अस्सजि:- आयुष्यमन् महाश्रमण शाक्यपुत्र(बुद्ध) माझा गुरू आहे. त्याच्या धर्माप्रमाणें मी वागतों.

सारिपुत्त:- तु्झ्या गुरूचा धर्म कोणता ? कोणतें मत तो प्रतिपादन करितो ?

अस्सजि
:- मी नुकताच बुद्धाचा शिष्य झालों आहें; विस्तृत धर्मोपदेश करण्यास मी समर्थ नाहीं. तथापि संक्षेपानें सारांश काय आहे हें मी सांगूं शकेन.

सारिपूत्त
:- कांहीं हरकत नाहीं. थोडें किंवा फार जें कांहीं तुला येत असेल तेवढें सांग. मला सारांश पाहिजे आहे. वाग्जाल घेऊन काय करायाचें ?

अस्सजि:-

येधम्मा हेतुप्पभवा हेतुं तेसं तथागतो आह।
तेसं च यो निरोधो एवंवादी महासमणो१ ।।


(१ ही गाथा फार प्रसिद्ध असून प्राचीन शिलालेखांत पुष्कळ ठिकाणीं सांपडते.)

कारणापासून उत्पन्न झालेले जे पदार्थ पंचस्कन्धादिक दु:खद पदार्थ त्यांचें कारण तथागतानें सांगितलें आहे, आणि त्यांचा निरोध कसा होतो हेंहि सांगितलें आहे, हेंच महाश्रमणाचें मत होय.

हें समजल्यावर सारिपुत्ताच्या अंत:करणांत एकदम प्रकाश पडला. हें वर्तमान त्यानें मोग्गल्लानाला कळविलें. तेव्हां ते दोघेहि बुद्धापाशीं गेले, आणि त्यांनी भिक्षुसंघांत प्रवेश केला. त्यांजबरोबर संजय परिव्राचकाचे आणखीहि २५० शिष्य बुद्धाचे शिष्य झाले. सारिपुत्त व मोग्गल्लान हे दोघे पुढें अग्रश्रावक (बुद्धाचो प्रमुख शिष्य) झाले.

बुद्धभगवंताच्या आगमनानें राजगृह नगरींत जिकडे तिकडे गडबड उडून गेली होती. आज हा बुद्धांचा शिष्य झाला, उद्यां हे परिव्राजक बुद्धांचे शिष्य झाले, हाच काय तो त्या वेळीं लोकचर्चेचा विषय होऊन बसला होता. कांहीं लोक तर उघडपणें बुद्धास दोष देऊं लागले. हा श्रमण गोतम आमचा देश अपुत्रक करण्यासाठीं आला आहे कीं काय? असें ते ह्मणूं लागले. भिक्षू दृष्टीस पडले तर ते असें ह्मणत असत:-

आगतो खो महासमणो मागधानं गिरिब्बजं।
सब्बे संजये नेत्वान कंसु दानि नयिस्सति।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel