यावरून असें दिसून येईल कीं, ब्रह्मदेव ह्मणजे मैत्री, करूणा, मुदिता, किंवा उपेक्षा यांपैकीं एकादी मनोवृत्ति होय. आई जशी दूध पिणार्‍या मुलाचें मैत्रीनें (प्रेमानें) पालन करिते, तो आजारी असला तर ती करूणेनें त्याची शुश्रूषा करिते, विद्याभ्यादिकांत त्यानें पाटव संपादन केलें असतां मुदित अंत:करणानें ती त्याला कुरवाळते, व तो पुढें स्वतंत्रपणें संसार करूं लागला किंवा तिच्या मताच्या विरूद्ध वागूं लगला तर ती त्याची उपेक्षा करिते; त्याचा ती द्वेष कधींच करीत नाहीं, व त्याला मदत करण्यास तयार नसते असेंही होत नाहीं; त्याप्रमाणेंच महात्मे लोक ह्या चार श्रेष्ठ मनोवृतींनीं प्रेरित होत्साते जनसमूहाचें कल्याण करण्यास तत्पर असतात. ज्या ब्रह्मदेवाला लोक पितामह ह्मणतात तो दुसरा नसून ह्या चार मनोवृत्तींची साक्षात् मूर्ति होय। तेव्हां आतां बुद्धाजवळ ब्रह्मदेव आला ह्मणजे काय? तर ह्या चार मनोवृत्ति त्याच्या मनांत विकास पावल्या. ब्रह्मदेवाची प्रार्थना त्यानें ऐकिली ह्मणजे काय? तर त्याच्या अंत:करणांत वास करणार्‍या अमर्याद प्रेमानें, अगाध करूणेनें, सज्जनांविषयीं मुदितेनें आणि जे कोणि त्याचें ऐकणार नाहींत किंवा अकारण शत्रू होतील अशांच्या उपक्षेनं त्याला सद्धर्माचा प्रसार करण्यास प्रवृत्त केलें.

आराळकालाम व उद्रक रामपुत्र या दोघांस या धर्माचा उपदेश प्रथम करावा असा बुद्धांच्या मनांत विचार आला. कारण ते दोघेही हा त्याचा धर्म समजण्यास समर्थ होते. परंतु ते नुकतेच परलोकवासी झाले असें त्यांना समजलें. तेव्हां त्यांनी आपल्या धर्माचा वर वर्णिलेल्या देहदंडनाच्या प्रसंगीं आपणास मदत करणार्‍या पांच भिक्षूंस प्रथमत: उपदेश करावा असा निश्चय केला. ते भिक्षू या वेळीं वाराणसींतील ऋषिपत्तनांत राहत असत. भगवान् बुद्ध आषाढ पौर्णिमेच्या सुमारास तेथें जाऊन पोंचले. त्यांना पाहून ते पांच भिक्षू एकमेकांस ह्मणाले; ‘हा ढोंगी श्रमण येत आहे, हा पतित गोतम येत आहे. याचा आह्मीं कोणत्याही प्रकारें आदरसत्कार करितां कामा नयें; एक आसन मात्र येथें टाकून ठेवावें, जर त्याची इच्चा असेल तर तो त्यावर बसेल, नाहींतर नाहीं.’

परंतु जसजसा बुद्ध जवळ येत चालला तसतसा या पांच भिक्षूंचा बेत ढांसळत गेला. त्यांपैकीं एकानें उठून आसन मांडलें, दुसर्‍यानें पाय धुण्यास पाणी तयार केलें. बाकीच्यांनी सामोरे येऊन बुद्धाचें भिक्षापात्र आणि चीवर (भिक्षुवस्त्र) घेतलें व त्याचा सन्मान केला. बुद्धांनीं आपणास धर्मज्ञानाचा साक्षात्कार झाल्याचें त्यांस सांगितलें; परंतु तें त्यांस खरें वाटेंना. शेवटीं आषाढपूर्णिमेच्या दिवशी बुद्धानीं त्यांस उपदेश केला, तो असा:-

“भिक्षूहो, प्रव्रजितानें ह्या दोन अंतांचें सेवन करूं नयें. ते दोन अंत कोणते? चैनीचा उपभोग घेत पडणें हा एक अंत. हा हीन आहे, ग्राम्य आहे, अज्ञजनसेवित आहे, अनार्य आहे, अनर्थावह आहे. देहदंडन करणें हा दुसरा अंत. हाही दु:ख कारक आहे, अनार्य आहे, अनर्थावह आहे. ह्यणून ह्या दोन्ही अंतांना न जातां तथागतानें मध्यम मार्ग शोधून काढला आहे. हा मार्ग ज्ञानचक्षु उत्पन्न करणारा आहे, ज्ञानोदय करणारा आहे. ह्यानेंच उपशम अभिज्ञा(दिव्यशक्ति) संबोध (प्रज्ञा) आणि निर्वाण यांची प्रप्ति होते. हे भिक्षू हो, हा मार्ग कोणता ह्मणाला तर आर्यआष्टांगिक मार्ग होय. त्याचीं हीं आठ अंगें:- सम्यक् दृष्टि, सम्यक् संकल्प, सम्यक् वाचा, संम्यक् कर्मान्त (कर्म), सम्यक आजीव, सम्यक् व्यायाम, सम्म्यक् स्मृति, आणि सम्यक् समाधि. हा तो तथागतानें शोधून काढलेला मार्ग, ज्याच्या योगें उपशम, अभिज्ञा, संबोध निर्वाण यांची प्राप्ति होते१.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१. स्पष्टीकरणार्थ परिशिष्ट पहा.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel