पौराणिक पंथामध्यें ब्रह्मा, विष्णु आणि शिव ही तीन मुख्य दैवतें गणिलीं आहेत. ख्रिस्ती धर्मांत पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या तिहींना प्राधान्य दिलें आहे. त्याचप्रमाणें बौद्ध धर्मांत बुद्ध, धर्म आणि संघ ह्या त्रयीला श्रेष्ठत्व मिळालें आहे. बौद्ध धर्म पौराणिक धर्मापेक्षां किंवा ख्रिस्ती धर्मापेक्षां प्राचीन असल्यामुळें त्याचें अनुकरण पौराणिकांनी आणि ख्रिस्त्यांनी केलें असावें असें कित्येकांचे अनुमान आहे. ह्या अनुमानाला संख्येचें साम्य यापलीकडे कांही आधार असेल असें मला वाटत नाहीं. पुराणांतील त्रिमूतींची किंवा बायबलांतील त्रयीची बहुतेक सर्व श्रोत्यांस माहीती असेलच. परंतु बौद्ध धर्मांतील १त्रिरत्नाची पारख अद्यापि आमच्या बांधवांपैकीं बर्‍याच जणांस झाल्याचें दिसून येत नाहीं. तेव्हां आजच्या ह्या पहिल्या व्याख्यानांत ह्या त्रिरत्नांपैकी पहिलें रत्न बुद्ध त्याची बौद्धांचा मूळग्रंथ जो त्रिपिटक त्यास अनुसरून थोडीशी माहिती आपणांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करितों.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१- बुद्ध धर्म आणि संघ यांना बौद्ध वाङमयात त्रिरत्न किंवा रत्नत्रय अशी संज्ञा आहे.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बुद्धाची माहिती देणारे ललितविस्तर आणि अश्वघोषकृत बुद्धचरित काव्य हे दोन ग्रंथ संस्कृत भाषेंत प्रसिद्ध आहेत. पालिभाषेंत जातकाच्या प्रस्तावनेंत बुद्धचरित कथन केलें आहे. अलीकडे जे इंग्रजीभाषेंत बुद्धचरित्रावर ग्रंथ झाले आहेत, ते बहुतेक वरील ग्रंथांच्या आधारें लिहिले आहेत. ह्या ग्रंथांतून बुद्धाच्या बालपणींच्या कित्येक चमत्कारिक आणि असंभवनीय गोष्टी सांगितल्या आहेत. आरंभी जेव्हां युरोपियन पंडितांनी ह्या गोष्टी वाचल्या तेव्हां त्यांतील कित्येकांनी बुद्ध ही ऐतिहासिक व्यक्ति नसून पौराणिक देवता असावी असें अनुमान केलें. प्रो० सेनार या प्रेंच पंडितानें सूर्योपासनेपासून बुद्ध दैवताची कल्पना निघाली असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. हा त्याचा सिद्धांत चिरायु झाला नाहीं.

कांही वर्षांमागें आर्क्यालोजिक खात्यानें नेपाळी तरांईतील लुंबिनिदेवी ह्या गांवी नेपाळी सरकारच्या परवानगीनें कांहीं जमिनींत गाढून गेलेल्या मोडक्या इमारती खणून काढिल्या. त्यांत एक अशोकराजाचा शिलास्तंभ सांपडला. ह्या स्तंभावर अशोकानें पालिभाषेंत लिहिविलेला लेख आहे तो येणेंप्रमाणे:--

“देवान पियेन पियदसिंन वीसति वसाभिसितेन अतन आगाच महीयिते हिध बुध्दे जाते सक्यमुनीति सिला विगडाभिचा कालापितसिलाथंबेच उसपापिते हिध भगवं जातेति लुंमिनिगामे उबालिके कते अथभागियेच।”

(देवांचा प्रिय प्रदर्शी (ह्य०अशोक) राजानें आपल्या अभिषेकास वीस वर्षें झाल्यावर येथें शाक्यमुनि बु्द्ध जन्मले होते ह्यणून स्वत:येऊन पूजा केली. चारी बाजूंस शिलास्तंभाची भिंत बांधिली, आणि (हा) शिलास्तंभ उभारिला. ह्या ठिकाणीं भगवान् बुद्ध जन्मले होते ह्याणून ह्या लुंबिनी गांवाचा कर माफ करण्यांत आला, आणि (विहाराला?) कांही नेमणूक करून देण्यांत आली.)

ह्या शिलालेखानें बुद्ध ही पौराणिक देवता नसून ऐतिहासिक व्यक्ति होती अशी पाश्चात्य पंडितांची खात्री झाली, व प्रो० सेनारच्या वर सांगितलेल्या कल्पनेची इमारत आपोआप ढांसळून पडली। तथापि ह्या पंडितांनी वर सांगितलेल्या चरित्रविषयक तीन ग्रंथांच्या पलिकडे जाऊन अति प्राचीन पालिग्रंथांत बुद्धचरित्रासंबंधीं काय माहिती मिळते, ललितविस्तरादि ग्रंथांतून सांगितलेल्या चमत्कारिक कथांस मूळ ग्रंथांत आधार आहे कीं काय, इत्यादि गोष्टींचा विचार केल्याचें दिसून येत नाहीं, व हें तर फार महत्त्वाचें आहे. तेव्हां केवळ मूळ पालिग्रंथ त्रिपिटक याच्या आधारें बुद्धचरित्राची माहिती देण्याचें येथें मीं योजिलें आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel