ह्या सुतांत विहितशीलाचा बराच मोठा भाग आला आहे. येथें सांगितलेल्या कित्येक मंगलांचा अशोक राजानें आपल्या शिलालेखांत धम्म या सदराखालीं उल्लेख केला आहे.

९ व्या शिलालेखांत तो ह्मणतो:-

“आवाहविवाहेसु वा पुत्रलाभेसु वा प्रवासह्मि वा एतह्मि च अञ्ञह्मि च जनो उचावचं मंगलं करोते। निरथं च मंगलं करोते। अपफलं तु खो एतारिसं मंगलं। अयं तु महाफले मंगले, य धंममंगले। तत दासभतकह्मि सम्य प्रतिपती, गुरूनं अपचिति साधु, पाणेसु संयमो साधु, ब्राह्मणसमणेसु साधु दानं।”

लग्रकार्यांमध्यें, पुत्रलाभ झाला असतां, प्रवासास निघण्याचे वेळीं, व अशाच तर्‍हेच्या अन्य प्रसंगीं, लोक मोठ्या समारंभानें मंगल करीत असतात, पण तें निरर्थक होय. तशा प्रकारचें मंगल अल्पफलदायक आहे; परंतु महत्फळ देणारें मंगल ह्मटलें ह्मणजे धर्म मंगल होय. (तें कोणतें?) दास आणि भृत्य यांना चांगल्या रीतीनें वागविणें; गुरूजनांची सेवा करणें हें चांगलें; प्राणिहिंसेविषयीं मनाचा संयम करणें हें चांगलें; ब्राह्मणांला आणि श्रमणांला  दानधर्म करणें हें चांगलें.

पति आणि पत्नी, मातापिता आणि पुत्र, गुरू आणि शिष्य, धनी आणि नोकर इत्यादिकांची परस्परंसंबंधीं काय कर्तव्यें आहेत, याचें वर्णन सिगालसुत्तांत केलें आहे. या सिगाल सुत्ताचें मराठी रूपांतर आपण अवश्य १पहावें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१. परिशिष्ट पहा.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
निषिद्धशीलांत प्रथमारंभीं गृहस्थांनीं आणि गृहिणींनीं नित्य पाळायाचे ५ नियम येतात. (१) प्राणघात न करणें; (२) अदत्ता दान (चोरी) न करणें; (३) व्यभिचार न करणें; (४) खोटें न बोलणें; व (५) दारू वगैर मादक पदार्थचें सेवन न करणें. ह्या पांच गोष्टी बौद्ध ह्मणविणारानें वर्ज्य केल्या पाहिजेत.

दोन्ही अष्टमी, पूर्णिमा व कृष्ण चतुर्दशी ह्या चार दिवसांला उपोसथ दिवस असें ह्मणतात. ह्य दिवशीं जे गृहस्थ आणि गृहिणी धर्मचिंतनांत काल घालवितात, त्यांस अनुक्रमें उपासक आणि उपसिका असें ह्मणतात. उपासकांना आणि उपासिकांना या दिवशी पाळण्यासाठीं बुद्धांनीं आठ नियम घालून दिले आहेत. त्यांचाहि निषद्धशीलांत अंतर्भाव होतो. ते नियम येणें प्रमाणें:- (१) प्राणघात न करणें; (२) चोरी न करणें; (३) अब्रह्मचर्य न करणें (ह्मणजे ब्रह्मचारी राहणें); (६) मध्याह्नानंतर न जेवणें; (७) नृत्य, गीत वगैरे कामविकार उद्दीपित करणार्‍या गोष्टी न पाहणें व मालागंधदि (चैनीच्या) पदार्थांचें धारण न करणें; (८) उंच आणि मोठ्या बिछान्यावर न निजणें.

ह्या नियमांपैकीं १ ला, २रा, ४ था व ५ वा हे चार नियम पूर्वीं सांगितलेल्या नियमांत आलेच आहेत. पांच नियमांतील ३ र्‍या नियमांत व्यभिचार करूं नये अशी आज्ञा आहे; पण येथील ३ र्‍या नियमाप्रमाणें उपोसथाच्या दिवशीं ब्रह्मचारीच राहिलें पाहिजे. वर सांगितलेल्या चार दिवशीं उपोसथ पाळण्यास सवड नसेल तर तो गृहस्थांनीं आणि गृहिणींनीं वाटेल त्या दिवशी पाळण्यास हरकत नाहीं. ब्रह्मदेंशात आजकाल ज्या गृहस्थांना आफिसच्चा वगैरे कामामुळें वर सांगितलेल्या चार दिवशीं उपोसथ पाळण्याची सवड होत नाहीं ते रविवारीं उपासथ पाळीत असतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel