म्हणावे लागेल  -


“आम्ही सोशल सोशल, या आंतरजालाची पाखरं!
या तंत्रज्ञान गर्दीत, मांडुन भावनांचा बाजारं!”


होय! वरील गाण्यात मी भावनांचा बाजार म्हटले आहे तर ती  नक्की अतिशयोक्ती ठरु नये अशी स्थिती सध्या आपल्याला सगळीकडे नक्कीच दिसते आहे. कारण आजकाल सगळेचजण कधी नव्हे एवढे सोशल झालेत! कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करतो यावर त्या तंत्रज्ञानाचे यश आणि अपयश अवलंबून असते आणि  सोशल नेटवर्किंग साईटसचा आणि एकूणच इंटरनेट आणि इतर प्रसारमाध्यमांचा वापर आज भावनांचा बाजार मांडण्यासाठीच होतोय. भले त्या भावना चांगल्या विधायक असोत किंवा विघातक! आणि विघातक कामांसाठी त्याचा होणारा जास्त उपयोग किंवा वापर हा त्याची एक मर्यादा किंवा लक्ष्मणरेखा पार करण्याआधी थांबायलाच हवा!


एखादी व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात पडल्यास त्याला वाचवणारे फार थोडे असतात पण त्या बुडून मरण पावणाऱ्या व्यक्तीचे व्हिडीओ शूटिंग करून एकमेकांना व्हाट्सअॅप सारख्या अप्लिकेशनद्वारे दुनियाभर शेअर करणारेच ढिगाने सापडतात. अशा प्रकारची “संवेदनाहीन माणूस” नावाची माणसाची (?) नवी जमात या तंत्रज्ञानामुळे तयार झाली आहे किंवा विकसित झाली आहे, हे नक्की! याचप्रमाणे अगदी खून, बलात्कार यांचे सुद्धा व्हिडीओ बनवून पाठवले जातात इतक्या खालच्या थराला या तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे.


मी यासंदर्भात एका मित्राकडे माझे मत व्यक्त केले ते असे की: असे खुनाचे, छिन्नविछिन्न देहांचे किंवा कुणीतरी नराधम शिक्षकाने पट्टीने कोवळया लहान मुलींना निष्ठूर पणे मारण्याचे किंवा दहा वीस जण मिळून एका असहाय्य माणसाचा दगडाने ठेचून खून करत आहेत किंवा लोकलखाली कुणीतरी जीव दिल्याचे असे सीसीटीव्ही मध्ये मिळालेले किंवा लोकांनी चित्रण केलेले खरे व्हिडीओ सहजपणे कोवळ्या वयात मुला मुलींच्या अचानक पाहण्यात आले तर काय परिणाम होईल त्यांच्या मनावर? कधी कुणी विचार केलाय? सोशल मीडियाच फक्त नव्हे तर आपली विविध न्यूज चॅनेल सुद्धा असे व्हिडीओ टीआरपी वाढवायला सर्रास दाखवत राहातात. एकदा दोनदा नव्हे तर दिवसभर त्याचे चर्वण करीतच बसतात.

तेव्हा तो मित्र म्हणाला की आजकाल कलियुगात काय घडेल सांगता येत नाही. त्यामुळे मुलामुलींना या जीवनाच्या काळ्याकुट्ट बाजूपासून किंवा गुन्हेगारी जगतापासून किंवा अपघातांच्या घटनांपासून अगदीच अलिप्त कसे ठेवता येईल? जगातली सत्यता येतेय तर येऊ देत त्यांचा डोळ्यासमोर! ते सावरतील. उलट त्यामुळे ते या काळ्या जगताशी सामना करण्यासाठी तयार राहातील. झाल्या तर झाल्या त्यांच्या संवेदना बोथट! काही इलाज नाही. आपण तरी कुठपर्यंत त्यांच्या बघण्यावर वॉच ठेऊ शकणार?

काही प्रमाणात त्याचा मुद्दा बरोबर असेलही पण मी त्याला एकच म्हणालो की आपल्यासोबत भविष्यात एखादी वाईट घटना घडेल की नाही हे आपण सांगू शकत नाही पण ती घटना कधीतरी घडू शकते म्हणून आधीच तश्या प्रकारच्या घटनांचे (आणि तेही खरे घडलेले किंवा लाईव्ह) व्हिडीओ पाहून त्याच्या कोवळ्या मनाच्या संवेदना बळजबरीने बोथट कशाला करायच्या? किंबहुना गुन्ह्यांचे व्हिडीओ बघून बघून अनेकांना (लहान मुलेच नव्हे तर प्रौढांना पण) गुन्ह्याची प्रेरणा मिळते असे अनेक गुन्हेगारांनी कबूल केल्याचे अनेकदा आपण ऐकले वाचले आहेच.


मी काही अगदी ७०/८० च्या दशकातल्या जुन्या पिढीसारखा बोलायला लागलोय असे नाही बरं का! सगळे नवे ते टाकाऊ आणि जुने ते सोने किंवा टिकाऊ अशा मताचा मी नक्कीच नाही! मी तुमच्यासारखाच आहे जो हे नवे तंत्रज्ञान समर्थपणे अगणित प्रकारच्या चांगल्या कामांसाठी वापरतोय!


पण समजा समोर कुणाचा तरी खून होतोय किंवा कुणाचा तरी एक्सीडेन्ट होऊन छिन्न विच्छिन्न झालेला देह समोर पडलाय आणि कुणीतरी बघा व्यक्ती चविष्टपणे त्याची व्हिडीओ शूटिंग करतोय आणि इतरांनाही ते शेअर करतोय आणि ते लोकही तो खून किंवा मृतदेह चविष्टपणे बघताय यापेक्षा जास्त मृत आणि हीन संवेदना आणखी दुसरीकडे  कुठे मिळेल? एकमेकाना अशा गोष्टी शेअर करणाऱ्या लोकांना हे समजत नाही की प्रत्यक्ष जीवन आणि चित्रपटातले तसले दृश्य यात फरक आहे! आजकालचे काही चित्रपट आणि टीव्हीवरील गुन्हेगारी सिरियल्स सुद्धा जास्तीत जास्त वास्तववादी बनण्याच्या प्रयत्नात विविध गुन्ह्यांचे चित्रण अधिकाधिक वास्तववादी पद्धतीने करत आहेत. त्यामुळे त्यांना जास्त प्रेक्षकवर्ग लाभतो, हे खरे असले तरी खरे तर हाच चिंतेचा विषय आहे! कोणत्या प्रकारचा प्रेक्षक वर्ग समाजात वाढतो आहे आणि अशा प्रेक्षकवर्गाची मानसिकता तरीही काय आहे हे नक्की तपासून पाहायला हवे! किंवा मग प्रेक्षकांना काय आवडते आणि काय नाही हे माध्यमेच स्वतः गृहीत धरून ठरवायला लागलेत? काही समजेनासे झाले आहे!


धोकेदायक आणि अनावश्यक ठिकाणी किंवा प्रसंगी सेल्फी काढणे आणि परिणामी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणे हा आणखी नवा ट्रेंड रुजू झालाय! आपल्या जीवनातल्या रोजच्या आणि दिवसभराच्या जास्तीत जास्त किंवा सगळ्याच घटना सेल्फीद्वारे कॅमेरात बंदिस्त ते सतत सोशल साईट्स वर अपलोड करून अनेक क्षेत्रातील सेलिब्रिटी मंडळी या ट्रेन्डला आणखी खतपाणी घालत आहेत. पण ते लोक सेलिब्रिटी आहेत, त्यांना प्रसिद्धीसाठी कदाचित एक प्रसंगी हे आवश्यक आहे असे मानले तरी सामान्य माणसानेही त्याचेच तंतोतंत अंधानुकरण करावे यासारखी दुसरी मूर्खपणाची गोष्ट नाही. हव्या त्या आणि नको त्या अवस्थेतले आणि कापड्यातले फोटो आजच्या काही (सगळ्या नाहीत!) मुली बिनधास्तपणे युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या साईट्स वर पुढच्या मागच्या परिणामांचा काहीएक विचार न करता बिनधास्त अपलोड करत आहेत. व्यक्तिस्वातंत्र्याचे आणि स्त्री स्वातंत्र्याचे आज कधी नव्हे एवढे प्राबल्य वाढले आहे आणि त्याचे अवास्तव आणि अनावश्यक स्तोम माजवले जात आहे.


सामाजिक दृष्ट्या विचार केल्यास धार्मिक तेढ वाढवणारे पोस्ट किंवा चित्रे किंवा चलचित्रे (व्हिडीओ) कुणीतरी मुदाम शेअर करतात किंवा अफवा पसरवतात. त्या जंगलातल्या वणव्यासारख्या पसरतात आणि समाजातल्या  निष्पाप नागरिकांना प्राणाला मुकावे लागते. राजकारणी लोक सुद्धा विरोधी पक्षांवर चिखलफेक करण्यासाठी किंवा त्यांचा बदला घेऊन नामोहरम करण्यासाठी सोशल माध्यमांचा चांगलाच (दुरु)उपयोग करून घेतात. बरेचदा यात सामान्य मतदाराला काय खरे आणि काय खोटे, कोण खरे आणि कोण खोटे, कोण चांगले आणि कोण वाईट हे ठरवणे कठीण होऊन जाते.


या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक वेसण किंवा कंट्रोल चे बटन असायला हवे असे मनाला वाटत राहाते.


चित्रपटांचा विचार केल्यास चित्रपटाला कंट्रोल बटन आहे ते सेन्सर किंवा सर्टिफिकेशन बोर्ड चे! पण आता त्यातही अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे, “चित्रपटांत काय दाखवायचे आणि प्रेक्षकांनी काय बघायचे ते त्यांचे त्यांना ठरवू द्या!” असा विचार मांडला जातो आहे. तेथेही आता कंट्रोल बटन नुसते नावापुरतेच आहे.


चित्रपटांची ही गात आहे तर मग सोशल मेडिया किंवा इंटरनेट यावर बंधन किंवा सेन्सॉर करणे तर खूपच अशक्य कोटीतले आहे असे वाटते. कारण या सगळ्या तथाकथित “सोशल" तंत्रज्ञानाचा आवाका तर एका देशापुरता मर्यादित नसून  जागतिक आहे आणि स्थळकाळानुसार आणि देशांनुसार पाप पुण्य, चांगले वाईट तसेच नीती अनीती यांच्या कल्पना बदलत जातात. एनक्रिप्शन मुळे सोशल चॅटिंग अँप्लिकेशनस तर अजून धोकेदायक बनत आहेत. दहशतवादी सहज एकमेकांना संदेश पोहोचवत आहेत. गोपनीयतेच्या दृष्टीकोनातून एनक्रिप्शन योग्यच आहे पण त्याचा वापर चुकीचे लोक करत आहेत.


विशिष्ट प्रकारच्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी आज या विविध प्रसार तंत्रज्ञानाचा उपयोग होतोय. आजकाल असे झालेय की वर्तमानपत्रातील किंवा सरकारी अधिकृत बातम्यांपेक्षा सोशल मीडियावरील लोकांनी लोकांसाठी टाकलेल्या अपडेट्स वर नेटकारांना जास्त विश्वास बसतोय.


या सगळ्या नकारात्मक बाजूंसाठी जास्त उपयोग झाल्याने सोशल मीडियाची जी चांगली बाजू आहे त्यावरचा लोकांचा विश्वास उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. किंबहुना त्याचा विधायक उपयोग काय आहे हेच कित्येकांना माहिती नाही. कारण त्याचा विधायक उपयोग करणारे कमी लोक आहेत किंवा ते इतरांना त्याचा उपयोग सांगत नसावेत!


आजकाल कोणतीही नवीन टेक्नॉलॉजी आली की त्याची माहिती लोकांना होण्याआधीच त्याबद्दलच्या निगेटिव्ह बाजू दर्शविणार्‍या बातम्या प्रसारमाध्यमांतून यायला सुरूवात होते. अगदी अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाले तर “पोकेमाॅन गो” हा गेम. तो गेम काय आहे हे भारतात सगळीकडे माहिती होण्याआधीच त्याबाबत नकारात्मक बातम्यांचा भडिमार सुरू झाला. पूर्वी याहू इमेल आणि याहू “निनावी" चाटिंग रूम्स जेव्हा नवीनच आल्या होत्या तेव्हा सुद्धा असेच झाले होते. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आली की एकतर प्रसारमाध्यमांतून फक्त त्याच्या निगेटिव्ह बाजूंकडेच फक्त लक्ष दिले जाते की नाहीतर मग लोक सर्वप्रथम त्याचा निगेटिव्ह वापर करायला लागतात? किंवा निगेटिव्ह गोष्टींसाठी तंत्रज्ञान वापरणारे लोक जास्त आहेत असे म्हणायचे का? यापैकी नेमके खरे काय ते शोधणे कठीण आहे!


आजकाल सगळे सोशल झालेत खरे पण तर आभासी जगात! पूर्वीसारख्या चावडीवरच्या गप्पा जेथे एकमेकांची चौकशी व्हायची आणि इकडच्या तिकडच्या खबरी समजायच्या त्याची जागा आता व्हाटस् अॅप आणि फेसबुक नावाच्या व्हर्च्युअल कट्ट्यानी घेतली आहे.


सोशल मिडीयाचा विधायक अगणित कामांसाठी उपयोग होतो. फक्त तो केला पाहिजे. उदाहरणार्थ -


  • स्कूल कॉलेज च्या विद्यार्थ्यांचा (शिक्षकांचा) अभ्यास करण्यासाठी  व्हाट्सअॅप ग्रुप
  • सारख्या विषयांची आवड असलेल्या लोकांचा ग्रुप
  • यु ट्यूब वर उपलब्ध असलेले जागतिक दर्जाचे असंख्य मोफत शैक्षणिक व्हिडीयोज
  • एका क्लिकवर जगभराची माहिती समोर हजार करणारा गुगल मित्र
  • जगातल्या प्रत्येक भाषेत आज आपण इंटरनेट वर युनिकोड पद्धतीने अगदी सहज लिहू शकतो.
  • लेखक, कवी आणि कलाकार यांना जागतिक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी मिळालेले जागतिक व्यासपीठ
  • मोबाईल, टॅब आणि लॅपटॉपवर वाचता येण्यासारखे ईबुक्स
  • या सगळ्यांमुळे होणारी कागदाची बचत
  • जगात कुठेही असले तरी एकमेकांशी ऑडीओ व्हिडिओ द्वारे आपल्याला इतरांशी संपर्कात ठेवणारी टेलिकॉम नावाची अभूतपूर्व महाक्रांती
  • रिमोट एज्युकेशन
  • फेसबुक मुळे आलेली जागतिक पातळीवरची मैत्री आणि मित्रशोध


जेवढे आणि जसे वापरात तसे हे उलगडत जाईल. उलगडत उलगडत ते संपणार नाही. कधीच नाही!


आणि मग ते गाणे बदलून जाईल -


 “आम्ही सोशल सोशल, या आंतरजालाची पाखरं!
या तंत्रज्ञान गर्दीत, मांडुन ज्ञानाचा बाजारं!”
“आम्ही सोशल सोशल सोशल,
या आंतरजालाची पाखरं पाखरं!


 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel