चौक १

ज्यांची त्रैलोकीं कीर्ति गाजती । जो दक्षिणाधीपती ॥

शिवाजी छत्रपती । रणांत ज्यानें गाजविली तलवार ।

तानाजी मालुसरे त्यांचा सुभेदार । तसा नाहीं योद्धा हल्ली मिळणार ॥ध्रु०॥

महाड संस्थानांतिल छोटे । गांव ऊमराठे ।

कोंकण तें मोठें । डोंगराळ देश जंगल चोरवाट ।

मावळे लोकांची वस्ती आटोकाट । वनश्री रम्य दिसे आफाट ॥

त्या खेडयांतील राहाणार । तानाजी वीर ।

मराठा शूर । शिवाजिशी त्याची मैत्रि असे दाट ।

लहानपणापासून फक्त दुजे ताट । अशापरि त्यांनी जुळविला घाट ॥

अशा परिवारात तानाजी । दिसे रणगाजी ।

उमेद नित्य ताजी । अंगलोट वळण बाभळिची गांठ ।

भव्य दिसे चेहरा कल्ले असे दाट । मिशा पिळदार सदोदित ताठ ॥

चाल : जी जी जी जी

सडपातळ पण शत्रूस काळ दिसतसे जी जी ॥

पाणीदार डोळे त्याच्याकडे पहावत नसे जी जी ॥

निमगोरा वर्ण सिंहापरि भासत असे जी जी ॥

त्या वज्रापरि द्वयहस्त भासती जसे जी जी ॥

लोखंडासारख्या मांडया पोटर्‍या दिसे जी जी ॥

पांच हजार जोर एका दमांत काढित असे जी जी ॥

बैठकी वगैरेस त्याच्या गणती नसे जी जी ॥

मेहनतीच्या जागी घामानें चिखल होतसे जी जी ॥

त्यास आकनि पुलाव्याचें खुराख लागत नसे जी जी ॥

भाकरीवर मुठीनें तीळ पिळुन खातसे जी जी ॥

पैलवान आताचे पहा नाजुक तब्येती कसे जी जी ॥

कित्येकांस पुरी बासुंदीचा घास लागतसे जी जी ॥

चाल-गिलच्याची

असा वीर मावळा तानाजी खंदा तो निपजला ॥

छत्रपती शिवाजीस लहानपणापासून मित्र हा भला ॥

दांडपट्टा मर्दुमकी भिनलेली त्याच्या हाडा-मांसाला ॥

पूर्ण प्रेम शिवाजीचें म्हणून सुभेदारी दिली तानाजीला ॥

तानाजीच्या मदतीनें शिवाजीनें कैक किल्ला सर केला ॥

शिवाजीची मातुश्री जिजाबाई नित्य बोले शिवाजीला ॥

शिवबा तुजला तानाजी हा बंधुच आहे धाकला ॥

त्यावेळी औरंजेब बादशहा होता दिल्ली तक्ताला ॥

हिंदु लोकांचा द्वेष बादशहाचे मनीं भरलेला ॥

तेणेंकरुन हिंदुवर जुलमाचा कहर अती उसळला ॥

चाल : मिळवणी

यासाठीं शिवाजी वीर । घेऊनि अवतार ।

आले भूवर । अजरामर कीर्ति केली अनिवार ।

तानाजी मालुसरे त्यांचा सुभेदार । तसा नाही योद्धा हल्ली मिळणार ॥१॥

चौक २

सिंहगड आणखी भुलेश्वर । सात कोसावर ।

पुण्यापासून दूर । डोगरांच्या ओळी नैऋत्येला ।

त्यांत एक सुळका वरती गेला । त्यावर आहे कोंडाण्याचा किल्ला ॥

याच किल्ल्याविषयीं तानाजीचा । भाग शूरत्वाचा ।

वर्णितो सांचा । प्रथम किल्ल्याच्या माहितीला ।

देऊन निवेदितो भाग पुढला । लक्ष असो विनंति ही सकला ॥

कोंडन किंवा कौंडिण्यपूर । पायथ्यावर ।

हल्लीं खरोखर । कौंडिण्य ऋषीच्या आश्रमाला ।

म्हणतसे कोंडाण्याचा किल्ला । हल्ली म्हणती सिंहगड त्याला ॥

तीन हजार तीनशें फूट महान्‌ । समुद्रापासून ।

उंची प्रमाण । पुण्याच्या सपाटीपासून धरला ।

अडीच हजार फूट उंच भरला । आहे प्रचंड किल्ला असला ॥

कल्याण व पुणें असे दोन । दरवाजे महान ।

आज मितिस छान । दिसत आहेत पहा सकलां ।

झुंजार बुरुज उत्तरेला । कलावंतिणीचा दक्षिणेला ॥

( चाल : दुकानें औषधवाली )

या किल्ल्याविषयींची कहाणी हो । थोडिसी कथितो या स्थानीं ॥

नागनाइक नामें कोळीराजाच्या । ताब्यांत होता किल्ला हा त्याच्या ।

त्याच्यापासून यवनांनी हो । घेतला होता जिंकोनी ॥

अहमदनगरच्या अमदानींत । शहाजी राजांच्या तो होता ताब्यांत ।

सत्य जाणतिल ज्ञानी हो । डोलतील वार्ता ऐकोनी ॥

त्रिंबकच्या सुभेदारानें जिजाबाई साहेबांना । पकडून नेऊन सोडून दिल्यावर त्यांना ।

कोंडाण्याचे ठिकाणीं हो । राहिल्या होत्या येवोनी ॥

व्रिजापूरकरानें पाठलाग करितां । शहाजी दडून याच किल्ल्यांत होता ।

सत्य घ्यावे परिसोनी हो । इतिहास देतो समजोनी ॥

चाल : गिलच्याची

पुढें विजापुरकराकडे शहाजीने धरली नोकरी ।

किल्ला विजापूरकरांच्या ताब्यांत गेला गोष्ट ही खरी ।

पुणें प्रातांच्या संरक्षणार्थ हाच किल्ला बहुपरी ।

ज्यांचें त्यांचें लक्ष याच किल्ल्यावर जात असे सत्वरी ।

शिवाजीमहाराजांनी स्वराज्यांचें तोरण ज्या अवसरीं ।

तोरणा किल्ल्यावर बांधुन कोंडाणाहि घेतला तो सत्वरी ।

अशी दिली माहिती किल्ल्याची तात्पर्यांत अपुरी ।

चाल : मिळवणी

ज्यानें स्वतः हिमतीनें किल्ला । लढून सर केला ।

घोर समयाला । तोच शिवछत्रपतिचा सरदार ।

तानाजी मालुसरे बहादर सुभेदार । तसा नाहीं योद्धा हल्ली मिळणार ॥२॥

चौक ३

वर्णूं तानाजिची बहाद्दरी । तो शूर केसरी ।

शत्रुस काळ परी । नांव ऐकता दुष्ट मोंगलांस ।

भीतिनें हींव भरत होतें त्यास । होऊन गेला खंदा वीर समयास ॥

तानाजी व सूर्याजी दोघे बंधू । कल्पनेचा सिंधू ।

जणू का रवि इंदू । हेच दोन्ही हात शिवाजीचे खास ।

यांच्या सहाय्यानें मराठी राज्यास । स्थापिलें शिवाजीनें दक्षिण देशास ॥

कोंडाणा किल्ला घेण्याचा । हेतु शिवाजीचा ।

निश्चित होऊन साचा । कळविला बेत या दोघा बांधवास ।

ऐकून आले स्फुरण दोन्ही योध्यांस । म्हणति महाराज आज्ञेचाच अवकाश ॥

शिवाजीची मातुश्री जिजाबाई । वीराची माई ।

तानाजी लवलाही । बंधुसह घेतां तिच्या दर्शनास ।

आशिर्वचनांत बोलली त्यांस । तुम्हीच पाठीराखे माझ्या शिवबास ॥

जसे धर्मास भीम अर्जुन । पराक्रमी महान ।

तसे धैर्यवान । बंधुवत्‌ तुम्ही शिवाजीस खास ।

करुन साह्य राखाल हिंदुधर्मास । कराल बंधमुक्त हिंद देशास ॥

चाल : जी जीजी

जिजाबाई बोले आहे भवानी तुम्हां साह्याला ॥

याची खात्री आजपर्यंतची आहेच तुम्हांला ॥

करुनिया मुजरा तानाजीनें निरोप घेतला ॥

उमराठें गांवी येऊन लागला पुढिल तयारीला ॥

शूर शिपाई निवडक मावळे काढले बाजूला ॥

प्रत्येकाच्या जवळ जंबिया व बर्ची भाला ॥

तिरंदाज लोकांचा कंपू वेगळा केला ॥

घोडे आणखी उंटावर बाण भरले समयाला ॥

किल्ल्यावर चढविण्यास तिनशें घोरपडवाला ॥

खंडापट्टा बोथाटया परज समशेरवाला ॥

कडेकोट तयारीनें मावळा लोक जमला ॥

चाल : गिलच्याची

प्रत्येकाच्या चेहर्‍यावर वीरश्री तेव्हां चमकुं लागली ।

तलवार चमकती जणू काय ढगांतील बिजली ।

केली सर्व फौजेची तयारी उणीव नाहीं राहिली ।

बोले बंधु सूर्याजी तानाजीस वेळ आहे चांगली ।

इच्छा आहे माझी थोडया लोकानिशीं जावें मी त्या स्थलीं ।

येतों किल्ला सर करुन दादा मज हुकूम व्हावा या कालीं ।

वेळ पडेल तर मग मागाहुन यावें तुम्ही त्या स्थलीं ।

चाल : मिळवणी

शिवाजीचे विश्वासू दिलदार । बाजी फसलकर ।

येसाजी हुषार । पुष्कळ होते पण कुशल लढणार ।

तानाजी मालुसरे बहाद्दर सुभेदार । तसा नाही योद्धा हल्लिं मिळणार ॥३॥

चौक ४

सूर्याजीस बोले तानाजी । शाहाब्बास सूर्याजी ।

आहेस रणगाजी । वाटेल तेवढी फौज तू जा घेऊन ।

येउं नये शत्रुस पाठ दावून । उजाडण्यापूर्वी गांठ जाऊन ॥

सूर्याजीचा गनीमी कावा । कुणास समजावा ।

घेऊन फौज तेव्हां । व्याघ्र जणुं गर्जु लागे खवळून ।

तसा सूर्याजी चौताळून । गर्जे हरहर महादेव म्हणून ॥

जसा पारधी श्वापदासाठीं । टपून त्यांस गांठी ।

तशीच हातोटी । किल्ल्यातटीं भिडला सरसाऊन ।

चालविला मारा दांत खाऊन । थरारले आंतिल वीर पाहून ॥

उदयभानू रजपूत सरदार । होता किल्लेदार ।

हाडाचा शूर । फसला यवनांचें दास्य करुन ।

जात्याभिमानास गेला विसरुन । अधर्मकर्दमीं पडला घसरुन ॥

त्याची पत्‍नी नांव प्रभावती । खरीच प्रभावती ।

पतिव्रता सती । प्रार्थीत नित्य देवास कळवळून ।

रजपूत तेज गेलें कुठें मावळून । अधर्मानें टाकियलें आवळून ॥

ऐसा सतीचा पति तो किल्लेदार ॥ धूर्त बुद्धि फार ।

त्यानें किल्ल्यावर । रजपूत शिपायांना धैर्य देऊन ।

तोफा दिल्या तटावरती ठेवून । दिली सरबत्ती खालीं पाहून ॥

चाल : साधी

तोफांचा वरुन भडिमार । सारे दणाणले अंबर ॥

बंदुका उडती अनिवार । जणुं गारावृष्टी अनावर ॥

लालभडक गोळे अंगार । पहातां हातपाय थंडगार ॥

पण निधडया छातीचे हे वीर । मावळे लोक बहाद्दर ॥

त्यांना साह्य भवानीशंकर । तेथें काय कुणाचें चालणार ॥

बिन मार्‍यांची जागा सुंदर । त्यांना मिळाली होती भरपूर ॥

तेथून लपून बाण भराभर । होते सोडित मावळे हुषार ॥

केले वरिल बहुतेक लोक ठार । वरच्यांचे फुकट जाती बार ॥

अशी धुमश्चक्री तासभर । एकसारखि चालली अपार ॥

चाल : हो जी ची

तीस उंट बाण भरलेले हो । झाले खलास सूर्याजिनें पाहिले जी ॥

नाहीं अशानें भागत वाटले हो । जाऊन शत्रूस पाहिजे गांठले जी ॥

किल्ला अवघड उपाय खुंटले हो । चढण्यासाठीं इलाज खूप केले जी ॥

पांच वेळां थोडे वर चढले हो । पण थकुनि लोक खाली पडले जी ॥

सूर्याजीनें मनीं जाणिलें हो । आपल्या फौजेचे दोन भाग केले जी ॥

अर्धे किल्ल्याच्या पिछाडिस नेले हो । अर्धे तेथेंच लपवुन ठेविले जी ॥

पिछाडिच्या बाजुनें आलेले हो । लोक किल्लेदारानें पाहिले जी ॥

चाल : मिळवणी

कावा गनीमी सूर्याजीनें केला । शत्रुस फसविला ।

ऐकून समयाला । शिवाजी मनीं थक्क झाला अनिवार ।

तानाजी मालुसरे बहाद्दर सुभेदार । तसा नाहीं योद्धा हल्लीं मिळणार ॥४॥

चौक ५

लोक पाठविले मागिल बाजूला । फसविले शत्रूला ।

गनिमी कावा केला । खात्री झाली उदयभानुची खास ।

मोर्चा वळविला पिछाडी भागास । साधला डाव सूर्याजी वाघास ॥

पिछाडीवर सुरु केला मारा । किल्ल्यांतुन सारा ।

उदयभानु खरा । वीर पण गांगरला समयास ।

मावळा लोक हुषार दडून आसर्‍यास । भुलवी जसा चित्ता व्याघ्र हरणास ॥

जणुं बावरली भेकरें । रजपूत वीर सारे ।

कावरेबावरे । होऊनिया म्हणती एकमेकांस ।

सैतान बडा भारी हाय ये बदमाश । इसका नहीं लगता म्हणति अदमास ॥

सूर्याजीनें विचार असा केला । मागील बाजूला ।

शत्रु गुंतला । आपण चाल करावी पुढील भागास।

फोडुन किल्ल्याचे दरवाजास । घुसावें आंत हेंच उचित आपणांस ॥

आपल्या लोकांस म्हणे सूर्याजी । वीर हो गाजी ।

धनी शिवाजी । यानें धाडिले आहे आपणांस ।

अधर्माने ग्रासलेल्या देशांस । उद्धरायासाठीं आला तो जन्मास ॥

चहुंकडे झाला भ्रष्टाकार । हिंदुलोकांवर ।

जुलुम अनिवार । म्हणून आली दया श्रीशंकरास ।

घेऊनी अवतार शिवाजी रुपें खास । प्रगटला हिंदु धर्म रक्षणास ॥

चाल : लगट

आम्ही तुम्ही हिंदुचे बच्चे । हाडाचे सच्चे ।

नव्हे अर्धकच्चे । दर्जा आमचा उच्च ।

असुनी हे लुच्चे । मानती आम्हा तुच्छ ।

मोराचीं पिच्छें । बांधुन अंगाला ।

हे बगळे गडयांनो दटाविती हंसाला ॥ यास्तव धैर्य मनीं धरा ।

आठवा उमावरा । कीं शंभो हरा ।

म्हणुन ललकारा । करुनिया त्वरा ।

किल्ल्यामध्यें शिरा । शत्रुजन धरा ।

कापा चरचरा । दावा शौर्याला ।

अजरामर करुं या सनातन धर्माला ॥

ऐकतां लोक कडेकोट । थरारुन उठले चावती ओठ ।

माजले हत्ती खावोनी रोट । सिंहाचे बच्चे फोडूं त्यांचा गोट ।

कटयारी खुपसुन फाडूं पोट । टाकूं कडयाखाली बांधुनी मोट ।

शत्रूला दाऊं शौर्य अलोट । छातिवर बसून नरडीचा घोट ।

घेऊं समयाला । असें म्हणून धांवले खूप चढुन त्वेषाला ॥

जाऊन भिडले दरवाज्यावर । बंद दरवाजा मजबूत फार ।

लोखंडी तगड परते हत्यार । मग सूर्याजी करित सुविचार ।

मराठे वीर आम्ही बहाद्दर । आम्हांस काय दरवाज्याची खातर ।

म्हणून तीस हात उंच तटावर । मोकळया पायानें चढले भराभर ।

तया वेळेला । दुर्ग लंकेचा हे वानर भेदिती त्याला ॥

चाल : महासागरी हाय हाय हाय

बहाद्दर ते मावळे लोक । दाविलें खर्‍या शौर्याला ॥ध्रु०॥

तटावरुन आंत जावोनी । दरवाजा उघडिला त्यांनीं ॥

मावळा लोक आंत शिरला । एकदम चढविला हल्ला ॥१॥

बंदुका तीर बंद पडले । हातघाईवर वीर भिडले ॥

समशेरी चमकती भाले । खणखणाट त्यांचा उडाला ॥२॥

भेदाया चक्रव्यूहाला । अभिमन्यु बाळ जणु शिरला ॥

असा भास मनाचा झाला । त्या पाहुन सूर्याजीला ॥३॥

जणू गज कमलें उपटोनी । टाकितो तडागांतूनी ॥

तशीं शत्रु-शिरें छेदूनी । टाकितां सूर्याजी दिसला ॥४॥

चाल : मिळवणी

’जय शिवाजी’ म्हणुन करी वार । घावांत दोनचार ।

शत्रु होती ठार । शिवाजीच्या होत आनंद मनीं फार ।

तानाजी मालुसरे बहाद्दर सुभेदार । तसा नाहीं योद्धा हल्लीं मिळणार ॥५॥

चौक ६

असे चाललें रणकंदन । दुमदुमलें रण ।

वीरांचें आक्रंदन । धुळीनें व्यापियला तो ठाय ।

शत्रु किंवा मित्र त्यांत ओळखाय । समजेना म्हणती करावें काय ॥

रजपूत लोक लढती बेभान । मोठे धैर्यवान ।

लढाऊ महान। मरती पण मागे घेतीना पाय ।

कौरव पांडवांचें युद्धच कीं काय । असें लागलें मनीं बाटाय ॥

तानाजीनें किल्ल्यापासून दूर । बर्‍याच अंतरावर ।

फौज तय्यार । ठेवुन होता बैसला आठवित शिवराय ।

लढाईचें वर्तमान तरी काय । अजुनी कोणि येईना म्हणे सांगाय ॥

शिवाजीचा सेवक बहिर्जी । मावळा तो फर्जी ।

शिवाजीची मर्जी । त्याच्यावर पूर्ण, कारण ते काय ।

हेराच्या कामीं कुशल शिपाय । नंबर एक अचूक बातमी घ्याय ॥

तो बहिर्जी लढाईतून । बातमी पूर्ण ।

आला घेऊन । घडलेलें वर्तमान ऐकाय ।

तानाजीची उत्कंठा वर्णाय । कविमति गुंगलि सुचेना काय ॥

सूर्याजीचा पराक्रम खरा । ऐकुन खुले चेहरा ।

अंग फरफरा । फुगून लागला मन डोलवाय ।

वीराचाच बच्चा धन्य त्याची माय । लांडगे ते म्हणति वाघापुढें काय ॥

(चाल : मी माळिन तूं फुलमाळी )

इतक्यांत निरोप दुजा आला । वीरश्रींत साधली संधि कशी चिंतेला ॥ध्रु०॥

हिरोजी नामे नोकर जो शिवाजीचा दुसरा । महाराजाची आज्ञा म्हणे आज युद्ध बंद करा ॥

उद्या सकाळी तुम्हास येइल मदत ती । येइल किल्ला सहजचि मग आपुले हातीं ॥

म्हणे आतां करावं कसं याला । चहुबाजूंनीं पडला पेंच तानाजीला ॥१॥

मदतीसाठी महाराजानीं का घाई केली । गडावरती फौज सूर्योदया पूर्वींच गेली ॥

म्हणोनी मीही निघालों तिकडेच आतां । नाइलाज न ये लढाई बंद ठेवितां ॥

दिलगिरी वाटति मनाला । याचि क्षमा व्हावि सांग विनंति महाराजांला ॥२॥

इतक्या अवधींत ऐका हकिगत किल्ल्यांतली । असंख्य शत्रू संहारिले सूर्याजी तो महाबली ॥

एक्या अमृतास्तव देवादिकें समुद्र मंथियला । तसा सूर्याजी उदयभानूस कीं शोधूं लागला ॥

म्हणे उदयभानु हा कसला । उदयाचल सोडुनि कुठें गेला अस्ताला ॥३॥

उदयभानूचा मेहुणा मोहनलाल यानें । पायीं वार करुन पळाला तो मागल्याबाजूनें ॥

अपघातें वार लागता जखमी तो झाला । धिक्कार असे म्हणतसे रजपुतांच्या कुळीला ॥

होतां जखमी वेढिलें त्याला । जणुं चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू सांपडला ॥४॥

( चाल : मज टाकुनी बाळा जासी )

सूर्याजी शत्रूंनीं धरला । मराठयांचा तो धीर तूटला ॥ध्रु०॥

मालुसरा । आहे दुसरा ।

तानाजी तो । आणाया ।

समरीं त्या । आम्हीं जातो ।

असे बोलुन मावळे फिरले । तानाजी सन्मुख आले ।

पण चेहरे हिरमुसलेले । काय बरें ।

झालें खरें । सांगा त्वरे ।

तानाजी त्या पुसूं लागला ॥१॥

सूर्याजिला । कैद केला ।

शब्द येतां । वाहवा रे ।

षंढ कां रे । तुम्ही दिसतां ।

कशि लाज तुम्हां नच त्याची ।

बुडवितां कुळी मराठयांची ।

मागें फिरा । शस्त्र धरा ।

चाल करा । भित्रा हा स्वभाव कुठला ॥२॥

अहा रे भूता । रजपूता ।

माजलासी । तूंच पाहे ।

गांठ आहे तानाजीशीं । आजपासुन तीन दिवसांत ।

तुला ठार करुन किल्ल्यांत । भगवें निशाण लावलें नाहीं त्यांत ।

तर कुलहीन । मी होईन ।

जीव देइन । लागो बट्टा माझ्या या कुळीला ॥३॥

(चाल : मिळवणी)

अशी घोर प्रतिज्ञा केली । शूरवीर बली ।

कीर्ति गाजविली । छत्रपति शिवाजीचा आधार ।

तानाजी मालुसरे बहाद्दर सुभेदार । तसा नाहीं योद्धा हल्लीं मिळणार ॥६॥

चौक ७

इकडे किल्ल्यांत घडलेले वर्तमान । करितों निवेदन ।

तानाजीचा पण । कथन करुं पुढें योग्य भागास ।

कुर्‍हाडीचा दांडा काळ गोत्रास । अशी एक व्यक्ति जाणतो समरास ॥

प्रभावती जवळ वाढलेला । भाऊ जोडलेला ।

मोहनलाल भला । त्याच्या मनीं कपट आलें समयास ।

उदयभानुचा व्हावा यांत नाश । म्हणजे किल्लेदारी मिळेल आपणांस ॥

असें जाणून त्यानें कारस्थान । योजिलें महान ।

आंगठी चोरुन । आणली त्यानें प्रभावतीची खास ।

शिवाय सूर्याजीस धरले वक्तास । घेतली होती त्याची आंगठी आपणास ॥

आतां करणार म्हणतो कारस्थान । अतिशय छान ।

जुळवितों संधान । किल्ला बादशहास किंवा मराठयास ।

कुणासही जावो, देणारे ते खास ।

किल्लेदारी याच मोहनलालास ॥ आधीं तुरुंगांत सूर्याजीपाशीं ।

वळवावें जाऊन त्याशीं । वेळ येइल तशी ।

करावी नवी युक्ती त्याच प्रसंगास । किल्लेदारी आहेच माझ्या नशिबास ।

असा झाला गर्क मनोराज्यांस ॥ दिवसा लढून रजपूत थकलेले ।

म्हणुन मद्य प्याले । झिंगत बैसले ।

तुरुंगावर पहारा लागला घोरायास । मोहनलाल मध्यरात्रीं सुमारास ।

शिरला तुरुंगांत काढुन कुलपास ॥

( चाल : पनघटु पर होरही धूम)

आंत जाऊनी मोहन त्यांस । वदत समयास कपटपटु झटकीं ॥ध्रु०॥

धरीं वाट तूं म्हणे सूर्याजीला । पहा दरवाजा उघडीला ।

निसट झट खास सटक झटपट कीं ॥१॥

सूर्याजी दचकुन पाही । म्हणे विपरीत सर्वच कांहीं ।

दिसत ही खास फुकट लटपट कीं ॥२॥

बोले मोहन आणखी त्याला । युद्धामध्यें पाहुन तुजला ।

मोह पडला प्रभावतिला कीं ॥३॥

झणिं सोडविण्याशीं तुजला । वेष बदलुन धाडिलें मजला ।

झाली ती खास आशक तुझ्यावर कीं ॥४॥

सूर्याजी कपट म्हणी सारे । साध्वी त्या रजपूतणी रे ।

नव्हे पापी, थाप तुझी लटकी ॥५॥

शिवाय शूर मराठा वीर । नव्हे चोरासारखा पळणार ।

नको तुझी जारे युक्ति शिळपट कीं ॥६॥

(चाल)

किल्लेदाराचा मेहुणा । मोहनलाल जाणा ।

बंधु प्रभावतिला । हो । होता मानलेला ॥१॥

लहानपणापासुन त्यांनी यास । पाळला होता खास ।

आतां उलटला । हो । जातीवर गेला ॥२॥

किती नीचपणा तरी मनीं । सूर्याजीस म्हणी ।

खरें वाटण्याला । हो । खूण पटण्याला ॥३॥

तिनें दिली आंगठी ही घ्यावी । कुलपाची चावी ।

मागिल दाराला । हो । चोरवाटेला ॥४॥

तेथुन तिच्याकडे जाया । वाट आहे राया ।

मंदीराला । हो । सूर्याजी चकला ॥५॥

म्हणी कपट पाहिजे कपटयासी । थाप द्यावी याशीं ।

याच वेळेला । हो । मोहनलालाला ॥६॥

तुझें म्हणणें खरे आहे बरे । जातों मी किरे ।

म्हणुन निघाला । हो । बाहेर पडला ॥७॥

बाहेर जाऊन म्हणतो मोहनलाल्या ।

बाहेर ये रे साल्या । वीर नाहीं भुलला ।

हो । तुझ्या कपटाला ॥८॥

(चाल : मिळवणी)

त्या नराधमासी साचा । जमालगोटयाचा ।

जुलाब जोराचा । सूर्याजीनें दिला छान खुबीदार ।

मोहनलालास पुरती आली गार । म्हणतो चिंता नाहीं घेइन समाचार ॥७॥

चौक ८

सूर्याजी गेला म्हणून याची । मोहनलालाची ।

कायली अंगाची । होऊन गेली आग तळव्याची मस्तकास ।

म्हणतां बच्चाजी नाहीं सुटलास । घालतों तुला वेगळाच गळफांस ॥

योजिले कृष्ण-कारस्थान । बनावट पत्रें दोन ।

स्वताहा खर्डून । शिपाई बनुन गेला राजवाडयास ।

उजाडण्यापूर्वी शिवाजी महाराजास । पत्र आणि आंगठी हुजुरास ॥

शिवाय सूर्याजी प्रभावतीवर । आशक आहे फार ।

वचन खरोखर । दिलें तिला, मदत करणार रजपुतांस ।

असा गुतला तिच्या मोहास । वाचविणार म्हणतो किल्लेदारास ॥

असें ऐकून कोप शिवाजीला । अतिशय आला ।

आलेल्या शिपायाला । निरोप देऊन, करित विचारास ।

शंकरानें विष गिळलें प्रसंगास । तसा पोटीं घाली शिवाजी रागास ॥

येथुन मोहनलाल वेषधारी । जाऊन सत्वरीं ।

तानाजीच्या करीं । पत्र दिलें दुसरें वाचुन पाहण्यास ।

फितुर आणि परस्त्रीचा अभिलाष । शब्द हे झोंबले त्याच्या काळजास ॥

लाल डोळे थरारले ओठ । अग्नीचा लोट । भडकला दाट ।

वाटे जणुं सूर्य कोपला खास । भस्म करणार जाळुन सर्वांस ।

तसा तानाजी दिसे सकलांस ॥

(चाल : आजिसाहेब)

गर्जे तानाजी रागानें धिक्कार असो तुजला ।

वीरसिंहा पोटीं सूर्याजी हा नामर्द कसा आला ॥

ज्यानें परस्त्रीच्या अभिलाषें स्वकुल धर्माला ।

जाळून फस्त केलें त्याचा शिरच्छेद पाहिजे केला ॥

जाऊन शिवाजी सन्मूख मजकूर निवेदीला ।

तेव्हां शिवाजीनें दाखविली आंगठी आणि त्याला ॥

ही पर्वा दिलेली मी आंगठी सूर्याजीला ।

पाहुन घेई तानाजी तू करुन खात्री तुझी तुजला ॥

गेला भडकून अग्नी त्यांत तेल मिळालें त्याला ।

मग नाहीं पारावार क्रोधाग्नि तो जाळित सुटला ॥

आधीं महाराज किल्ल्यामध्यें गाठून त्या अधमाला ।

ठार करुन सूर्याजीशी, नंतर सर करतों किल्ला ॥

महापातकी चांडाळा बंधु तूं आतां कुठला ।

तुं खुशाल फितुर होई कंठस्नान घालीतो तुजला ॥

झाला मनिं खूष मोहनलाल डाव म्हणे साधला ॥

आतां किल्लेदारीं जाती कुठें माझीच आखेरीला ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel