ती भावाला निरोप तरी कोणाबरोबर पाठवणार, पत्र कोणाबरोबर देणार ? स्त्रियांना कोठे आहे ते स्वातंत्र्य ? परंतु एक साधन आहे. वार्‍याबरोबर, पाखरांबरोबर पाठवावा निरोप. त्यांना बातमी घेऊन येण्याविषयी सांगावे :

अरे वार्‍या वार्‍या                धांवशील लांब लांब
बहिणीचा निरोप सांग               भाईरायाला ॥
कावळया कावळया             लांब जाई रे उडून
येई निरोप सांगून                     भाईरायाला ॥

परंतु चिमण्याकावळयांनी का जावे, का ऐकावे ? का म्हणजे ? मी त्यांना अंगणातून हाकलले नाही. त्यांना दाणे घातले, त्यांना का कृतज्ञता वाटत नसेल ?

दाणे मी घालत्यें               तुम्हाला अंगणात
भावाची आणा मात                 चिमण्यांनो ॥
नाही हाकलीले                 कधी अंगणामधून
यावे निरोप सांगून                  भाईरायाला ॥

भाऊ येणार असे तिला वाटू लागते. हातातला घास गळतो, डोळा लवतो. कोणी तरी दूर डोंगर उतरून उन्हातून येताना दिसते. भर दुपारच्या उन्हातून कोण येते ते ? पावसानंतरचे पहिलेच ऊन्ह. फार त्रास देते ते. भाऊच असणार तो :

दुपारचे ऊन                     घाटीडोंगर कोण घेतो
बहीणीसाठी भाऊ येतो                  भाऊबीजे ॥
दुपारचें ऊन                     लागते सणसण
शेला घेतो पांघरून                       भाईराया ॥
तांबडें पागोटें                   उन्हाने भडक्या मारी   
सुरूच्या झाडाखाली                     भाईराया ॥


कोकणातील हे वर्णन दिसते. घाटी चढून येणारा, सुरूच्या झाडाखाली बसणारा हा कोकणचा भाऊ दिसतो. भाऊ येतो व मुले मामा मामा करू लागतात. बहिणीच्या आनंदाला आकाश ठेंगणे होते. ती भावाजवळ प्रेमाने विचारपूस करते. कौतुकाने पुसते:

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel