(हा लेख मी सोशल मिडीया वरून संकलित आणि संपादित केलेला आहे)

जगात वागावं कसं याची सध्या मला चिंता सतावतेय. मला सर्वांचंच म्हणणं पटतं.
आणि त्यामुळेच मी अडचणीत सापडलोय. तरी लोकांचे टोमणे काही थांबले नाहीत.
जगाचं असंच असतं!!
आता हेच बघा ना!

* मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही.

* श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबरचा धंदा करत असणार! त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं ? प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब राब राबतोय, पण झालो का श्रीमंत ? तो श्रीमंत झाला कारण निश्चीत बेईमानी केली असणार त्याने ! त्याशिवाय तो श्रीमंत होऊच शकणार नाही.

* पैशाच्या मागे दिवसरात्र धावू लागला की म्हणतात पैशाची हाव सुटली आहे. याला माणूसकी उरली नाही आहे.

* पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात, त्याच्या जीवनात महत्वाकांक्षा नाही. संसार आणि पोराबाळांची शिक्षणं कशी करणार देव जाणे? याला स्वतःचा संसार समजत नाही का?

* नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले तर कवडीचुंबक म्हणतात. दानशूर कर्णाची उदाहरणे दिली जातात.

* जीवनात चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच त्याला उधळ्या म्हणतात. भविष्यासाठी पैसा साठवून ठेवा म्हणतात.

* समजा वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही. लगेच त्याला म्हणणार, बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा! स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं का कधी आयुष्यात?

* आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात की, काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा ? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं?

* जास्त भाविक असला तर लोक म्हणतात मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव! अंगी माणूसकी पाहिजे, नुसती देवपूजा करून काय उपयोग?

* मंदीरात नाही गेला, देवपूजा नाही केली तर नास्तिक म्हणतात. देवधर्माचं थोडंतरी केलं पाहिजे असे म्हणतात.

* तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात, म्हणतात: अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता.

* दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक? कुठल्या चक्कीचा आटा खातोय कुणास ठाऊक?

* मनुष्य तब्येतीने बारीक असला तर काडी पहेलवान आणि एकपाचर्‍या म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात की तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं. बारिक माणसांची रोग प्रतिकार शक्ती कमी असते असे टोकले जाते. याची तब्येत काही सुधरत नाही, असे म्हणतात.

* मनुष्य तब्येतीने जाड असला की हत्ती म्हणतात. एवढी जाड तब्येत असली तर विविध रोग होतात असे म्हणतात. जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ जाड माणसांमुळेच पडतो असे टोकतात. त्याचे खाणे काढतात.

* परफेक्ट फीगर आणि सिक्स पॅक अॅब्ज असले तरीही काही ना काही टिका होतेच. आपल्याला थोडेच माॅडेलिंग करायचे आहे अशी टिका होते. जिम मध्ये जाऊन काय करणार, एवढी बाॅडी बनवून काय करणार, शेवटी मरायचेच आहे असे म्हणतात.

* पोट सुटले असेल तरीही नावे ठेवणार! पोट प्रमाणबद्ध असेल तरी म्हणणार की अरे थोडे पोट सुटले की ती सुखी संसाराची निशाणी असते. सपाट पोट ठेऊन आपल्याला कुठे मा‍ॅडेलिंग करायचं आहे?

* सहज कोणाला मदत केली तर म्हणतात यामागे काहीतरी हेतू असणार !

* नाही मदत केली तर म्हणणार, यांचेकडे साधी माणूसकी नाही!

* सरळ स्वभावाचा असेल, दानशुर असेल, सत्य बोलत असेल तर म्हणतात अंगात थोडातरी स्वार्थ हवा होता. भोळा सांब आहे, असे म्हणतात. "आलाय मोठा राजा हरिश्चंद्राचा अवतार!"अशी दूषणे दिली जातात.

* स्वार्थी असलाच तर म्हणतात सरळ स्वभाव हवा. दानशूर लोकांची उदाहरणे दिली जातात. म्हणतात की स्वार्थाचा पैसा काय कामाचा ? "माणसाने दानशुर कर्ण असले पाहिजे" अशी उदाहरणे दिली जातात. भले असे म्हणणारे लोक स्वतः मात्र गरिब भिकार्‍याला एक पैसासुद्धा देतात की नाही हा संशोधनाचा विषय ठरेल.

* खेळकर आणि गमतीदार स्वभाव असला तर म्हणतात हा आचरट आहे. याला परिस्थितीचं गांभीर्य नाही. दोन पोरांचा बाप झाला याला शोभतं का असं?

* गंभीर असणंही त्यांना रुचत नाही. म्हणतात, हसण्याची अलर्जी आहे. जीवन मस्त मजेत जगलं पाहिजे. हा फारच गंभीर असतो बुवा!

* तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते. म्हणतात, आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला, नाहीतर झाला नसता!

*अयशस्वी झालात तर म्हणणार आमचं ऐकलं नाही ना! मग भोगा आता आपल्या कर्माची फळं!

*अभ्यासात हुशार नसेल तर म्हणतात की याचे पुढे कसे होईल कुणास ठाऊक? याला आई वडील त्याच्यासाठी घेत असलेल्या कष्टांची जराही पर्वा नाही.

*चांगले मार्क पडले तर म्हणतात की या मार्कांचा शिक्षणाचा व्यवहारात काही उपयोग नाही. याचे कडे माणुसकी नाही. याने घोकमपट्टी केली असेल.

* सौंदर्य आणि देखणे व्यक्तिमत्व असले तर म्हणणार, नुसते देखणेपण काय कामाचे? बुद्धी तर हवी ना! सुंदर व्यक्तींना उगाचच शहानिशा न करता केवळ "सुंदर व्यक्ती आहे म्हणून निर्बुद्धच असेल" असे म्हणून हिणवले जाते.

* बुद्धी असली तर म्हणणार, नुसती बुद्धी असून काय उपयोग? थोडे सौंदर्य आणि देखणे व्यक्तिमत्व असायला हवे होते? त्याशिवाय काय उपयोग? पर्सनॅलिटी असायला हवी, नुसती हुशारी असून काय उपयोग?

अहो, लोकांचं काय घेऊन बसलात?

काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची लोकांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं?

लोक घोड्यावरही बसू देत नाहीत आणि पायीही चालू देत नाहीत.

जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं ?

मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय...


फिदीफिदी हसतील ते हसू देत की !
बोटं मोडीत बसतील ते बसू देत की !
आपण का शरमून जायचं ?
कशासाठी वरमून जायचं ?
कशासाठी भयाने ग्रासून जायचं ?
फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं ?
आपलं जीवन आपण ठरवायचं,
कसं जगायचं,
कण्हत कण्हत की गाणं म्हणत?
आपलं आपणच ठरवायचं......
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel