(चाल :- श्रीमंत पेशवे सवाई माधवराव ॥)

चौक १

श्रीभवानी पुढे कापिला अफझुला म्हैसा ।

बादशहाला भीति बडी बहुत डुबाया पैसा ॥

धारण पांचावर बसली वखत आया कैसा ।

धाडावा कोण इकडून, गनिम पकडून, आणिल जखडून, वीर कोण ऐसा ॥ध्रु०॥

रुस्तूम जमान बेगुमान सरदार शूर । तीन हजार स्वार पायदळ असूनी भरपूर ।

शिवाजीच्या पहिल्या धडकेंत जाहला चूर ।

मार खाऊन खाऊन वैतागें, पळाला मागें, गाठले वेगें, त्यानें विजापूर ॥

अल्ली अदिलशाहासी लागली चिंता हूरहूर ।

सरदार अमीर सर्वांचा उतरला नूर ।

खलबत करतां आठविला सरदार क्रूर ।

रणीं न खायेचि जो हार, शिद्दी जोहार,

धाडिता बहार, करिल तो शूर ॥

आणविला शिद्दी तो होता कर्नाटकीं दूर ।

सन्मान करुनी दिला किताब रणबहादूर ।

मदतीस फाजलखान जवान आतूर ।

सोळा हजार घोडेस्वार, पायदळ भार चाळीस हजार, सैन्य भ्यासूर ॥

चाल

दारु गोळा, तोफा बंदुका, पुरविन पैका निघा सत्वर, शिवाजीवर ॥

जय घेऊन येशील जरी देइन जहागिरी शिद्दी तुजवर माझी आहे नजर ॥

असे ऐकुनी संतोषला, घेऊनी आला सैन्य सागर, करविरावर ॥

चाल दुसरी

बादशहाचा हुकूम जंजिर्‍याचे शिद्दीला ।

दुजा हुकुम वाडीच्या सावंतासहि दिला ।

घेउनी उठा आपआपुल्या शिबंदिला ।

आम्ही पन्हाळगडाकडे शिवाजीस शह दिला ।

चहुंकडून सर्वांनी उठावें या संधिला ।

गनिमासि भिऊनी कोणी बसूं नये संधिला ॥

मोडते

शिवाजीस समजतां बेत शत्रुचा ऐसा ।

बंदोबस्त करुनी कडेकोट राज्यामध्यें खासा ।

स्वतः पन्हाळगडावरी आपण शार्दुल जैसा ।

नेताजी, पालकर खालीं, शत्रूभोवतालीं घिरटया घाली, पिडा देत लइसा ॥१॥

चौक २

आठ महिने लढविला किल्ला शिवाजीनें शांत ।

तीन वर्षे पुरेल असा होता पुरवठा आंत ।

शिद्दी फिरकू देईना आंत बाहेर निभ्रांत ।

दमादमानें लढतां सहजीं शिवाजी फर्जी, गनिम अपमर्जी, येईल हातांत ॥

शिवाजीने विचार केला आपुल्या मन मोहल्यांत ।

कोंडुनि राहुन काय उपयोग या किल्ल्यांत ।

शिद्दीस निरोप दिला नका पाहु म्हणे अंत ।

जरि अभय द्याल तुम्ही आम्हा, करु तहनामा,

दाविला प्रेमा, भेटिचा हेत ॥

एके दिवशीं अस्तमानीं भेट झाली दोघांत ।

मुख्य कलमें मुक्रर केलि चार चौघांत ।

बाकींची उद्यां पाहूं झाली काळोखी रात।

तुम्ही थोर पुरुष चांगले, दैव लाभले; वचन द्या भले, हातावरी हात ॥

चाल

ढिला पडला बंदोबस्त, शिपाई झाले सुस्त त्याच रात्रीला, तहनामा झाला ॥

वीस हजार घेऊन मावळे, शिवाजी पळे राजरोस गेला, गड उतरला ॥

शिपायांनी केला गलबला, गनिम आलबेला भाग गया अल्ला, गांठला पल्ला ॥

चाल दुसरी

सेनापतीस बातमी कळतां नाचे थयथया ।

झूट बात करुन बड़ा गनिम किदरसे गया ।

बेसावध भूल पडी हमें खबर नहीं दिया ।

इतनेमें फाजलखान दौडता आया ।

चलो उठो अभी लष्कर को हुकूम देव मिया ।

केला पाठलाग सुरु पहांटेच्या समया ॥

मोडते

दोनी फौजेंत अंतर मुळींच नव्हता लइसा ।

झाली नजरानजर दोन तास सुमारे दिवसा ।

वीर बाजी देशपांडे शूर सेनापती खासा ।

पांच हजार मावळ्यांसह भली, खिंड रोखली,

स्वारी पुढें गेली, करुनी बेत ऐसा ॥२॥

चौक ३

आली यवन फौज खिंडिच्या तोंडावरी वेगें ।

दिला मार त्यास अनिवार परतली मागें ।

पुन्हा दुसरा हल्ला चढविला परतुनी रागें ।

त्याचा फडशा उडविला पुरा, कापून चरचरां,

म्हणती शिव हरा, करी मना जोगें ॥

यवनांनी तयारी केली पुन्हा वैतागें ।

तोफखाना पुढे घोडदळ तयाच्या मागें ।

आले दीन दीन गर्जत पठाणवीर आगे ।

तोफांचा करीत भडिमार, उडविला कहर,

कोणी माघार, त्यांतुनी नेघे ॥

सहा हजार मुसलमान रणीं पाडिले नंगे ।

जसे मारुतीनें अहिमहिचे चिरडिले भोंगे ।

इतक्यांत गोळा बाजीच्या छातीवर लागे ।

गडावरच्या तोफा ऐकुन, आनंदित मन, नामस्मरण, करी वैरागे ॥

चाल

छातींत बैसला धक्का, धीराचा पक्का देशपांडे वीर, महारणशूर ॥

पांच तोफा होता क्षणीं हर्षला मनीं, नामउच्चार, करित झाला गार ॥

त्याचें प्रेत शीघ्र घेऊन, न लागतां क्षण, झाले पसार, मावळे वीर ॥

चाल दुसरी

झाली खिंड मोकळी यवन गेले चालून ।

बैसले गडाला शीघ्र वेढा घालून ।

शिवाजीनें आप पर सैन्यबल तोडून ।

बेजार केले रिपु रात्रीं छापे घालून ।

पोर भ्यालें अफझुल्याचें गेलें वाळुन ॥

मोडते

गेला पळून फाझल पन्हाळ्याकडे भर दिवसां ।

शिद्दी जोहारासी म्हणे काका जरा आगे बैसा ।

बरसात जवळ आला नको युद्धाचा फांसा ।

लोक झाले बहुत तजावजा, कित्येकांस इजा,

म्हणती द्या रजा, लढाई नको सहसा ॥३॥

चौक ४

गेला सारा उन्हाळा परि पन्हाळा नाहीं आला हातीं ।

गेलें द्रव्य फुकट सैन्याची जाहली माती ।

बादशहाची जाहली इतराजी धरुन तृण दातीं ।

गेला पळुन विजापुराकडे, शिवाजीची पुढें,

पसरली इकडे, कीर्ती चौप्रांती ॥

पुन्हा आला बादशहा अष्ट उमराव साथी ।

प्रचंड सैन्यसागर घेऊन सांगातीं ।

किल्ल्यामागें किल्ले जिंकुनी दाखवी महती ।

इतक्यांत कर्नाटकी बंड, उठलें आभंड, कराया थंड, गेला त्या प्रांती ॥

मागें शिवाजीच्या मित्रास नसे मुळीं शांती ।

सांवताचा करुनिया मोड जिरविली भ्रांती ।

जंजिर्‍याचे शिद्दीचा घेऊन समाचार अंतीं ।

गडकिल्ले घेऊनी सकळ, करीत धुमाकुळ, मांडिलें खूळ विजापुर प्रांतीं ॥

चाल

बाजी पुत्राचें कल्याण, केलें शिवाजीनें द्रव्य दिलें भारी, केले अधिकारी ॥

झाली जगदंबा प्रसन्न, दिलें बहु धन, तलवार कहारी, यशस्वी प्यारी ॥

नांव घेतां आपोआप, होय थरकांप शत्रुच्या हारी, पळती माघारी ॥

चाल दुसरी

जर्जर करुनी बादशहाचा गर्व हारविला ।

कोंडमार करुनी मनाजोगा तह करविला ।

द्यावे सात लक्ष दर साल खंड ठरविला ।

स्वतंत्र कबुल करवुनी हट्ट पुरविला ।

भगवा झेंडा गुरुचा चौ मुलखी फिरविला ।

त्यापरी कवीने कवनीं रंग भरविला ॥

मोडते

पुढें प्रसंग शाहिस्तेखान येईल आपैसा ।

त्याची बोटें तोडितां तडफडेल जणूं मासा ।

कवि रामचंद्राचे कवन श्रवण करा बैसा ।

श्रीगुरु कृपेच्या बळें, अनुप्रास जुळे,

श्रोत्याच्या मुळें रंग चढे खासा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel