नाश कराया शिवरायाचा आला शाहिस्ताखान ॥

छाटुन बोटें दूर पळविला; । धन्य शिवाजी भूरमण ! ॥ध्रु०॥

चौक १

केला धुमाकूळ शिवरायानं संकट मोंगल-राज्याला ।

स्वातंत्र्याच्या मुळ्या भेदिती अभेद्य मोंगल-भिंतीला ! ॥

चिरे धडाधड पडूं लागले, बुरुज कोसळे धरणीला ! ।

शिवशक्तीच्या तोफेमधुनी सुटला भीषणसा गोळा ! ॥

शिवतेजाची वीज देतसे झटके औरंगजेबाला ! ।

कांहीं सुचेना, अन्न रुचेना, झोपहि ये ना नयनाला ! ॥

भगवा झेंडा फडफड फडके भूषण वार्‍याला झाला ।

फडफड करुनी गगनी बोले, ’धन्य शिवाजी अवतरला !’ ॥

दर्‍याखोर्‍यांतुन मैदानांतुन पाउल टाकी शिव जेव्हां ।

विजयश्रीचीं फुलें उमलती त्या त्या स्थानीं मग तेव्हां ॥

फिरंग फिरवी शिवबा इकडे, तिकडे मोंगल गडबडला ! ।

टाप घोडिची ऐकुनि तिकडे शाहा कासाविस झाला !! ॥

दर्प असा हा शिवशक्तीचा सहन होइना दिल्लीला ।

रात्र्म्दिन नच झोप कुणाला, काय करावें शिवबाला ! ॥

विचार ठरला, दूत निघाला आला दख्खन देशाला ।

बादशाहाचं पत्र दिलं मग त्यानं शाहिस्ताखानाला ! ॥

"चला, मरा, तुम्हि कांहि करा, पण धराच या शिवचोराला ।

सरा न मागें, घरा न जावें, चराचरा शिवचोर चिरा !" ॥

बादशहाचं पत्र असं हे वाचुन शास्ताखान जरा ।

मनीं चरकला, विषण्ण झाला क्षणिं कोमेजुन ही गेला ! ॥

शुभ्र लोंबत्या दाढीवरचा रंग लगोलग पालटला ! ।

हात मस्तकावरती ठेवुन करि तो घोर विचाराला ॥

"काम असे हें अवघड मोठें शिवा न सोपा धरण्याला ।

पिशाच्च चेटुक अनुकुल त्याला कसें धरुं सैतानाला !!" ॥

स्वारीचा पण निश्चय केला शूर शिपाई जमवीला ।

फौज घेउनी खान चालला शिवरायाला धरण्याला ॥

जातां जातां बेत ठरवला चाकण किल्ला घेण्याला ।

वेढा दिधला मग खानानं सत्वर, चाकण किल्ल्याला ॥

प्रकार पुढचा काय जाहला सांगिन पुढच्या चौकाला ।

धन्य शिवाजी रसिकजनांनो ! ऐका श्रीशिवकीर्तीला ॥१॥

चौक २

नरसाळा फिरंगोजी वर । होता किल्लेदार ।

मोठा बाणेदार । झाला तय्यार संग्रामाला ।

केले घनघोर लढाईला । अस्मानांत धुरळा सारा भरला ! ॥

आटोकाट झगडा त्यानं केला । किल्ला लढविला ।

उपाय पर थकला । खानानं केलं कैद त्याला ।

किल्ला खानाच्या हातीं गेला । नरसाळा धन्य धन्य झाला ! ॥

चाल

शाहिस्ताखान मग त्याला । काय बोलला सांगतों तुम्हांला ।

"र्‍हा आतां आमच्या चाकरीला । चढवीन मोठया हुद्याला ।

शिवा काय देणार तुला ? । शिवाजीचा नाश करण्याला खान हा आला ॥

शिवाजीचा नाश खास झाला । असं समज आज या वेळा ॥

कोल्ह्यानं सिंहाशीं झगडा कधीं काय केला ? ॥

शिवा चोर बंडखोर झाला । चल माझ्यासंग या वेळा ।

पकडुया बंडखोराला !!" । असं बोलला खान हो त्याला ।

फिरंगोजी लालेलाल झाला ! । फिरंगोजी बोलला खानाला ॥

चाल

"शिवाजीचा बंदा नोकर । नरसाळा अस्सा राहणार ! ॥

शिवाजीच्या पायावर शीर । ठेविन मी, तोच मज प्यार ॥

शिवराय माझा रे मोर । शिवराय चंद्राची कोर ॥

चाल

बडबडसी व्यर्थ या वेळा । जंवा पाहशी खाना !

तूं त्याला । तंवा दरदरेल घाम अंगाला ।

दांतखिळी बसेल तोंडाला । शिवराय सिंह रे झाला ।

लोळविले कैक भूमिला । करुं नको त्याच्या निंदेला ।

जाऊं नको त्याच्या वाटेला । माझ्यासारखे कैक रे वीर त्याच्या पदराला ॥

परतून जा जा माघारा । अन् सांग बादशाहाला ।

कीं शिवाजीला कैद करण्याला । गेलों होतों---आलो माघारा ! ।

जो करील कैद शिवाजीला । असा एवढा सार्‍या दुनियेंत कोण हि न झाला !!" ॥

चाल

ऐकुनी बोल वीराचे । खान मनीं गारेगार झाला !

पाहून स्वामिभक्तीला । खानाला संतोष झाला ! ।

खानानं सोडलं मग त्याला । अन् त्याचा मोठा गौरव केला ॥

चाल

शिवरायाकडं पाठवलं त्यानं मग त्याला ॥

चाल

चाकणचा किल्ला घेऊन । चालला जल्दीनं ।

मोठया ऐटीनं । पुण्यामंदि थेट खान आला ।

शिवाजीचा वाडा त्यानं घेतला । ऐका प्रकार काय झाला ॥२॥

चौक ३

शिवाजीच्या महालामधिं खान । राहिला येऊन ।

बंदोबस्तानं । जागजागीं ठेवलं शिपायाला ।

हुकुम मनाईचा हत्त्याराला । वेशीवर पहारा रोज बसला ! ॥

खानाच्या परवान्यावीन । फिरकेना कोण ।

पाखरुंहि लहान । एवढा त्यानं बंदोबस्त केला ।

धाक शिवाजीचा वाटे त्याला । रात्रींही झोंप न डोळ्यांला ! ॥

सिंहाच्या गुहेमधिं जसा । ससा कसाबसा ।

शिरावा तसा । शिरला पुण्यामंदि खान ते वेळा ।

मगराच्या दाढेला हात । हात लावला त्यानं निभ्रांत ।

निभ्रांत जाहला भ्रांत । झाला काय वात ।

कळेना मजला ! ॥ शिवराय होता सिंहगडीं ।

घेउन सवंगडी । विचार घडोघडी । घडविती किल्ल्यावरती ते वेळा ॥

शाहिस्ता आला चालून । पुण्यामंदि राहिला येऊन ।

काढावा कसा हुसकून । विचार जोरानं असला हा झाला ॥

पाठवला एक ब्राह्मण । शिवरायाने । पुण्यामंदि त्यानं ।

जाऊन वश केलं एका मराठयाला ॥ एक खोटया लग्नाचा घाट ।

घाट घातला बीनबोभाट । वरातीचा रात्रीला थाट ।

कैला ऐटींत । लोक किति जमला ! ॥

चाल

घाट कात्रजचा जवळ झाला । तीन कोसाच्या अंतराला ।

शक्कल सुचली शिवाजीला । खानाची फौज चकविण्याला ।

पोत बांधवले हो झुडपाला ! । कात्रज घाटांत ते वेळा ।

पोत बैलांच्या हो शिंगाला ! । बांधले खानाला ठकविण्याला ।

झुडपं झालीं साहाय्य शिवाजीला । पशुपक्षी झाले साहाय्य त्याला ।

दुसरा जणु रामचंद्र आला ! । नंदी झाले साहाय्य शंकराला ! ।

गाऊं किती त्याच्या पोवाडयाला ? । इकडं असा त्यानं बेत केला ।

अन्‌ एका बोलावलं मावळ्याला । गवताचा भारा दिला त्याला ।

भार्‍यामंदि घातलं तलवारीला ! । मावळा पुण्यामंदि घेउन गेला ।

तंवा शिवाजीनं । दहा वीस जण । मावळे घेऊन ।

वेष पालटून । सोडला गड, पुण्यामंदि आला ।

काळोख काळा कुट्ट भरला । वरात आली होती गणपतीला ।

गर्दिमंदि शिवराय हो शिरला । ऐकावं र दादा ॥३॥

चौक ४

लाल महालामधीं येऊन राहिला जरि खान । तरि हालचाल होईना शत्रुपासून ।

खानाला वाटलं शिवराय गेला घाबरुन । बंदोबस्त मोठा पाहून ।

खानाचं मन । होतं प्रसन्न ॥ चहुकडं सामासूम झाली ।

माणसं झोंपली । गाढ झोंप आली । खानाला, नव्हतं त्याला देहभान ।

भररात्रीं खिडकी उघडून । शिवराय आणि चार जण । गेले घुसून ! ॥

खानाचा मुलगा ठार केला । झाला गलबला । खान जागा झाला !

पाहतो तों दिसला काय प्रकार । शिवाजी झाला छातीवर स्वार ।

तय्यार झाला कराया वार ॥ बायकांनीं दुःखी होऊन ।

अति गहिवरुन । हात जोदून । विनवणी केली शिवाजीला ।

"आमच्याकडं बघुन या वेळेला । जीवदान द्यावं-थोर झाला !" ॥

चाल

शिवराय बोलला खानाला । "बायकांनीं आक्रोश केला ।

म्हणुन देतों जीवदान तुला । पण ऐक माझ्या बोलाला ।

इथं राहणं योग्य नाहीं तुला । शिवाजीचा मुलुख हा झाला ।

तो घेईल तुझ्या जीवाला । जीवदान देतों आज तुला ।

जर ऐकशील एका गोष्टीला । माझ्या संगं गोटाबाहेर चला; ।

आलं पाहिजे तुम्हां सर्वाला" । खानसाहेब घाबरुन गेला ! ।

हा कोण आदमी घरिं आला । समजेना कांहीं हें त्याला ।

खानसाहेब चालले शिवाजीच्या संग ते वेळा ! ॥

गोटाच्या बाहेर जंवा गेला । तंवा बोलला राजा खानाला ॥

चाल

"धाक ज्याचा बादशाहीला । शिवाजी तोच हा आला ! ॥

जाऊं नको याच्या वाटेला । वाघनखं लाविलं पोटाला ॥

पण आठवण रहावी रे तुजला’ म्हणून छाटतों तुझ्या बोटाला ! ॥

आजपासून ऐक बोलाला । म्हण ’शास्ताखान । आपणांला" ॥

असं म्हणून बोट छाटून शिवबा पार झाला !! ॥ मग खान गेला माघारा ।

लाज मोठी वाटली त्याला । तय्यार केलं फौजेला ।

अन् पाठविली पाठलागाला ॥ इकडं शिवाजीनें काय बेत केला ।

धोक्याचा करणा फुंकला । कात्रजच्या घाटांतिल पोत पेटले ते वेळा ! ॥

शिवाजी गेला त्या स्थळा । असं वाटलं यवनी फौजेला ।

अन् कात्रजच्या घाटाकडं गेली पाठलागाला ! ! ॥ ततं जाऊन पाहती त्या वेळा ।

अन् परतले सारे माघारा !! ॥ पर इकडं सिंहगडावरी शिवा पार झाला ॥

चाल

गेला खान फार घाबरुन । पुणं सोडून ।

तळ हालवून । भवानी साहाय्य शिवाजीला ।

यश राजाचं वर्णायाला । शाहीर पांडुरंग झाला ॥४॥

वीराग्रणी मुरारबाजी देशपांडे अर्थात्‌ पुरंदरचा वेढा --- पोवाडा

शाहीर पां.द.खाडिलकर

ज्याच्या कबंधानं भूतळी । तीनशें जण बळी ।

घेतले पुरंदरीं । मुरारबाजी धन्य धन्य सरदार ॥

झाला तीन लोकां वीर तो प्यार । शाहीर पांडुरंग गाणार ॥ध्रु०॥

चौक १

शाहिस्तेखानाची केली पार धुळदाण ।

जरी आला होता एक लक्ष फौज घेऊन ।

बोटें तोडुन शाहिस्ता केला फार हैराण ।

हैराण फार होऊन । पुणें सोडून । गेला जल्दीनं ॥

जसा पाला पाचोळा उडवि पवन लीलेनं ।

किंवा ढग मोठमोठाले एका लहरीनं ।

मेंढयांचा कळप उधळावा जसा सिंहानं ।

तशि थोडी युक्ति योजून । दिला हांकलून । शाहिस्ताखान ॥

केल्या स्वार्‍या अवरंगजेबाच्या मुलखामधून ।

चार दिवस सुरत शहराची लूट मारुन ।

अगणित द्रव्य जवाहीर मोतीं घेऊन ।

भयभीत केला यवन । यवनांची झाली गाळण ।

ध्यानीं मनीं दिसतो सैतान । झोंप ही न छान ! ॥

कोण रात्रीं झोंपेंतून उठती बरळ बरळून ।

पाहती स्वप्न आणि त्यांत शिवा सैतान ! ।

भिंतीला जाऊन थडकती वेगवेगानं ।

आरडती किंचाळून कोण । सैरावैरा धांवती कोण । वस्त्र सोडून ! ॥

’शिवाजी डोंगई उंदीर फार लहान ।

तो करतो काय चिरडून त्याला टाकीन---’ ।

असा होता बादशहाचा वेडा हो भ्रम । शिवाजीनं केली धामधूम ।

धामधूम झाली पाहून । शाहाचं मन । झालं हो खिन्न ॥

उंदीर नव्हे हा, असे रे जहरी बाण । आला ! आला ! जाइल छातित्‌नं पार घुसून ।

पादशाही करिल हैराण, काळ दारुण ! । दारुण करुनिया रण ।

कणिं करिल यवनकंदन । करिल धुळदाण ॥ चाल ॥

अवरंगजेबाला शत्रु प्रबळ हा झाला ॥ शाहिस्त्याची फजिती ऐकून शाहा लाल झाला ॥

शिवाजीचा कांटा काढण्याचा बेत त्यानं केला ॥ मग बोलला जयसिंगाला ।

"शिवा मोठा पुंड हो झाला । त्यानं मुलूख हैराण केला ॥

हा कांटा मोंगलशाहीला । जर असा वाढूनच दिला ।

तर होईल भारी आम्हांला । मामाचा मोड त्यानं केला ।

प्रतापगडीं खान ठार केला । लुटालूट केली सुरतेला ।

त्यानं केल जेर शिद्दीला ॥ दरारा त्याचा मुलखाला ।

हें विघ्न आमच्या राज्याला । तुम्ही जावं पारिपत्याला ।

दिल्लीरखान तुमच्या मदतीला । कांटा हा काढा या वेळा" ॥

असं बोलला जयसिंगाला । मग शाहा बोलला एकांतीं दिल्लीरखानाला ॥

’तुम्ही जावं जयसिंगराजाच्या संगें मदतीला’ ॥

पण कानमंत्र हा दिला । "नीट ठेवा तुमच्या लक्ष्याला ।

जयसिंग हिंदु हा होईल फितुर शिव्याला ! ॥

हिंदु हिंदु एक होतील होइल घोंटाळा ॥

बारीक सारीक सार्‍या बातमीला । नीट काढा आतां या वेळा ।

नीट ठेवा त्याच्यावर डोळा । आणि स्वारी फत्ते करुन यावं दिल्लीला" ॥१॥

चौक २

मग फौज ऐंशीं हज्जार । पायदळ, स्वार ।

घेऊन पेंढार । मिर्झा राजा आणि दिल्लीर आला ॥

वेगानंच दख्खन देशाला । हिंदवी राज्य चिरडण्याला ॥

मिर्झा राजा आणि दिल्लीरखान । राहु केतु जाण ।

आले जोडीनं । ग्रासाया सूर्यशिवाजीला । हिंदू हिंदूला काळ झाला ।

निखारा अस्तनींत पडला ! ॥ हत्ती घोडे बैल आणि उंट ।

होते अफाट । तोफा घनदाट । थाट माट तेव्हां फार केला ।

आकाशीं धुरळा दाट भरला । सूर्याला पार लोपवीला ॥

चाल

विजापूरच्या आदिलशहाला । अवरंगजेबानं धाडलं पत्र ते वेळा ॥

कीं "करा मदत आतां या वेळा । शिवाजीनं पुंडावा केला ।

अफझुलखान तुमचा ठार केला । देतो हा पीडा मुलखाला ।

हा शत्रु तुम्हां आम्हाला । दोघं मिळून चिरडूंया त्याला ।

मी फौज मोठा धाडली हो दख्खन देशाला ॥

तुम्ही पाठवा फौज या वेळा । दोघं उचल खाऊं या वेळा ।

आणि करुं ठार हो त्याला । सापाचं पिल्लु हा झाला ॥

वेळींच डोकं ठेचुं या आज या वेळा" ॥ आदिलशहा पत्र वाचून खूष फार झाला ॥

फाजलखान फौज देऊन धाडला मदतीला ॥ आणि गेली पत्र कितिकांला ।

जावळीच्या मोर्‍याचे मुलगे-बाजी, अंबाजी-गेले मदतीला ॥

शिवप्पा नाईक बेदनुरचा । जहागिरदार बसवपट्टणचा आला मदतीला ॥

माणकोजी धनगरही आला । कोळीराजे गेले मदतीला ।

शिवाजीचा नाश करण्याला । कुर्‍हाडीचा दांडा गोत्याला काळ हो झाला ॥

कुंपणानं खाल्लं शेताला ! । भावानं मारलं भावाला ! ।

असो असे राजे यवनांच्या गेले मदतीला ॥ जयसिंग दक्षिणेंत आला ।

सासवड गांवीं तळ त्यानं दिला । आणि पुढच्या स्वारीचा विचार त्यानं सुरु केला ! ॥२॥

चाल

"जे वीर पुरुष जाहले । आर्य आपुले ।

सर्व बिघडले । दास ते बनले ।

मनिं मानलालसा धरुनी अंकित झाले ! ॥

चाल

हें असें मला बघवेना, या पुढें ॥

पाहुनी चित्त हें माझें तडतडे ! ॥

निशिदिनीं हृदय हें माझें धडधडे ॥

चाल

क्षणभर मजला चैन देइना क्षात्रधर्म हा भला ।

देह हा या कामीं वहिला ! ॥

चाल

पर राजे आज तुम्ही दया दाखवा मला ॥

हा तुमच्या शब्दाबाहेर नाहीं राहिला ।

जसे वडील माझे तस्सेच तुम्ही हो मला ! ॥

दोन शब्द सांगणं तुम्हांला । हा अधिकार ना मला ! ।

हें धरा पोर पोटाला । आणि क्षमा करा हो मला ।

परचक्र मोठं हें आलं हिंदू राज्याला ॥ हा वृक्ष आम्हीं लावला ।

आतां तुम्ही वाढवा त्याला । मोंगलाचा मुलुख मी देतों परत मोंगलाला ॥

द्या तुमचा सल्ला या वेळां । मी येतों तुमच्या भेटीला" ।

असं पत्र धाडलं शिवानं हो जयसिंगाला ॥३॥

चौक ४

ही बातमी ऐकून मोंगल दिल्लीरखान ।

लाल झाला रागानं म्हणे ’हा जयसिंग कोण ? ।

तह करणार शिवाजी संगें मोठया ऐटीनं ।

हिंदु हिंदु एक होऊन । मला आतां दूर वगळून ।

शाहाशीं झाला बेइमान । आज संपूर्ण ॥

मग मिर्झा राजाला बोलला दिल्लीरखान ।

"तह नका करुं शाहाच्या हुकमावीण ।

कायमचा कांटा काढायची संधि सोडून ।

कां असें मनीं बिचकतां आज हो आतां ।

धीर सोडून" ॥ जयसिंग बोलला "ऐका हो दिल्लीरखान ! ।

उंदीर नसे हा शिवा, सिंह भीषण । कितिकांना खडे चारुन केलं हैराण ।

कितीकांची मान फाडून । कितीकांचीं बोटं तोडून ।

धूळ चारुन गेला वेगानं !" ॥ मग बोलला राजाला मिया दिल्लीरखान ॥

दाढीवरन्म मोठया तोर्‍यानं हात फिरवून ।

"शिवाजीला झाला सामील तुम्ही आंतून । केला घात फंदफितुरीनं ।

हिंदुला घेरलं हिंदूनं । असं मला सांगतय मन । बोला आपण ! ॥

चाल

वाटेल तें तुम्ही हो करा । बेत तुमचा आवडेना मला ।

मी जातो पुरंदराला । सर करतों पुरंदर किल्ला ।

तुम्ही जावं सिंहगडाला । शिव्याचा धाक नको मला ।

मी धरीन त्याच्या कानाला । अन् फरफटत नेइन दिल्लीला ।

तो कुत्रा करतो काय मला ? । तुम्ही खास फितुर हो झाला ।

म्हणुनि बोलता असल्या बोलाला" । असं म्हणुन चालला दिल्लीर पुरंदराला ॥

डोईची पगडी काढून ठेवली भूमीला । अन् बोलला खान आपणाला ।

’सर करिन पुरंदर किल्ला । तरच घालीन पगडी डोक्याला’ ।

असा त्यानं निश्चय केला ! अन् मग मोठी फौज घेऊन तिकडं चालला ॥४॥

चौक ५

गडामध्यें पुरंदर गड । मोठा अवघड ।

भयंकर चढ । धडधडे ऊर बघुन त्याला ।

दिल्लीरखान खिन्न झाला । निराशा झडपी हृदयाला ! ॥

पर मोठी हिय्या धरुन । फौज घेऊन । चाल्‌ला जल्‌दीनं ।

पुरंदर किल्ल्याखालीं आला । देश जाळून फस्त केला ।

किल्ल्याला वेढा त्यानं दिधला ॥

चाल

इकडं शत्रु पन्नास हजार । वर मावळे दोन हजार ! ॥

इकडं वेढा घाली दिल्लीर । वर होता बाजी मुरार ॥

पसरला सेनासागर । मधें पुरंदर कमळ ॥

पुरंदर कमळ सुंदर । वर शोभे देव मुरार ॥

चाल

मुरारबाजी शूर सरदार । योद्धा घनघोर ।

शिवबाचा प्यार । झाला तय्यार झुंजण्याला ।

फिकीर जीवाची नव्हती त्याला । किल्ल्याचा बंदोबस्त केला ॥

धान्याची तरतूज केली । किल्ल्यावर भली ।

शस्त्रं जमविली । तोफ चढविली हो बुरुजाला ।

कडेकोट बंदोबस्त केला । झाला तय्यार झुंजण्याला ॥

चाल

मुरारबाजीनं बेत केला । गनीमाचा लोक फार आला ।

भेडसवावं दिल्लीरखानाला । म्हणून पठाणाचा वेष केला ।

मावळा पांचपन्नास मदतीला । रात्री किल्ल्याच्या खालीं केला ।

शत्रुच्या छावणीमंदि शिरला । रखवालदार ठार केला ।

दारुगोळा सारा लुटून नेला । अन् चट्‌कन किल्ल्यावरती गेला ! ।

यवन मग उठला पहांटेला । बघतो दारुच्या कोठाराला ।

अन् मारतोय हात कपाळाला । आज काय दारुगोळा नेला ।

उद्यां काय चोरटा हल्ला केला । परवां ठार केला शिपायाला ।

बभ्रा हा रोजच्या रोज झाला ! । एकदां रात्रीच्या समयाला ।

मुरारबाजीनं, पंचवीस जणं, मावळे घेऊन, वेश बदलून हल्ला केला ।

पठाण सार होता झिंगलेला । मुरारसिंहानं हल्ला केला ।

तलवारीनं चिरलं कितीकाला । यवन खडबडून जागा झाला ।

हात मग मारतोय तोंडाला । तोबा ! तोबा ! सैतान हा आला ।

पळतो वाचवायला जीवाला । कितिक दरीमंदि खाली पडला ! । ऐकावं र दादा ॥

चाल

मग झाला रागानं लाल दिल्लीरखान ।

म्हणे ’ठार करिन सैतान तलवारीनं ।

उद्यां शर्थ करुन हा खास गड जिंकीन’ ।

वर्णन पुढच्या चौकांत पुढं सांगीन ॥५॥

चौक ६

निकराचा हल्ला मग केला । सुरुंग लावला ।

गडाच्या बुरुजाला । तोफांचा मारा वरनं झाला ।

सुरुंग लावणारा ठार केला । मुडद्यांचा मोठा ढिगारा पडला !।

धडधडा धुम् धुम् धडधडा । आवाज कडकडा ।

गोळे धडधडा । धडकती येऊन बुरुजाला ।

बुरुज कोसळला धरणीला । आणीबाणीचा काळ आला ! ॥

चाल

शत्रु होता पन्नास हजार । वर मावळे दोन हजार ॥

तरी त्यांनीं केलं बेजार । दिल्लीर झाला दिलगीर ! ॥

परि फौज होती अनिवार । मुरारबाजी काय करणार ? ।

तरी त्यानं केला बहु जोर । कितीकांना केलं हो ठार ! ॥

चाल

ढांसळला बुरुज किल्ल्याचा ! मुरारबाजीचा ।

बुरुज हृदयाचा । त्वेषानं लालेलाल झाला ! ।

मावळे घेऊन हल्ला केला । गातों मी त्याच्या पोवाडयाला ॥

शत्रूंचा हल्ला उधळला । मुरार परतला ।

खान वेडा झाला । बघून मुराराच्या प्रतापाला ।

मग त्यानं दुसरा बेत केला । पुरंदर किल्ला जिंकण्याला ! ॥

चाल

पुरंदरच्या एका बाजूला । एक किल्ला होता दुसरा ।

वज्रगड म्हणती हो त्याला । त्या किल्ल्यावरनं डागाव्या तोफा या वेळा ॥

मग पुरंदर किल्ल्याला । थडकेल जोरानं गोळा ।

असा बेत खानानं केला । अन् तिकडं मोर्चा फिरविला ।

बाबाजी बोवाजी वरती होता त्या वेळा । यशवंतराव त्याचा हो भाऊ धावला मदतीला ॥

दोघांनीं नेट फार केला । धारातीर्थीं देह टाकला ।

खानानं किल्ला सर केला । तोफखाना वरती चढविला ।

काळ मोठा कठिण हा आला । आतां पुरंदर खास गेला ।

असं वाटलं मुरारबाजीला । निकाराचा विचार त्यानं केला ।

मग बोलला आपल्या बायकोला । सांगेल शाहीर आतां पुढच्या चौकाला ॥६॥

चौक ७

मुरारबाजी बोले बायकोला । "आला हा घाला ।

आज किल्ल्याला । शिकस्तीचा यत्‍न मी केला ! ॥

किल्ल्याचा बुरुज तडकला । ढांसळून गेला ।

शत्रु हा आला । निकराचा काळ ग आला ।

थोडासा उशीर जर झाला । होईल घोंटाळा ।

आज या वेळा । सर करील शत्रु हा किल्ला,

लाज आम्हांला ॥ जर किल्ला हातचा हा गेला ।

डाग कीर्तीला । जन्मभर जडला ।

कसं काळं तोंड दाखवूं मी शिवरायाला ॥

जावं अस्सं याच घटकेला । शत्रु चिरण्याला ।

वाटतंय मजला । धारातीर्थी देह टाकून जावं या वेळा ॥

चाल

पर पाश एक जीवाला । प्रेमाचा तुझ्या ग झाला ! ॥

कसं तोडू प्रेमपाशाला । ही एक चिंता ग मजला ॥

चाल

तव नेत्र सोडिती बाण । जाती भेदून ।

हृदय या वेळा । तव लाल अधर मोहती सखे !

हृदयाला ! ॥ करपाश तुझे बलवान ।

गुंतलों हरिण । तडफडे मीन ।

कर्तव्यकर्म परि असं आलं दारुण ॥

चाल

काळ इतक्या वर्षांचा गेला । सुख नसे तुझ्या वांटयाला ॥

सदानिदा जातों स्वारीला । सोडुनी सखे ! मी तुजला ॥

काय पाप पूर्वजन्मीला । केलस ग ठाव कोणाला ? ॥

म्हणुन पती असा हा आला । सखये ! ग तुझ्या दैवाला" ॥

चाल

बोलला असे हे बोल । प्रेम-कल्लोळ ।

हृदयिं खळखळले ! । भेटाया तिला नेत्रांतुन मग ते आले ! ॥

प्रेमानं मिठी मारुन । झाला एक क्षण ।

स्तब्ध ते वेळा । पण अश्रु टपटपा गालावर गळला ! ॥

चाल

प्रियपत्‍नी बोले मग त्याला । जरि जीव व्याकुळ झाला ॥

"नका होऊं खिन्न या वेळा । प्रेमाच्या तोडा पाशाला ॥

चाल

तुम्ही शूरवीर रणधीर । पंचानन रणझुंजार ! ॥

किती जन्म नवस मी केले । म्हणुनी मी भार्या झाले ॥

अजि नाथ ! भाग्य मम फुललें । म्हणुनी मी भार्या झालें ॥

अबलेला तुम्ही वरलें । हें शरीर पावन केलें ॥

चाल

कर्तव्यकर्म आचरतां । धर्मार्थ तनू ही पडतां ।

होईल सौख्य मज नाथा ॥ झणी तोडा मम पाशाला ॥

हें राज्य नसे शिवबाचें । हें राज्य देव-धर्माचें ! ॥

माजलें बंड यवनाचें । होतात हाल अबलांचे ! ॥

पर्व हेंच स्वातंत्र्याचें । धन्य, जो रणावर नाचे ॥

चाल

मी वीरपत्‍नी, तुम्ही वीर । गाजवा रणीं समशेर ।

होउं द्या युद्ध घनघोर । जा पाशा तोडुनी सारा ! ॥

पण क्षण एक गडे ! थांबाबं ! मी पंचारती आणीन ॥

अक्षता भाळिं लावीन । प्रेमानं दृष्ट काढीन ॥

डोळाभर मग पाहीन । मग निरोप मी देईन" ॥

चाल

बोलली अशी ती अबला । डोळ्यांतुन अश्रु गळला ।

गद्‍गदा कंठ गहिंवरला । ओंवाळुनि मग नाथाला ।

जाहली धन्य ते वेळा ! ॥७॥

चौक ८

जगदंबा मातेचं सत्वर करुनी स्मरण ।

प्रिय पत्‍नीकडे शेवटली दृष्टि टाकून ।

शेंपाचशें मावळे रणवीर संगें घेऊन ।

ढाल फिरंग करिं घेऊन । चालला वेगानं । शिवाचा बाणा ॥

जसा सिंह चवताळुन दरीमधुन तो यावा ।

एकाच झडपेनं मस्त हत्ती फाडावा ।

तसा दिसला डोळ्याला मुरारिचा देखावा ।

तो प्रसंग कविला कां न च स्फूर्तिद व्हावा ? ॥

का वीर्यवृत्तिचा मूर्तिमंत हा पुतळा ! ।

अभिमन्यु बाळ हा किंवा दुसरा नटला ! ।

कां प्रलयसिंधु हा शिखरावरुनी सुटला ! ।

यवनांचा कराया अंत । जोरानं जात ।

तेज उधळीत । आज या वेळा ! ।

तंवा बसला होता हत्तीवर दिल्लीरखान ।

त्यानं पाहला वरनं येतांना मुरार खवळून ।

थरथरलं ऊर खानाचं त्याला पाहून ! ।

म्हणे, "सिंह आला रे आला । फाडाया मला । जबडा उघडून" ॥

खणखणले भाले तलवार । झुंजती वीर ।

म्हणती ’हर हर महादेव’ वीर गुंग झाला ।

लढाईचा कैप त्यांना चढला । प्रेतांचा ढीगच्या ढीग पडला ।

हाडकारक्तांचा काला झाला ! ॥ केली शर्थ मुरारबाजीनं ।

कितीक कापून । आला जोरानं । खानानं पाहिलं समोर त्याला ।

होता रक्तानं मुरार न्हाला । जणूं काय सूर्य उगवणारा ! ॥

चाल

खान बोलला मुरारबाजीला । "पाहुन रे तुझ्या शौर्याला ।

हा खान खूष फार झाला । घे कौल आज या वेळा ।

अन् ये शरण आज खानाला । शिफारस करीन शाहाला ।

अन् चढवीन मोठया हुद्याला । नाहींतर मरशील व्यर्थ या वेळा" ॥

ऐकून शब्द खानाचे मुरार लाल झाला ॥ मग बोलला वीर खानाला ।

"काय येऊं शरण तुर्काला ? । काय विकूं देह मानाला ।

हा देह दिला धर्माला । हा मुरार बळी पडणार नाहीं मोहाला ॥

एक वेंळ गळेल भूमिला अढळ ध्रुव तारा ॥

पण मुरारबाजी हा सदा अढळ रे झाला ! ॥

देहाचा चूर जरि झाला । तरि फिकीर नाहीं रे मला" ।

असं बोलला वीर खानाला । खान हत्तीवरनं उतरला ।

अन् दोघांचा संग्राम झाला । गर्जती वीर ते वेळा ।

कानठळी बसली कानाला ! । दैवाचा घाला पण आला ! ।

मुराराच्या हातावर वार जोराचा झाला । ढाल पडली खालीं भूमिला ।

मग शेला बांधला हाताला । आणि वीर गर्जूं लागला ।

खानावर वार त्यानं केला । पण तो वार निसटून गेला ।

इतक्यांत खानानं सोडलं एका तीराला ! ॥ तीर लागला मुरारबाजीला ।

तीरानं तोडलं डोक्याला । शिरकमळ पडलं धरणीला ! ॥

तरी धडानं कहर तो केला । धूळ चारली तीनशें यवनाला ।

मग कोसळलं धड धरणीला ॥ जीवानं सोडलं देहाला ।

’स्वातंत्र्यदेविच्या गळ्यांमधुन मणि गळला !" ॥

धर्मार्थ देह खर्चून धन्य तो झाला !! ॥८॥

चौक ९

देहाचे तुकडे जमविले । किल्ल्यावर नेले ।

मावळा मग बोले । मुरारबाजीच्या बायकोला ।

"बाईसाहेब ! मोठा घात झाला । जिवाचा मोहरा ठार झाला ! ॥

प्राण आमुचा सोडुन गेला ॥ झाला घोटाळा ऐन वेळेला ।

खान घेईल आतां किल्ल्याला ॥ काय आम्ही करावं बोला ।

अशा निकराच्या समयाला ? ॥ नाथाचं प्रेत पाहून ।

साध्वीचं मन । भरलं दुःखानं । एक क्षण आली घेरी तिजला ।

डोळ्यांतुन अश्रु फार गळला । अंगाला कंप सारा सुटला ! ॥

चाल

पण दुःख सारं आवरुन । त्वेषानं लाल होऊन ॥

बोलली साध्वी जोरानं । पळतांना मावळा पाहून ॥

"कुठं जातां धीर सोडून । मी आलें खड्‌ग घेऊन ।

द्या दुष्ट शत्रु हांकलून । जा ! मरा ! झुंज झुंजून" ॥

चाल

असं बोलली साध्वी मावळ्यांला । नवर्‍याच्या प्रेतावर शेला ।

टाकून गेली युद्धाला । मावळ्यांना चेव तंवा आला ।

अन् करती घोर युद्धाला । खानानं पाहिलं वर तिला ।

अन् तोंडात घातलं बोटाला । मग बोलला आपला आपणाला ।

"सैतानखाना हा झाला । आतां औरत आली लढण्याला ! ।

सोडावं आतां नादाला । काढावं आतां वेढयाला ।

सर करणं असल्या किल्ल्याला । फार बिकट काम हें मला" ।

असं म्हणून वेढा काढून खान चालला ॥ मग साध्वी आली माघारा ।

पालखींत घातलं प्रेताला । अन् पालखी घेऊन चालली रायगडाला ॥

शिवराज आले सामोरा । गडावर नेलं पालखीला ।

शिवराज व्याकुळ झाला ! । खालीं काढलं त्यानं प्रेताला ।

अन् ढळढळां रडूं लागला ! । जिजाबाई बोलली साध्वीला ।

"बाई ! उपमा नाहीं ग तुला । देशाला प्राणपति दिलास् ।

अन् राखलस् ग तूं ही किल्ल्याला ॥

चाल

त्वत्समान शंभर अबला । जर मिळतिल या देशाला ॥

जाईल दुःख विलयाला । चमकेल सुखाचा तारा ॥

चाल

तव पती जाहला धन्य ! । या समान कोणी न अन्य ।

चिरकाल जोडलं पुण्य । हा वंद्य तीनि लोकांला" ॥९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel