मग घरातल्या पडवीत बसूनच मुले खेळतात. पागोळ्या पडत असतात. त्यांच्याखाली मुले हात धरतात :

पाऊस पडतो             पागोळ्या पाणी गळे
माणीक दारीं खेळे             उषाताई

कोकणात कधी कधी सारखी आठवडा आठवडा संततधार लागते. सूर्यदर्शन होत नाही :

पाऊस पडतो             पडतो सारखा
सूर्य झालासे पारखा             चार दिवस

कधी कधी पर्जन्य येतो, त्या वेळेस विजांचा चमचमाट होतो. कडाड कडाड आवाज होतो. धरणीमायेचा पती पर्जन्य वाजतगाजत येतो :

झाडें झडाडती             विजा कडाडती
धरणी माये तुझा पति             येत आहे

लहान मुले असा कडकडाट व गडगडाट होऊ लागला म्हणजे भितात. आई त्यांना कुशीत घेऊन निजवते :

मेघ गरजतो             पाऊस वर्षतो
कुशींत निजतो                 तान्हेबाळ

पावसाळ्याचे असे मनोहर वर्णन आहे. तसेच थंडीचेही आहे. फार थंडी पडलेली असली म्हणजे फुलांच्या कळ्या नीट फुलत नाहीत. त्या आखडून जातात:

थंडी पडे भारी             फुलती ना कळ्या
आखडून गेल्या             झाडावर

थंडी इतकी पडली की पाणी अगदी गारगार झाले. आकाशातील तारेही थंडीने थरथरू लागले :

थंडी पडे भारी             तारे थरारती
करी तूं गुरंगुटी                 तान्हे बाळा

थंडी पडलेली असली म्हणजे ताटात किंवा शेगडीत निखारे घेऊन म्हातारी माणसे घरात शेकत बसतात :

थंडी आज भारी         ताटी निखारे भरून
देऊं शेकाया नेऊन            बाप्पाजींना

परंतु स्त्रियांनी उन्हाळ्याचे वर्णन केले आहे ते आता ऐका. ऊन इतके पडले आहे की दगडसुध्दा फुटून त्यांच्या लाह्या होतील :

दुपारचें ऊन             दगडाच्या झाल्या लाह्या
तोंड कोमेजे देसाया             भाईराया

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel