९५. वर एके ठिकाणीं उल्लेख आलाच आहे कीं, वृत्राला मारल्याचा, विश्वरूपाला मारल्याचा, यतींना कुत्र्यांना खाऊं घातल्याचा, अरूर्मघांना ठार मारल्याचा व बृहस्पतीवर प्रतिप्रहार केल्याचा असे देवांनी इंद्रावर पांच आरोप ठेवले.१  तैत्तिरीय संहितेचें आणि ऐतेरेयादिक ब्राम्हण ग्रंथांचें असें म्हणणें कीं, या पापांबद्दल इंद्राला प्रायश्चित्त घ्यावें लागलें. पण जो इंद्र आपल्याच बापाला पायाला धरून ठार मारतो, तो वृत्रादिक ब्राम्हणांना ठार मारल्याबद्दल प्रायश्चित्त घेईल, हें संभवतच नाहीं. “ मी यतींना कुत्र्यांना खावूं दिलें... आणि त्या बाबतींत माझा लोम देखील वांकला नांही... मातृवधानें, पितृवधानें, चोरीनें, भ्रूणहत्येनें देखील ( माझ्यासारख्या माणसाला ) पाप लागत नाहीं;  चेहर्‍याचा नूरहि पालटत नाहीं.”२  हें जें वाक्य कौषीतकी-उपनिषत्कारानें इंद्राच्या तोंडीं घातलें आहे, तेंच इंद्राच्या आचरणाला अधिक साजण्याजोगें वाटतें. पण त्यामुळें ब्राम्हणांकडे कमीपणा येतो. कारण ज्या इंद्रानें ब्रम्हहत्या केली, त्याचीच पूजा ब्राम्हणांनी करावी कशी ? ह्यासाठींच इंद्राच्या प्रायश्चित्ताची गोष्ट रचावी लागली.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ वि० १।३४ पहा.)
(२ यतीन्सालावृकेभ्यः प्रायच्छं... तस्य मे तत्र न लोम च नामीयते... न मातृवधेन न पितृवधेन न स्तेयेन न भ्रूणहत्यया नास्य पापं च चकृषो मुखान्नीलं वेत्तीति । [ कौषी० उ० ३।१] ).
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
९६. ब्राम्हणें व आरण्यकें यांच्या काळीं तर हा ब्राम्हणवर्गाचा प्रयत्‍न फारच वाढला. त्यामुळें सामान्य जनतेची हेळसांड झाली. जेथें निरूपाय असे तेथें क्षत्रियांशीं नमतें घ्यावें, व वैश्य आणि शूद्र या जातींना दाबून टाकावें, असा प्रयत्‍न ह्या वैदिक वाङ्मयांत सर्वत्र दिसून येतो. ह्यासंबंधीं प्रोफेसर वैजनाथ काशिनाथ राजवाडे ह्यांचा विविधज्ञानविस्तारांतील (नोव्हेंबर १९२७)
‘ ब्राम्हणकालीन जातिभेद ’ हा लेख मननीय आहे. प्रो० राजवाडे यांचा वैदिक वाङ्मयाचा व्यासंग दांडगा आहे, व त्यांचा निःपक्षपातीपणा आणि समतोलपणा सर्वत्र प्रसिद्ध आहे. तेव्हां त्यांच्या लेखांतील कांहीं उतारे येथें देणें योग्य वाटतें. ज्या वाचकांना मूळ लेख वाचणें शक्य असेल, त्यांनी तो अवश्य वाचावा.

९७. प्रो० राजवाडे म्हणतात, “ यज्ञक्रिया व पौरोहित्य हीं ब्राम्हणांकडेच रहावीं अशी सारखी खटपट.... ज्या राजापाशीं पुरोहित नसेल त्याचें अन्न देव खात नाहींत. तेव्हां यज्ञ करूं इच्छिणार्‍या राजानें कोण्या तरी ब्राम्हणाला पुरोहित करावें. पुरोहित संपादन केल्यानें स्वर्गास नेणारे अग्निच तो संपादन करतो. सर्व अग्नि तृप्त होऊन त्याला स्वर्गाला नेतात. त्याचें क्षात्रतेज, बल, वीर्य व राष्ट्र वाढतें. पुरोहित नसेल तर हें सर्व नष्ट होतें व त्याला स्वर्गांतून  हांकलून लावतात. पुरोहिताच्या वाणींत, पायांत, कातडींत, हृदयांत व आणखी एके ठिकाणीं असे पांच क्रोधाग्नि असतात. या बसा म्हणण्यानें, पाद्यानें, वस्त्रांनी व अलंकारांनी, धनानें व राजवाड्यांत ऐषआरामांत राहूं दिल्यानें हे अग्नि शांत होतात. ( शत० ब्रा० ३।२।४०-१ ) व त्याच्या राज्याला बळकटी येऊन सर्व त्याच्या ताब्यांत रहातात. ( ३।२।४०-२) [ पृष्ठ ४१०-११]

९८. “क्षत्रियाला ताब्यांत ठेवण्याकरतां आपण देव आहोंत असेंहि म्हणावयाला ब्राम्हण चुकले नाहींत. देव दोन प्रकारचे—एक ज्यांना आपण नेहमीं देव म्हणतों ते. पढित विद्वान् ब्राम्हण हे मनुष्यदेव. आहुतींनी देवांना खूष केलें पाहिजे, दक्षिणा देऊन मनुष्यदेवांचें समाधान केलें पाहिजे. दोन्हीं देव तृप्त होऊन यजमानाला सुस्थितींत ठेवतात. ( शत० ब्रा० २।२।२।६ ) व त्याला स्वर्गाला  पोंचवितात ( शत० ब्रा० ४।३।४।४ ) [ पृष्ठ ४१२ ]
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel