तदनंतर मी आहार कमी करण्याचा निश्चय केला. मुगांचा किंवा कुळथांचा काढा पिऊनच मी राहत असें. अशा स्थितींत माझा देह अत्यंत कृश झाला. हातापायांच्या काडया झाल्या, पाठीचा कणा स्पष्ट दिसूं लागला, मोडक्या घराच्या वांशांप्रमाणें बरगडया खिळखिळून गेल्या, पाण्यांत पडलेलीं नक्षत्रांतीं प्रतिबिंब जशीं खोल गेलेली दिसतात, त्याप्रमाणें माझ्या डोळयांची बुबळें खोल गेलीं होतीं; कडू भोपळा कच्चा कापून उन्हांत टाकिला असतां जसा कोमेजून जातो तशी माझी अंगकांति करपून गेली होती. पोट आणि पाठ एक झाली होती. त्या वेळीं माझ्या मनांत असा विचार आला कीं, ‘ह्या ज्या मी अत्यंत दु:खकारक वेदना अनुभवीत आहें त्यांच्यापेक्षां अधिक दु:खकारक वेदना दुसर्‍या श्रमणानें किंवा ब्राह्मणानें अनुभविल्या नसतील. परंतु ह्या दुष्कर कर्मानें लोकोत्तर धर्मज्ञान प्राप्त होईल असें मला वाटत नाहीं. याहून दुसरा कोणता तरी निर्वाणप्रासीचा मार्ग आहे कीं नाहीं? (घर सोडण्यापूर्वीं मी) माझ्या बापाबरेबर शेतांत गेलों असतां जंबुवृक्षाच्या छायेंत बसून प्रथम ध्यानाची समाधि साधल्याची मला आठवण आहे, तोच तर निर्वाणाचा मार्ग नसेलना? ह्या गोष्टीचें स्मरण झाल्याबरोबर हे अग्गिवेस्सन, तोच मार्ग खरा असावा असें मला वाटूं लागलें. मी माझ्याशींच ह्मणालों, त्या समाधिसुखाला मी कां भितों? तें चैनीनें मिळालेलें सुख नव्हे, किंवा पापकारकहि नव्हे, अशा सुखाला मी भितां कामा नये. परंतु ह्या दुर्बल देहानें तें सुख साध्य होणार नाहीं. तेव्हा देहांचें संरक्षण करण्यापुरतें अन्न मीं खाल्लें पाहिजे.

“तदनंतर मी देहसंरक्षणाला लागणारें अन्न सेबन करूं लागलों. त्या वेळीं माझ्या सेवेसाठीं पांच भिक्षू राहत असत. मला जें धर्मज्ञान होईल तें मी त्यांस सांगेन अशी आशा त्यांना वाटत होती. परंतु जेव्हां मी अन्न सेवन करण्यास आरंभ केला, तेव्हां त्यांची निराशा झाली व मी ढोंगी आहें असें समजून ते मला सोडून चालते झाले. त्या अन्नग्रहणानें हळू हळू माझ्या अंगीं शक्ति आली व मी समाधिसुखाचा अनुभव घेऊं लागलो.”

आळार कालाम व उद्रक रामपुत्र हे दोघे एका प्रकारच्या योगमार्गाचे प्रवर्तक होते. बुद्धचरित काव्यांत यांस सांख्यमतापासून निघाला असें विधान कित्येक पाश्चात्य पंडितांनी  केलें आहे. परंतु ह्या त्यांच्या विधानास त्रिपिटकांत कोठेंच आधार नाहीं. आश्वघोषाचार्यांनीं सांख्यमताची निष्फलता दाखविण्यासाठीं आणि काव्याला शोभा आणण्यासाठीं त्यांस सांख्यमतप्रवर्तक बनविलें असावें एवढेंच ह्यावरून सिद्ध होत आहे.

या पुढील बोधिसत्वावर गुदरलेला मोठा आणीबाणीचा प्रसंग ह्मटला ह्मणजे माराबरोबर झालेल्या त्याचा युद्धाचा होय. बुद्धचरितकाव्यादि ग्रंथांतून या प्रसंगाचें अद्भुतरसपरिप्लुत वर्णन आढळतें. तें काव्याच्या दृष्टीनें अत्यंत मनोरम आहे. परंतु सुत्तनिपातांतील पधान सुत्तंत केलेलं मारयुद्धाचें वर्णन त्याहून भिन्न आहे. पधानसुत्तंत २५ गाथा आहेत, त्यांपैकीं कांही येथें देणें अप्रासंगिक होणार नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel