चौक १ (चाल-"सांग सखे सुंदरी इ०")

राजगड राजाचा । प्रतापगड जिजाबाईचा ॥

सिंहगड पन्हाळा ॥ पहा त्या मोंगलाचा ॥

सरजा शिवाजी शिवभजन । काबिज केलें तळकोंकण ॥

गड माहुली घेतली । कल्याण भिंवडी काबिज केली ॥

खबर त्या विजापुराला गेली । ठाणें राजाचें बसलें ॥

शिवाजी महाराज राजगड किल्ल्यावर बसले ॥

जिजाबाई माता । आहे प्रतापगडावरी ॥

सोमवाराच्या दिवशीं । हातीं हस्तनाची फणी ॥

उगवते बाजुला नजर गेली । नजर सिंहगडावर गेली ॥१॥

चौक २

बारा मावळ पुण्याखालीं । बारा मावळ जुनराखालीं ॥

पुण्याच्या तोंडाला जेजुरीच्या बारीला । किल्ला सिंहगड पाहिला ॥

नवें कोंबडीचें अंडे । ऐसा किल्ला सिंहगड झळकला ॥

ऐसा पंतोजी तो काका । त्यानें हुजर्‍या बोलाविला ॥

"जावें राजगड किल्ल्याला । अंचवावें प्रतापगडाला" ॥२॥

चौक ३

शिवाजी महाराज पांच पोषाख नटला । पाई तुमानी सुरवारी चढविल्या ॥

अंगी किनखाप घातले । शिरीं जिरीटोप घातला ॥

हातीं वाघनखें घालून । कृष्ण घोडीला जिन केला ॥

ढाल पाठिवरी टाकिता झाला । सोनसाळीं पट्टा हातांत घेतला ॥

कृष्णघोडीला चाबुक केला । आला मढयाच्या घाटाला ॥

घाट मढयाचा उतरला । आला बिरवाडी गांवाला ॥

गांव बिरवाडी सोडिला । आला पोलातपुराला ॥

पोलातपुर पाराचा वेंघला ॥ आले प्रतापगड किल्ल्याला ।

सलाम जिजाबाईला केला ॥३॥

चौक ४

"धाडला तुम्हीं हुजराचा जासूद । काम सांगावें आम्हाला " ।

"शिवाजी महाराज । डाव फांशाचा खेळावा" ॥

"डाव खेळावा उमाजी यानें । तूं माता मी तुझा पुत्र ॥

डाव खेळावा मातेसंगें । हें आमचें महत्त्व नव्हे" ॥

"मायलेकरांचा डाव । ह्यामधिं काही गुंता नाहीं"॥

येवढया जाबावरुन । ज्यानें तिवड मांडिली ॥

हातीं फांसा ह्यानें घ्यावा । "डाव पहिला येऊं दे तुला ॥

मी बायकोची जात । पहिला डाव येऊं दे तुझा" ॥४॥

चौक ५

हातीं फांसा जो घेतला । बारा बारा तो बोलला ॥

फांसा जमिनीवर फेकला । त्याचा तिरपगडा पडला ॥

तिरपगड पडला । त्याची बेती हो पडली ॥

बेती हो बोलला । त्याचे बारा जे पडले ॥

तिन डाव गेले ज्याचे । त्या शिवाजी महाराजाचे ॥

"जिजामाई ग माते । आता डाव येऊं दे तुझा" ॥

येवढया जाबावरुन । बाईनें हाती फांसा घेतला ॥

"प्रतापगडची भवानी देवी । तूं पाव माझ्या नवसाला" ॥

बारा रे बोलली बाई । बाईचे बारा रे पडले ॥

बाई बेतीन बोलली । बाईचे बेतीन पडले ॥

तिरपगडें बोलली । बाईचे तिरपगडें पडलें ॥

जिजाबाईचे डाव पुरे रे झाले ॥५॥

चौक ६

"ऐक जिजाबाई । सत्तावीस किल्ल्यांचा मी राजा ॥

माग माग जिजाबाई । जें मागाल तें देतों तुज ॥

नाशकाची बारी सांवताची वाडी । ह्यांतून किल्ला मागून घ्यावा ॥

तुंक तिकोना लघुगड किल्ला विसापुर । हयांतून कन्‌चा मागून घ्यावा " ॥

’ह्यांतून नको मला बाळा । पुण्याचे तोंडाला ॥

आहे जेजुरीच्या बारीला । पुरंदर किल्ल्याला ॥

बारे पुरंदर किल्ला (ल्लयाला) । आहे सिंहगड किल्ला ॥

घेऊन द्यावा मला । आयुष्य मागेन तुझ्या राज्याला" ॥

नांव घेतां सिंहगडाचें । राजा थरथरां कांपला ॥

"हा किल्ला उदेभान मोगलाचा । बाई उदेभान मोगलाचा ॥

जे उमराव गेले सिंहगडाला । त्यांच्या पाठी ग पाहिल्या ॥

नाहीं पुढे पाहिले । किल्ला आहे वाघाचा जबडा ॥

सत्ताविस किल्ल्यांची बारी । ह्यांतून मागावा बाईनें" ॥

"नाहीं सिंहगड किल्ला दिल्या । मी शाप देईन ॥

राज्य जाळून टाकीन उभे" । "नको बाई चल माझ्या राजगड किल्ल्याला" ॥६॥

चौक ७

बारा भोयांची पालखी । आंत बाईला बसविली ॥

राजगड किल्ल्याला । शिवाजी महाराज जाऊन तक्तावर बसले ॥

ज्यानें वात लावूनी । जात शोधाया लागले ॥

’सिंहगड किल्ला घेणें । मला कोणी उमराव दिसेना’ ॥

प्रहर रात्रीपासुनि । बारांचा अंमल झाला ॥

प्रतापगडाखालीं । उमराठया गांवाला ॥

ज्यानें उमराव शोधिला । माझा तान्या मालुसरा ॥

तानाजी सुभेदार । पन्नास माणसांचा सरदार ॥

शिवाजीराजाचे राज्यास । ऐसा उमराव होणें नाहीं ॥

किल्ला घेईल सुभेदार । तानाजी सुभेदार ॥

खरखर लखोटा लिहीला । ज्यानें हुजर्‍या बोलविला ॥

"जावें उमराठया गांवाला । तानाजी सुभेदाराला ॥

तीन दिसांचा वायदा जो केला ॥ बारा हजार फौज ती घेऊन भेटावें तिसर्‍या दिवसाला ॥७॥

चौक ८

पंतोजी तो काका । ज्यानें लखोटा घेतला ॥

ज्यानें राजगड तो सोडिला । आला येल्याचे पेठेला ॥

पेठ येल्याची सोडिली । आला डोणीचे पाण्याला ॥

घाट मढयाचा उतरला । आला बिरवाडी गांवाला ॥

हुजरा तेथून निघाला । आला कोलातपुराला ॥

तेथून निघाला । गेला उमराठया गांवाला ॥

सवा प्रहर दिवस आला । तानाजी सुभेदार सदरेला बैसला ॥८॥

चौक ९

जासूद महाराजांचा पाहिला । तानाजी सुभेदार सुखी झाला ॥

पोटीं रायाबा तो बेटा । सयंवर बाळाचें मांडिलें ॥

काढल्या पंचमीच्या हळदी । काढलें षष्ठीचें लगिन ॥

लगिन बाळाचें मांडिलें । आली सिंहगडची कामगिरी ॥

लगिन रायाबाचें राहिलें । ज्यानें उमराव बोलाविले ॥

ज्याचा शलोर तो मामा । ज्याचा सूर्याबा तो बंधु ॥

येसा कणकर रुमाजी दादा । ज्यानें सरदार बोलाविला ॥

"माझ्या शेलार तूं मामा । आली सिंहगडची कामगिरी" ॥

दादा परपर बाबाजी । ज्यानें हुजर्‍या बोलाविला ॥

मिषा तोड मकाजी । ज्यानें हुजर्‍या बोलाविला ॥९॥

चौक १०

मामा बोलाया तो लागला । ऐंशीं वर्षांचा म्हातारा ॥

"लगिन राहिलें रायबाचें तो मजला सांगावी । माझ्या तानाजी सुभेदारा ।

जे गेले सिंहगडाला ॥ त्याचे पाठिरे पाहिले ।

नाहीं पुढारे पाहिले । ज्यानें आंबारे खाईला ।

बाठा बुरजा लाविला ॥ त्याचे झाड होउनि आंबे बांधले ।

किल्ला हातीं नाहीं आला ॥ सिंहगड किल्ल्याची वार्ता ।

काढूं नको तानाजी सुभेदारा ॥ जे गेले सिंहगडाला ।

ते मरुनशानी गेले ॥ तुमचा सपाटा होईल" ।

"असें बोलूं नको रे मामा ॥ आम्ही सूरमर्द क्षत्री ।

नाहीं भिणार मरणाला" ॥१०॥

चौक ११

मग रायाबा तो बेटा । बाबाच्या जवळ आला ॥

"ऐक ऐक माझ्या बाळा । जातों आम्ही सिंहगडाला" ॥

"माझें लगिन करील कोण ?" ॥ रायाबा पुसे बाबाला ॥

"साता नवसांचा माझा रायाबा । त्याचें लगीन मागीन ॥

भिऊं नको माझे बाळा । जातों राजगड किल्ल्याला ।

जाउन सांगतो महाराजाला ॥ सात दिवसांचा वायदा ।

घेऊन येतों तुझ्या लग्नाला ॥ आहे मी महाराजांचा चाकर " ।

लखोटा हातांत घेतला ॥ ज्यानें एका लखोटयाचे ।

बारा लखोटे केले ॥ धाडले कागद खोर्‍याला ॥

मोठया मोठया सरदारांला ॥ पंधरा गांवचे पारुंचे ।

ज्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ दसपटिचे मोकाशी ।

त्यानें आपणाजवळ बोलाविले ॥ उमराठयाचे शिरके ।

त्यानें आपणांजवळ बिलाविले ॥ नांदविचे सावंत ।

त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ वडघरचे नाईक ।

त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ सिलमाचे ठाकूर ।

त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ बारा हजार फौजेला ।

ज्याचा लखोटा पोंचला ॥११॥

चौक १२

’अरे फलाणाचे फलाणा । घाव घाला निशाणा’ ॥

बारा हजार लोक, बिनहत्यारी । होते. सैन्य बोलाया लागलें ॥

बिनहत्यारी लोक । कसे जाऊं महाराजांचे भेटिला ।

ज्यानें सैन्य पाहिलें । बारा हजार लोक बिनहत्यारी आले ॥

आंकडया कोयत्या त्या कमरेला । टापसीच्या खोळा डोईवर घेतल्या ॥

हातीं सोडा घेऊन । सलाम त्यांनीं केला सुभेदाराला ॥

माझे तानाजीची हिम्मत । म्हणून मिळाली जमात ॥

त्यानें पेटारा उघडिला । बारा हजार रुपया बाहेर काढिला ॥

बारा हजार मनुष्यें । त्यांचे हातांमधिं दिला ॥

’दाढि होई रे करावी । चिरी मिरी रे घ्यावी ॥

चला महाराजांचे भेटिला । राजगड किल्ल्याला" ॥१२॥

चौक १३

बारा हजार फौज बोलूं लागली । मनीं विचार त्यानें केला ॥

"जातों राजगड किल्ल्याला । धनगर अडविल बायकोला ॥

अब्रु घेईल आमुची । बारा हजार रुपया त्यांनें मागें लावून दिला ॥

सुभेदार बोले त्या सेनेला । "बारा हजार रुपया काय केला ॥

घेतलें धनगराचें घोंगडें । त्याला मागें लावून दिला" ॥

बारा भोयांची पालखी सवारिली । तोरण पालखीला बांधिलें ।

पाय दिला पालखीमध्यें । हात पालखीला दिला ॥

रायाबा तो बेटा । बाबाच्या आडवा येणार झाला ॥

"माझें लगीन करिल कोण । तुम्ही जातां सिंहगडाला" ॥

"भिऊं नको बेटा । तुझे मी येतों लग्नाला ।

आधीं लगीन सिंहगडचें । मग करीन रायाबाचें" ॥१३॥

चौक १४

हुकूम ज्यानें भोयांला केला । आले नगरीचे वेशीला ॥

तोरण पालखीचें तुटून उजव्या बाजूवर पडलें ॥

माझ्या शेलार तूं मामा । आम्ही जातों सिंहगडाला ॥

अपशकुन झाला । माझ्या तानाजी सुभेदाराला ॥

तानाजी सुभेदारानें । ह्याचा गुमान नाहीं केला ॥

गेला गांवाच्या शिवेवर । ज्याला आडवा तास गेला ॥

मग तो शेलार मामा बोलला । तानाजी सुभेदाराला ॥

"तानाजी सुभेदारा । मोहोरें बरें नाहीं होणार" ॥

"राजा शिवाजीचें देणें । अढळपदीं सोनें !" ॥१४॥

चौक १५

"अपशकून मानूं नये । ज्यानें हर हर वाहिला" ॥

गांव उमराठें सोडिलें । पांचकर्णांचा बाजा केला ।

आले त्या पोलातपुराला । पांचकर्णांचा बाजा केला ।

गेले बिरवाडी गांवाला । पांचकर्णांचा बाजा केला ।

घाट मढयाचा वेधला । गेले डोणीचे पाण्याला ॥

गलीम तेथुनि निघाला । गेला येल्याच्या पेठेला ॥

गलीम तेथुनि निघाला । गेला रायगडच्या पोटाला ॥

बारांच्या अंमलांत । गेले किल्ल्याच्या पोटाला ॥

बारा हजार फौज चाले । धुरळा गगनास गेला ॥१५॥

चौक १६

हिरव्या बुरुजावरुन । जिजाबाईनें पाहिला ॥

"माझ्या शिवाजीमहाराजा । गलीम वैरियाचा आला ॥

तोफांला आग घाला । गलीम मारावा किल्ल्याखाला" ॥

शिवाजी महाराजानें । गलीम नजरेनें पाहिला ॥

तो शिवाजी महाराजाचा । भगवा झेंडा ओळखिला ॥

"माझे जिजाबाई माते । आमचा तानाजी सुभेदार आला" ॥

नांव घेतलें सुभेदाराचें । बाई गदगदां हांसलि ॥

सेना तानाजीची पाहिली । मनांत संतोषित झाली ॥१६॥

चौक १७

बारा हजार फौज घेऊन । सुभेदार दरवाजाला आला ॥

पहिल्या सदरे जमाडिला । सूर्या गगनीं लखाकला ॥

दुसर्‍या सदरेमधीं । कमरकमर कापुस टाकला ॥

तिसर्‍या सदरेमधीं । ज्यानें चांदवे बांधिले ॥

चवथ्या सदरेमधीं । हंडया झुंबर बांधिले ॥

पाचव्या सदरेमधीं । महाराज शिवाजी बैसले ॥

सुभेदार सलामाला गेला । महाराजावर घुसा केला ॥

"मागचे दिवस मागल्यापरी । मोहरिल दिवस मोहरल्यापरी ॥

माझ्या बेटयाचें लगीन, तुम्हीं जासूद धाडिला । तुमचा काय वाद केला ?" ॥

"ऐक तानाजी सुभेदारा । आमची कामगिरी नव्हे तुम्हांला ॥

जिजामातेनें बोलाविलें" । दोघांचा जबाब जिजाबाईनें ऐकिला ॥

जिजाबाई बोलाया लागली । "मी जातीनें बाईल ॥

आतां सुभेदार येईल । माझी अबरु घेईल" ॥१७॥

चौक १८

सर्व शृंगार नटली । धांवा अंबाबाईचा मांडिला ॥

"भले भले अंबाबाई । तानाजी सुभेदार आला ॥

इच्छेप्रमाणें होऊं दे ।" सिंहगड किल्ल्याची पंचारती केली ॥

गेली सुभेदाराला ओंवाळायला । "तुझे जाऊं अलाबला ॥

तानाजी सुभेदारा । चढत्या दवलतीचें राज्य येऊं दे तुला" ॥

सुभेदाराला ओंवाळितां । त्याचा राग निघून गेला ॥

ज्याला वर्तली चिंता । ही आहे महाराजांची माता ॥

इच्या आरतीला । मी घालूं काय आता ॥

ज्यानें मंदिल काढिला । बाईचे पायांवर ठेविला ॥

जिजाबाई बोलली । तानाजी सुभेदाराला ॥

"माझा सुभेदार शाहाणा ।" हात मस्तकी ठेविला ॥

"माग माग जिजाबाई । जें मागशील (तें) देतों तुला" ॥

"काय मागूं सुभेदाराला ? । ह्या म्हातारपणीं सिंहगड किल्ला ॥

घेऊन द्यावा मला । आयुष्य मागेन तुझ्या राजाला ॥

माझा शिवाजी थोरला माझा तानाजी धाकटा । लेकाचें वाण दिलें त्याला" ॥१८॥

चौक १९

सुभेदार तेथुन निघाला । आपल्या सेनेमधिं आला ॥

शेलार त्याचा मामा । त्याला पुसाया लागला ॥

"गेला बाईच्या भेटीला । तुम्हीं काय मजकूर केला" ॥

"काय सांगू शेलारमामा । जाणें आहे सिंहगडाला" ॥

जावें जावें बाईच्या भेटीला । बारा हजार फौज आली तुझ्या ग कामाला ॥

नाहीं गाढव वळायाला । जेवण कर बारा हजारांला मग आम्ही जाऊ सिंहगडाला" ॥

"माझ्या सुभेदार बाळा । तुजवर घातलें गडाचें ओझें" ॥

"भला भला सुभेदारा । यावें जेवायाला ॥

आहे गडाची रे वस्ती । येथें अन्न रे मिळेल ॥

नाहीं मिळायाचें पाणी । जावें गुंजवर्‍या नदीला ॥

आंघोळ करायाला । मग यावें जेवायाला" ॥१९॥

चौक २०

बारा हजार फौजेनिशीं । सुभेदार गडाखालीं उतरला ॥

गडाखालीं उतरुन ज्यानें विचार काढिला । मग त्या शेलार मामानें ॥

विचार काढिला । "भला भला रे सुभेदारा ॥

तीन कोस जावयाला वेळ फार झाला । धोपर संध्या रे करा ॥

चला जाऊं रे जेवणाला" । बारा हजार फौजेतून ॥

एकटा सुभेदार गेला । गुंजवर्‍या नदीला ।

आंघोळ करायाला ॥ ज्याने आंघोळ संध्या केली ।

आला आपल्या फौजेमधीं ॥ बारा हजार घेऊन ।

आला दरवाजाचे तोंडीं ॥ ज्यानें सैंपाक पाहिला ।

बारा हजार पाट मांडला ॥ बारा हजार दुरुन ।

बारा हजार पंचपात्री ॥ बारा हजार लाविला ठाव ।

सैंपाक वाढून त्वरीत झाली (ला) ॥२०॥

चौक २१

ज्यानें सैंपाक पाहून । हुर्द ज्याचें भरुन आलें ॥

"आग लागो जेवणाला । माझा बाळ अंतरला" ॥

ज्याचा शेलार तो मामा । बोलाया लागला ॥

"भला भला सुभेदार । ऐंशीं वर्षांची उमर ॥

ह्या रे जिजाबाईची । एकटी वाढील रे कुणाला" ॥

मामा बोले सुभेदाराला । "अठरा शाखा अठरा भाज्या ॥

एक ठिकाणीं करा । जेवण वाढिलें फौजेला" ॥

अर्धे उठून उभे राहिले । बारा हजार फौजेनें एकच गर्दी केली ॥

कोणी करतो पोळी पोळी । कोणी करतो खीर खीर ॥

कोणी करतो भाजी भाजी । कोणी करतो डाळ डाळ ।

ज्यानें एकच गर्दी केली । जिजाबाई माता बहुत श्रमी झाली ॥

धांवा अवघा मांडिला । "प्रतापगडची भवानी धांव संकटाला" ॥

पांचजणी देवी । धांवुनिया आल्या ॥

सैंपाक वाढाया लागल्या । ऐकेनात कुणाला ॥

ज्याचा मापटयाचा आहार । त्याचा अधोलीचा झाला ॥

ज्याच्या मोहरें पांच पोळ्या ॥ याच्या पंधरा पोळ्या झाल्या ॥

खाववतील त्यानें खाव्या । उरतील त्यांनीं गडाखालीं टाकाव्या ॥२१॥

चौक २२

बारा हजार फौज । जेऊन तृप्त झाली ॥

तानाजी सुभेदार गेला । शिवाजीच्या मुजर्‍याला ॥

"आम्ही जातों सिंहगडाला । आमचा रायाबा संभाळा ॥

जर आलों सिंहगडाहून । लगीन करीन रायाबाचें ॥

जर गेलों तिकडे मेलो । लगीन करा रायाबाचें ॥

मज बापाची सरदारी । द्यावी रायाबा बेटयाला ।

दिवटी बुदलीची जहागीर । द्यावी रायाबा बेटयाला ।

डोजगांव द्यावा पानसुपारिला । मालसर्‍याला दंड द्यावा इनाम खायाला" ॥

सुभेदार तेथून निघाला । आला बाईचे भेटिला ॥

डोईचा मंदिल काढला । बाईच्या चरणावर ठेविला ॥

"आम्ही जातों सिंहगडाला । माझ्या बेटयाला सांभाळा" ॥

बाईनें पेटारा उघडिला । पांच पोषाख काढिले ॥

त्या ग सुभेदाराला दिले । ’यांतून जरि जगून (जिंकून?) तू आला ॥

नव पोषाख करिन तुला’ । ज्यानें पोषाख तो केला फौजेमधीं गेला ॥२२॥

चौक २३

शेलार मामानें पाहिला । "माझ्या ऐक सुभेदारा ।

बारा हजार फौज आली रे तुझ्या कामाला ॥ हा पोषाक तो घ्यावा नेऊनशानी द्यावा ।

देशील तर द्यावा बारा हजाराला" । येवढया जाबावरुन ।

बाई मनीं चरकली ॥ काय सांगू सुभेदाराला ।

देईन बारा हजाराला ॥ चढविन सिंहगडची पायरी ।

बाईनें कोठार उघडिले ॥ ’मोहरे येर’ बारा हजार तलवार ।

बारा हजार काढिल्या ढाला ॥ बारा हजार गूर्दा ।

बारा हजार सिंगडा ॥ बारा हजार चौकडा ।

बारा हजारांना तोडा ॥ बारा हजार पोषाक ।

बारा हजारांना केसरी झगा ॥ घेरदार, बारा हजार ।

कोणी उमराव समजेना ॥ एकापेक्षां एक अधिक ।

दादा फौज निघाली ॥२३॥

चौक २४

’माझे जिजाबाई माते । माझ्या बाळाला सांभाळा" ॥

तानाजी सुभेदार । बारा भोयाचे पालखीमधिं बसला ॥

सर्व सेनेला मग तो मुजरा केला ॥ बसा बसा दादांनो ॥

आम्हीं जातों सिहगडाला । आमचा रामराम तो घ्यावा ॥

ज्यानें राजगड तो सोडीला । पांच कर्णांचा बाजा केला ॥

गलीम तेथून निघाला । साखरेच्या मुक्कामी गेला ॥

पांच कर्णांचा बाजा केला ॥ गलीम तेथून निघाला ।

गेला खामगांवाला । पाच कर्णांचा बाजा केला ॥

गलीम तेथून निघाला । गेला डेर्‍याच्या मुक्कामी ॥

पांच कर्णांचा बाजा केला । गलीम तेथून निघाला ॥

गेला सिंहगडच्या पोटाला । तेथुनि कर्णा बंद केला ॥२४॥

चौक २५

गलीम आनंदी, बारीला । दबा दिला भला ॥

माझ्या शेलार मामानें काळी घोंगडी हांतरिली । विडे पैजेचे मांडले ॥

"ज्यानें विडा उचलावा । त्यानें जावे सिंहगडाच्या माहितीला ॥

माहिती काढून येईल त्याला । छत्री घोडा इनाम त्याला, बारा गांव इनाम देईन त्याला" ॥

ज्या वीरांच्या वरती माना । त्यांनीं खालती घातल्या ॥

हात कोणी लाविना विडयाला । तानाजी सुभेदार भला ॥

त्यानें हात विडयाला घातला ॥ विडा मंदिलीं खोंविला ॥२५॥

चौक २६

"सूर्याबा रे बंधु आरता येरे माझ्या दादा । आम्ही जातों सिंहगडाला ॥

जगुनशानि आलों । लगीन करुं रायाबाचें ॥

गेलों तिकडे मेलों । लगीन करा रायाबाचें" ॥

तानाजी सुभेदार त्यानें पोषाक काढिला । पाटलाचा थाट केला ॥

जंगल लागलें दारुण । वेळु करकरां वाजती ॥

लागलें चिंवारीचें रान । लागलें आळविचें रान ॥

आरीबोरीचें दारुण । वाट नाहीं रे जावयाला ॥

काळोखी रात्र । वाट नाहीं रे जावयाला ॥

वन धुंडाया लागला । वाट मिळेना जावयाला ॥

सुमार पाहाया लागला । बारे धोंडीवर चढला ॥

गेला कोळ्याचे ग्याटाला (म्याटाला) । बारा जण कोळी होते पहिल्या ग्याटाला (म्याटाला) ॥

त्यानें सुभेदार पाहिला । "मारा मारा ह्या चोराला" ॥

सुभेदार बोलाया लागला । "भ्यालों ह्या चोराला ॥

हे ठार मारतील मला" । "चोर असलों ठार मारा ॥

राव असलों तर काय मरतां । बायकोच्या याराला ? ॥

जरा बत्ती तुम्ही लावा । यावें मला पाहावयाला" ॥२६॥

चौक २७

पहिल्यानें सरदार पाहिला । "धन्य याची नारायणा ॥

कोण तुमचें नांव गांव । येवढे सांगावें आम्हांला " ॥

"मी साखरेचा पाटील । गेलों होतों पुण्याला ॥

मंडईच्या वाडयांत । गेलों होतों पट्टी लावायाला ।

जात होतों घराला । तेथें वाघानें आडविला ॥

तुमच्या आलों आश्रमाला ॥ भले भले रे दादांनों ॥

घाईनें निघालों । पान खायला विसरलों " ।

पान द्यावें खायाला ॥ ऐक ऐक दादा ।

ह्या बारा वर्षामधीं पान खाल्लें नाहीं " ॥ बटवा खाकेचा सोडिला ।

यानें विडे जे काढिले ॥ बारा त्या कोळयाला ।

यानें बारा विडे दिले आफुमाजुमाचे विडे कोळ्यांला दिले ।

कोळी झिंगूनशानी गेले ॥२७॥

चौक २८

बारा बाराजण कोळी । पहिल्या दरबाराचे गेटकरी (मेटकरी) ॥

"बारा असामींचा कोण सरदार सांगावा" । आहे मी खंडोजी नाईक बारांचा सरदार" ॥

"ऐक खंडोजी नाईक । तुमची तैनात सांगावी" ॥

"तीन रुपयांची तैनात । मला सरदाराला मिळती" ॥

ह्यानें कठी जी काढिली । दिली खंडोजी नाईकाला ॥

ज्यानें तोडा जो काढिला । दिला विठोजी कोळ्याला ॥

चौकडा काढिला । दिला मालोजी कोळ्याला ॥

बारा कोळ्यांला बारा । ऐशा वस्ता त्यानें दिल्या ॥

कोळी फितूर ते केले । "ऐक ऐक पाटीलबोवा ॥

मोठया वस्तू आम्हांला जिरतील कशा । काम सांगा आम्हांला" ॥

"काम तुम्हांला सांगेन । भाक द्यावी रे मजला" ॥

इमान ज्यानें दिलें । कोळ्यांनीं इमान दिलें ॥

"मी आहें कोणाचा कोण । नांव सांगतों रे तुम्हांला ॥

राजा शिवाजीचा उंबराव । आहे मी तानाजी सुभेदार ।

पन्नास माणसांचा सरदार ॥ आहें मी, एकला ।

आलों सिंहगडच्या माहितीला । लांबी रुंदी सांगा मला" ॥२८॥

चौक २९

नांव घेतां शिवाजीचें । कोळी खालती बसले ॥

"ऐक ऐक तानाजी सुभेदारा । शिवाजीचें कुत्रे नाहीं येत सिंहगडाला" ॥

ज्यानें वस्ता घेतल्या । त्यानें सुभेदाराच्या पुढें ठेविल्या ॥

"घे रे सुभेदारा । आल्या वाटेनें जावें राजगडकिल्ल्याला " ॥

"ऐक खंडोजी नाईका । इमान तूं रे मला दिलें ॥

द्यावी सेजेची बाइल । पण इमान देऊं नये" ॥

येवढया जाबावरुन । कोळी सांगायला लागला ॥

"ऐका सिंहगडची माहिती । तिनकोसांचा आहे बा घेरा ॥

दिडकोचासी आहे बा रुंदी । आहे अठराशें पठाण सिंहगडाला ॥

आहे उदेभान मोंगल । दीड गाई दीड शेळी सवामण तांदूळ वेळेला ॥

अठराजणी बिब्या । आहेत त्याच्या पलंगाला ॥

घेतो तेल्याची पहार । मणगटावर घालतो ॥

सरी करुन घालतो । बिबिच्या गळ्यांत ॥

चांदवडी रुपया । दोहों बोटांनी तोडितो" ॥२९॥

चौक ३०

"आहे बाच्छायाचा हत्ती । त्याचें नांव चंद्रावळी ॥

एक बाच्छायाचा हत्ती । करिल सब दुनियेची माती ॥

उदेभानाचा प्रधान । आहे सिद्दी हिलाल ॥

एक शेळी अर्धी गाई । आदमण तांदुळ त्याचे एका वेळेला ॥

नउजणी बिब्या । सिद्दी हिलालाच्या पलंगाला ॥

बाराजण होते लेक । उदेभानाच्या पेक्षां भारी ॥

उगवत्या बाजुला । कड़ा आहे डोणागिरी ॥

तेथें आहे सोलाची जागा । डोणागिरीच्या कडयाला ॥३०॥

चौक ३१

"बसावें सरदारांनो । जातों आपल्या गोटाला" ॥

बाराजण कोळी चरण धरुन । तुम्ही काय सांगतां आम्हांला ॥

त्या मर्दाला पाहुन । कोळी रडाया लागले ॥

"शिवाजीच्या राज्यांत कोणीं । तुजसारखा सरदार नाहीं पाहिला" ।

"भिऊं नको रे दादांनो । हा किल्ला हातीं आला तर ह्या किल्याची सरदारी देईन तुम्हांला ॥

हजाराची तैनात देईन बारा असामीला" ॥ तानाजी सुभेदारानें दिला हातचा लखोटा ।

त्या खंडोजी कोळ्याला ॥३१॥

चौक ३२

सुभेदार तेथुनि निघाला । आला आपल्या फौजेला ॥

ज्याचा शेलार तो मामा । त्याच्या पुढें धावत आला ।

"तुम्ही गेला सिंहगडाला । नवस केला बहिरोबाला ॥

माझा सुभेदार येऊं दे । बारा बकरे देईन तुला ॥

तुम्ही चला हो किल्ल्याला । जातों नवस फेडायाला" ।

ऐक ऐक शेलारमामा बारा द्यावयाचे ते चोवीस देऊं । पण किल्ला येऊं दे हाताला" ॥

"बहिरोबा आहे ओंगळ । त्याचा नवस पाहिजे फेडला" ॥

"ऐक ऐक शेलार मामा माझ्या महाराजाचें देणें । अढळ पदीं सोनें ॥

नाही आम्ही बहिरोबा जाणित । साडेतिनशें देव पाणी रांजणांत भरतात ॥

ऐसा शिवाजीमहाराजा । आहे तळकोंकणचा राजा" ॥३२॥

चौक ३३

चला माझे दादांनो । हुकूम सैन्याला केला ॥

बारा हजार फौज गेली । कल्याण दरवाज्याला ॥

ज्यानें पेटारा उघडिला । काढिली यशवंत घोरपड ॥

सात शेर शेंदुर । तिच्या मस्तकीं थापिला ॥

भांग मोत्यांचा भरला । चरणीं मस्तक ठेविलें ॥

सांखळी कमरेला बांधिली ॥ यशवंत घोरपड ज्यानें किल्ल्याला लाविली ॥

अर्ध्या किल्ल्याला गेली । घोरपड माघारीं परतली ॥

आउक्ष तानाजीचें समजली । घोरपड फिरली ती सुभेदारानें पाहिली ॥

"सत्ताविस किल्ले मी घेतले । घोरपड कधीं मागें नाही फिरली" ॥

राग आला त्या मर्दाला । "मी आहे मराठयाचा पोर नाही भिणार मरणाला ॥

एक हात टाकीन । अठरा खांडोळीं पाडीन, शिळ्या भाकरीसंगें खाईन" ॥

त्या मरणाचे धास्तीनें । सात वेढे जी फिरली नखें रोऊन बसली ॥३३॥

चौक ३४

"जावें जावें शेलारमामा सोल बघायाला" । ज्यानें टिचकीनें मारिली ॥

सोलाला जोरानें लागली ॥ काळी घोंगडी जी सोडली ॥

ज्यानें बटवा जो सोडिला । बारा विडे काढिले ॥

"कोण शूर मर्द आहे क्षत्री । त्यानें विडा उचलावा, हात सोलाला घालावा" ॥

ज्या वीरांच्या वरती माना । त्यांनीं खालीं घातल्या माना ॥

सुभेदार बोलतो । "भरा बायकांच्या बांगडया" ॥

एवढया जाबावरुन । राग आला त्या सैन्याला ॥

मोहिता म्हणतो धार माझी । घाग म्हणतो धार माझी ॥

चवाण म्हणतो धार माझी । जाधव म्हणतो धार माझी ॥

गायकवाड म्हणतो धार माझी । शिरके म्हणतो धार माझी ॥

महाडिक म्हणतो धार माझी । बारा हजार फोजेनें एकच गर्दी केली ॥३४॥

चौक ३५

अरे फलाणाचा फलाणा । घाव घाला निशाणा ॥

घस्त आली मोगलांची । त्यानं कानोसा घेतला ॥

हांक मारली गेटाला (मेटाला) । खंडोजी नायकाला ॥

"किस्का गलबला मेरे भाई । एवढा सांगावा आम्हांला" ॥

खालून कोळ्याने जबाब दिला । जंगलमें धनगराचा वाडा ॥

त्यामध्यें बडा वाघ शिर्‍या । गाईकी बचडी खाते ॥

रांड पोर किचाड करते । वरती सुखी राज्य करा" ॥३५॥

चौक ३६

सुभेदार बोलतो सेनेला । "पहिली सोल शिवाजीमहाराजांची ॥

दुसरी सोल अंबाबाईची । तिसरी सोल तानाजी सुभेदाराची" ॥

पट्टे घेतले तोंडामधीं । सोल धरली हातामधीं ॥

आपल्या बेताचे माणुस पन्नास मोजीले । सुभेदार गडावर चढले ॥

पन्नास कमी बारा हजार फौज । खालीं होती, त्याने एकच गर्दी केली ॥

सूर्याबा तो बंधु । त्यानें एकच गर्दी केली । दादा वरती गेला (म्हणून) ।

बारा हजार फौजेनें हात सोलाला घातला ॥ तीन पुरुष वरती गेले ।

सोल मधीच तुटली ॥ पन्नास कमी बारा हजार ।

फौज धरणीवर पडली ॥३६॥

चौक ३७

सुभेदार तो वरती जाऊन । त्याला दोन घटका झाल्या ॥

माझ्या "शेलार तूं मामा । कां वेळ लागला फौजेला तूं जावे बघायाला" ॥

सोल पाहुन मामा । धोतरात....ला ॥

"काय सांगूं सुभेदारा । सोल ते तुटली आली मरणाची वेळा" सुभेदार बोलाया लागला ।

"नाहीं सोल रे तुटली माझें आयुष्य तुटलें ॥ ऐक ऐक शेलार मामा ।

माझ्या रायाबा बेटयाला रामराम सांगा " ॥३७॥

चौक ३८

शेलार मामा बोलतो । "ऐक ऐक मी तुला एक तोड सांगतो ॥

आहे अठराशें फौज । किल्ल्याला अठराशे पठाण ॥

आहे उदेभान मोंगल । आहे सिद्धी तो हिलाल, आहे चंद्रावळी हत्ती ।

उडी टाका किल्ल्याखालीं । म्हणजे पहायाला नको" ॥

"भला भला शेलार मामा । उडी टाकीली तरी प्राण जायाचा ॥

पन्नास माणसाचा सरदार । सत्तावीस किंल्ल्यांचा मी सरदार, नाहीं भिणार मरणाला" ॥

शूर मर्दाची कीर्ति । धावा केला अंबाबाईचा ॥

प्रतापगडची भवानी । पाव माझ्या नवसाला ॥

सातारची मंगळाई । मग पुण्याची पर्वती ॥

तुळापुरची (तुळजापूरची) भवानी । माता पाराची वरदानी ॥३८॥

चौक ३९

पांच देवी पुढे धांवत आल्या । गळ्यांत कवडयांच्या माळा ॥

हात मारिला पाठीवर । "भिऊं नका सुभेदारा ॥

यश तुझ्या तलवारीला" । बळ देवीचें सापडलें ॥

जोर हातींचा चढविला । मागची पुढची आशा सोडली ॥

खुन डोळ्यावर चढला । "ऐक माझ्या शेलारमामा ॥

जेथें सुभेदाराचा पटा । तेथें पन्नासांचा पटा ॥

जेथें सुभेदाराचा मान । तेथें पन्नासांची मान चलचल माझ्या मामा" ॥३९॥

चौक ४०

गेले पहिले दरवाजाला । ज्यानें दिंडीनें पाहिला ॥

होती आरबाची जात । होती मोगलाची जात ॥

होती मुसलमानाची जात । अफु माजुम खाल्ली ॥

मदनमस्त झाली । ज्यानें डाव जे मांडिले ॥

कोण बारा बारा बोलती । कोण ग्यारा रे बोलती ॥

ह्याने एकच गर्दी केली । खणाखण वाजिती ॥

व्हाळ आसुदाचे वाहती । रक्त अंगाला लागलें खुन डोळ्याला चढला ॥

कोण करितो खुदा खुदा । बुधा धरणीला पडला ॥

कोण करितो अल्ला अल्ला । खाली काला जो पडला ॥४०॥

चौक ४१

पहिला दरवाजा मारिला । गेला दुसर्‍या दरवाजाला ॥

काळोखी रात्र, पार--

दुसर्‍या दरवाजाला होता । तिनशें पठाण, ज्यानें दिन दिन वाहिला ॥

मुसलमानी लोक दादा । बिनफिकिर होते, नाहीं गलीमाची माहित ॥

तानाजी सुभेदार, जैसा ठाणांत । वाघ लोटला, सेनांत ॥

पांच पट्टयांचा मारा केला । सवाघटकेमधिं तिनशें पठाण कापिला ॥

गेला तिसर्‍या दरवाजाला । होता चारशें पठाण ॥

दिन दिन ज्यानें वाहिला । चारशें पठाण कापिला ॥

एकदंर हिशेब नऊशें मनुष्यांचा झाला ॥४१॥

चौक ४२

"ऐक शेलार मामा । गलीमाचा हिशेब घ्यावा ॥

एक ह्यानें कमी । नऊशें पठाण झाला" ॥

त्यांत बोंब्या निघून गेला । उदेभान मोंगलापाशीं गेला ॥

अठरा तो पेले अफूचे । उदेभान एकटा प्याला ॥

भंगीच्या जुडया । आणि अफुच्या वडया खाल्ल्या ॥

उदेभान मोंगल मगरमस्त झाला । आठरा पलंग ज्यानें बिब्यांचे सवारिले ॥

ज्यानें लुंगिज सोडिली । ज्यानें खुंटीवर ठेविली ॥

चोन कराया चालला । तो म्होरें बोंब्या अवचित गेला ॥

"मेरे उदेभान मोंगला । आग लागो तुझ्या चोन्याला ।

सिंहगड किल्ला डुब होया । भाई नऊशें पठाण कापिला ॥

काळोखी रात्र, नाहीं गलीमाची माहित । नऊशें पठाण काटया" ॥

"x x हमारे पर बैठया । आम्ही नाहीं चोन्याला सोडताया ॥

जा बालेकिल्ल्याला । जाऊन सांगा हत्तीच्या महाताला ॥

आठरा घागरी कुसुंबा पाजा हत्तीला । अठरा अफूचे ते पेले ॥

अठरा माजुमाच्या वडया, पांच पते त्या (द्या) सोंडेला । चंद्रावळीचा हत्ती जाऊं दे कल्याणदरवाज्याला ॥४२॥

चौक ४३

सुभेदारानें काय केलें । सुभेदार बोलतो मामाला ॥

"नऊशें पठाण कापिला । माझा जीव श्रमी झाला बटवा सोडा पान खायाला" ॥

शेलार तो मामा शिणल्यावर "दादा पोट रे फुगलें" । "भला भला माझ्या मामा ॥

बाराच्या ठोक्याला । किल्ला सई करुन देतों तुला ॥

पान खाऊं दे मला" । पान जो खातांना मोहरें हत्ती धांवत आला ॥

"किस्का उमराव । मेरा भाई सांगावा मजला" ॥

"उंबराव शिवाजीमहाराजांचा । मी आहें तानाजी सुभेदार" ॥

"नऊशें पठाण कोणी काटया, सांगावें मजला" । "नऊशें पठाण आम्ही काटया" ॥

महाता बोले सुभेदार । "कुणब्याच्या पोरा काय तुझा एवढा तोरा ॥

जंगलामधीं तूं रें जावें । लकडी तोडावी त्याची मोळी ।

बांधावी जाऊन बनियाला ओपावी ॥ ज्यानी धानोर्‍या आणाव्या ।

रांडा पोरा रे घालाव्या ॥ एवढया बडया बडया सरदारी एवढया बडया तलवारी ।

कोठें होत्या तुझ्या बाला ?" ॥ सुभेदार बोले महताला ।

"ऐक भुसार्‍याच्या पोरा जाऊन ताग तूं पेरावा ॥ गोणी ताटुक वळावा ।

यावें कुणब्याच्या वाडयाला ॥ भात रुपयाचे द्यावें ।

तुझ्या रंडीनें भरडावें ॥ कणी कोंडा आपण खावा ।

तांदूळ बनियाला ओपावा ॥ एवढया बडया बडया अंबार्‍या एवढया बडया तलवारा ।

कोठें होत्या रे मुसंडया तुला ?" ॥४३॥

चौक ४४

सलाम सलाम मेरे भाई । पहिला हात येऊं दे रे तुझा" ॥

पैलवान हत्तीवर बसला । शिवी दिली हत्तीला ॥

"तेरी रंडीका नर । ह्याला पाहुन घ्यावा" ॥

हत्ती सात पावलें मागे गेला । पांच पटयाचा मारा केला ॥

"संभाळ संभाळ मेरे भाई । आतां संभाळ सुभेदारा ॥

हा हात्ती बाच्छाईचा" । "मी रे आहे महाराजांचा" ॥

पहिला हत्तीनें डोईवर मारा केला । सुभेदार भला,

हत्तीच्या पोटाखालून निघून गेला ॥ हत्तीनें मारा केला ।

बंदुकीचा गजभर चिरा जो तुटला ॥ वरुन पहिलवान बोलला ।

"सहाही पाताळ गाडिला !" राग आला सुभेदाराला ।

सात हात जमीन उडाला लाथ मारिली महाताला ॥

अल्ला म्हणून बोलला । शब्द हत्तीनें ओळखिला ॥

हत्तीने उलटा पाठीवर मारा केला । ह्या वैर्‍याला मारायाला ॥

सुभेदार सराईत भला । कावा नदरेचा राखिला ॥

सळ पटयाचा सोडिला । नऊ तुकडे सोंडेचे नऊ सांखळीचे ॥

अठरा खांडोळीं पाडिलीं । सुभेदार खालीं उतरला ॥

पन्नास माणूस लागलें हत्तीला भोकाया । शेलार मामा धांवत आला ह्याचा "भोचु दे रे बोx" ॥४४॥

चौक ४५

तिथुन बोंब्या निघून गेला ॥ "मेरे उदेभानभाई आग लागो तुझे चोन्याला ॥

"सिंहगड किल्ला डुब होया" । "हम चोन नहीं सोडताई ॥

जा पिराच्या दरग्याला । सांगा सिद्दी हिलालाला ॥

पांच हत्यारें घेऊन जावें । कल्याण दरवाजाला" ॥

सिद्दी हिलाल भला । ज्याच्या नऊ जनी बिब्या पलंगा निजायाला ॥

चोन कराया लागला । लाखोटा मोगलाचा दिला ॥

सिद्दी हिलालानें । त्यानें वाचून पाहिला ॥

सिंहगड किल्ल्याला गलीम बहुत आला । तुम्हीं जावें लढायाला ॥

सिद्दी तो हिलाल पांच पोषाग नटला । दोहीं हातांत दोन पट्टे नऊजण बिब्या हारोहारीनें उभ्या केल्या ॥

ज्यानें पहिला हात टाकिला । अठरा खांडोळीं पाडिलीं ॥

आसुदाचा टिळा ल्याला । उमराव तेथून निघाला सुभेदारापाशीं आला ॥४५॥

चौक ४६

"सलाम सलाम मेरे भाई । किस्का तूं उमराव ऐसा सांगावा मजला" ॥

"उमराव आहे शिवाजीचा । मी तानाजी सुभेदार" ॥

"ऐक कुळंब्याच्या पोरा । पागोटयाच वेढे घाल गळ्यामधीं शरण यावें सरदाराला" ॥

सुभेदार त्याला बोलता झाला । "घ्यावे तोंडात तृण, घ्यावी डोईवर वहाण, शरण यावें सुभेदाराला ॥

पहिला हात येऊ दे तुझा सिद्दी तूं हिलाला" ।

पहिला हात जो टाकिला सात हात जमीन उडाला रे हातांमधीं हात त्यानें अठरा टाकीला ।

सुभेदार गुंजभर नाहीं ढळला ॥ "अरे सिद्दी तू हिलाल ।

दुसरा हात येऊं दे तुझा" ॥ सुभेदार बोलला ॥

"संभाळ संभाळ मेरे भाई । आतां हाच येतो सुभेदाराचा ॥

नऊ हात जमीन उडाला । मारा सुभेदारानं केला ॥

बत्तीस वेढे पागोटयाचे । बत्तीस वेढे मंदिलाचे ॥

बेंबीपावेतों चिरित नेला । खुदा रे खुदा बोलला बुध्या धरणीवर पाडिला ॥४६॥

चौक ४७

बोंब्या तेथुनि निघाला । उदेभानापाशीं गेला ॥

"मेरे उदेभान भाई आग लागो तुझ्या चोन्याला । सिंहगड किल्ला डुब होया ।

नऊशें पठाण कापिला । बाच्छाईचा हत्ती कापिला ॥

सीद्दी हिलाल कापिला । हमकु किल्ला डुब होया" ॥

"हम चोन नहीं सोडताई । जावें जळमंदिराला ॥

आहेत बारा जण छोकरे । जावा कल्याणदरवाजाला लढायाला" ।

तुम्हीं जावें लढाईला" ॥ बारा जण भाऊ, केला मरणाचा पोषाग, पांच हत्यारें घेतलीं ।

तेथुन निघाले आले सुभेदाराजवळी ॥ "सलाम सलाम मेरे भाई ।

किस्का तू उमराव सांगावें आम्हांला" ॥ "उमराव शिवाजी महाराजाचा ।

आहे मी तानाजी मालूसरा" ॥ "सुभेदार भाई ।

पहिला हात येऊं दे तुझा" । "तुम्ही आम्हां मोगलांचे बाळक ।

पहिला हात येऊं दे तुमचा " ॥ बारा जण लडक्यांनीं ।

चोवीस हात जे टाकिले ॥ सुभेदार भला ।

त्यानें धांवा अंबेचा मांडला ॥ अंबाबाई तू पाव गे माझ्या नवसाला ।

नऊ हात जमीन उडाला ॥ बारा जण लडक्यांचीं ।

चोवीस खांडोळीं पाडिलीं ॥४७॥

चौक ४८

तेथून बोंब्या निघून गेला । उदेभानाचा जवळ आला ॥

"मेरे उदेभान भाई आग लागो ह्या चोन्याला । सिंहगड किल्ला डुब होया ॥

नऊशें पठाण काटया । बाच्छाईचा हत्ती काटया ॥

सिद्धी हिलाल काटया । तुम्हारे बारा लडके काटया !"

लडक्याचा तो जाब ह्याच्या कानावरतीं गेला ।

उदेभान मोंगल ज्या बिबी xxx बसला होता तेथून उठेनासा झाला ॥

लेंकांचा तो दुःखाचा शब्द । ज्याच्या ऊरामधीं बसला ॥

खरखर लखोटा लिहिला त्या बोंब्यापाशीं दिला ॥

"जाऊन सांगा उमरावाला । उदेभान तो मोंगल पळून पुण्याला गेला ॥

झेंडा लावा सिंहगडाला । यश तुमच्या तलवारीला" ॥४८॥

चौक ४९

उदेभान तेथुन निघाला । आला पिराच्या दरग्याला ॥

फोडल्या कापसाच्या उदी । ओतले तेलाचे बुधले ॥

ज्यानें आग जी लाविली । ज्यानें उजेड तो केला ॥

गलीम किती मोजून पाहिला । पन्नास माणूस पाहून ह्याच्या आलें हिशोबाला ॥

उदेभान माणूस पाहून । त्याच्या भुज्या ज्या थरारल्या ॥

पन्नास माणूस माझी आंबाडाची भाजी मोगल मागें परतला ।

गेला आखाडखान्यामधीं ॥ पायीं तुमानी सुरवारा घातल्या ।

अठरा खंडीचे किनखाप त्यानें आंगांत घातलें ॥ बारा आतबडीचा जोडा ।

त्यानें पायांमधीं घातला ॥ ज्यानें वाघनखें चढविलीं ॥

जिरेटोप डोईस घातला ॥ अठरा जागीं बिब्या ।

हारोहारीनें उभ्या केल्या ॥ सळ पट्टयाचा सोडिला ।

अठरा बिभ्यांची खांडें केलीं ॥ आसुदाचा टिळा ल्याला ।

गाभणीगाई जी काटली ॥ गेला पिराच्या दरग्याला ।

सवामण ऊद जाळिला ॥ एका हातीं गुरदा एका हातीं घेतला पट्टा ।

दोपट्टयाचा मारा केला । आला कल्याणदरवाजाला ।

ज्यानें सलाम वाहिला ॥ दादा नऊशें पठाण ।

ज्यानें दिमतीला घेतला ॥४९॥

चौक ५०

"सलाम मेरे भाई । उंबराव किस्का सांगावा मजला" ॥

"उंबराव शिवाजी महाराजांचा । आहें मी तानाजी सुभेदार" ॥

उंबराव मोगलानें पाहिला । "ऐसा भला आहेस रे दादा ॥

तुज्यासारख्या भाई पाठीला असावा । खाणें घालावें वजिराला वजीर पाळावा बाजूला ॥

सोड महाराजांची चाकरी । कर माझी मोगलाची चाकरी ॥

हवाला देतों सिंहगडाचा । हजार रुपयांची तैनात देतों बसून खायाला" ॥

सुभेदार बोले मोगलाला । "सोड सिंहगडाची गादी ॥

चल माझ्या राजगड किल्ल्याला । चलावे महाराजाचे भेटीला ॥

राजगड किल्ल्याचा हवाला । उदेभाना देतों तुला " ।

एवढया जाबावरुन । घुस्सा आला मोगलाला ॥

"पहिला हात येऊं दे तुझा" । "उदेभान हात येऊं दे तुझा" ॥

तानाजी सुभेदार धांवा अंबेचा मांडिला । धांव धांव अंबाबाई ॥

अंबा त्या बाईनें घोस गाईचा पाहिला । देवी मागें जी सरली ॥

मोगलासमोर उभारिला । गर्भगाळ कोसळला ॥

नऊ हात जमीन उडाला । मोगलाला माराया गेला ॥

हातामधीं हात ज्यानें अठरा टाकिले । गुंजभर नाहीं जो सरला ॥

"ऐका उदेभान मोगला । पहिला हात माझा झाला ॥

दुसरा हात येऊं दे तुझा" । सुभेदार बोलतो "मामा ऐक निर्वाणाची वेळा ॥

लग्न करा रायाबाचें । दोहों हातांचा मुजरा सांगा शिवाजी महाराजाला" ॥

उदेभान मोगल बारा हात जमीन उडाला । वचक सुरबाईचा दाविला मारा कैफाचा केला ।

पन्नास वेढे पागोटयाचे पन्नास वेढे मंदिलाचे बेंबीपावेतों चिरित नेला ।

सुभेदार धरणीला लोटिला ॥५०॥

चौक ५१

पन्नास माणूस, ज्यानें रोजन्या----मांडिल्या, आमच्या सुभेदार धन्या ॥

आम्हाला सांभाळील कोण । आणलेंस वाघाच्या रानाला ॥

मग तो शेलार मामानें । मुर्दा मांडीवर घेतला ॥

उदेभान बोलाया लागला । दादा आपल्या सेनेला ॥

"हात मी नऊशें पठाण । पन्नास माणसें घेऊन जावें॥

कल्याण दरवाजाला ॥ आऊत द्यावी हयांची बुरजाला" ॥

लोक खळखळा रडती कैसें झालें नारायणा । दिन दिन पटयानें वाहिला मारायाला लागला ॥

सुभेदार मेलेला मुरदा इरयानें झाला । ऐशी वर्षांचा तो मामा त्याच्या आंगात संचारला ॥

यश आलें मोगलाला । मोगल मागें जात होता ॥

मग तो सुभेदाराचा पट्टा । शेलार मामानें घेतला ॥

"फीर ग मर्दाचे लंडे फीर ग मर्दाचे लंडे" । मोगल मागे पहात होता ॥

दोहों हातांनीं कचका दिला बेंबीपावता चिरीत नेला ॥ खुदा खुदा बोलला ।

बुधा धरणीला पाडिला ॥ ज्यानें भाव तो आंतला सोडिला मग तो नऊशे पठाण राहीले ॥

नऊशे पठाण । मार माराया लागले ॥

त्यामध्ये एकटा शेलार मामा लढनेवाला । पन्नास माणसांतून पंचवीस माणूस पडला ॥५१॥

चौक ५२

नऊशे पठाण बोलाया लागला । चला कल्याण दरवाजाला ॥

आहुत देऊं पंचवीस माणसांची । संकट पडलें अंबाबाईला ॥

प्रतापगडची भवानी । उभी राहीली सांकडयाला ॥

पिवळें पातळ नेसली । गळीं कवडयांची माळा ॥

संकट पडलें देवीला । यश जातें शिवाजीमहाराजाचें ॥

देवीनें आपल्या हातून दरवाजा उघडिला । पन्नास कमी बारा हजार फौज किल्ल्याला घेतली ॥

ज्याचा सूर्याबा तो बंधु । मामाला पुसाया लागला ॥

"शेलार रे मामा । माझा दादा रे कुठे आहे बंधू रे कुठे आहे" ॥

शेलार मामा रे बोलला । जरी मेलासे बोललों तर सारी फौज बसेल ॥

सुभेदार आहे बाले सद्रेमधीं । मी आहे कल्याणदरवाजाला ॥

नऊशे पठाण मारावा । मग जाऊं दादाच्या भेटीला" ॥

मग त्या बारा हजार फौजेने । ज्यानें हर हर वाहिला ॥

एका एकाच्या मागें तिघे तिघे लागले । नऊशे पठाण कापिला ॥

पांढरें निशाण उपटलें । भगवा झेंडा शिवाजीचा ॥

पांच तोफा जों मारिल्या । यशाच्या तोफा जों मारिल्या ॥

त्या तोफांचा आवाज । गेला राजगड किल्ल्याला ॥

शिवाजी महाराज बोलला । माझ्या सुभेदारानें सिंहगड सही केला ॥

शिवाजी महाराजानें । यशाच्या दहा तोफा सोडिल्या ॥५२॥

चौक ५३

ज्याचा सूर्याबा तो बंधू । शेलार मामाला बोलला ॥

चला जाऊ दादाच्या भेटीला । शेलार मामानें सूर्याबा बंधूचे ।

पटे घेतले आपल्या हातामधीं ॥ गेले मुर्द्याचे जवळ ।

वरुन शेला उघडिला ॥ मुर्दा दादाचा पाहिला ।

मुर्दा सुभेदाराचा पाहिला ॥ "माझ्या सुभेदार दादा लग्न रायाबाचं राहिलं ।

ह्याचें लग्न करील कोण" ॥ बारा गेटांचे (मेटांचे) कोळी निघाले ।

आले सुभेदाराजवळ ॥ "आमचा सुभेदार धनी ।

आम्हांला तैनात देईल कोण आम्हांला हवाल देईल कोण" ॥

सुभेदार बोलायाला लागला । "भिऊं नका रे दादांनो ह्या दादाचें वचन पुरें करीन ॥

जातों राजगड किल्ल्याला । सांगतों शिवाजी महाराजाला सिंहगडाचा हवाला देतों तुम्हाला" ॥

अबिर गुलाल । ज्याचे मुर्द्यांत भरला ॥ दोरा रेशमाचा घातला ।

मुर्दा पालखींत ठेविला ॥ पंचवीस कमी बारा हजार लोक सगळे घेतले ।

वाजत गाजत मुर्दा गेला राजगड किल्ल्याला ॥५३॥

चौक ५४

आले किल्ल्याचे पोटाला । पांचकर्णांचा बाजा केला ॥

आवाज महाराजानें घेतला । सुभेदार किल्ला घेऊन आला ॥

सुभेदाराची पालखी । नेली राजाचे सदरेला ॥

शिवाजी महाराजानें । मुर्दा पाहिला सुभेदाराचा ॥

शिवाजीचे राज्यांत । ऐसा उंबराव होणें नाहीं सुभेदारासारखा ।

जिजाबाई धांवत आली । पालखी पाहिली ॥

गर्व आला सुभेदाराला । नाहीं आला भेटायाला ॥

बाई पालखीपाशीं आली । बाईनें शेला उघडिला ॥

मुर्दा सुभेदाराचा पाहिला ॥ आंग धरणीला टाकिलें ॥

"सुभेदारासारखा । ऐसा क्षत्री होणार नाही ॥

बाजू गेली महाराजांची । बाजू गेली शिवाजीची" ॥

मग त्या शिवाजीनें चाकराचे साठीं । डोईला रुमाल बांधला ॥

बारा भोयांचे पालखींत । सुभेदाराचा मुर्दा जो घातला ।

वाजत गाज्त आणला उमराठया गांवाला । ह्याचे लेकाचे भेटीला ॥

पांच कर्णांचा आवाज । रायाबा बेटयानें केला (ऐकला?) ॥

रायाबा बोलतो । बाबा आले माझे लग्नाला ॥

पालखीपाशीं धांवत आला । मुर्दा बाबाचा पाहिला ॥

"साता दिवसांची मुदत ॥ केली माझे लगनाला ॥

बाबा माझें लगीन करील कोण । यजमान होईल बाबा कोण ? मंडपांत मिरवेल कोण ? ॥

आग लागो ह्या लग्नाला । कां माझा बाबा निघून गेला" ॥

शिवाजी राजानें । मुलगा पोटासंगं धरिला ॥

"भिऊं नको माझे बेटा । शिवाजी महाराज तो गेला, तान्हाजी सुभेदार ।

आहे तुला " ॥ बारा दिवसांचे सुतक धरिलें ।

शिवाजी महाराजांनीं सुभेदाराचें ॥५४॥

चौक ५५

मग त्या तेराव्या दिवसांत । संयबर बाळाचे मांडिलें ॥

ज्यानें मंडप घातला । मंडपाला तोरण बांधिलें ॥

पहिली नवरी रद्द केली । कडाशीचे दरकराची केली रायबा बेटयाला ॥

संयवर केलें रायाबाचें । रायाबा पुढें तो बसविला ॥

बापाची सरदारी । दिली रायाबा बेटयाला ॥

दिवटया बुदलीची जहागिर । दिली रायाबा बेटयाला ॥

डोणजं तें गांव । दिलें पानसुपारीला ॥

मालुसर्‍याचा दंड । दिला इनाम खायाला ॥

रायाबा तो बेटा । ज्यानें संगतिला घेतला ।

आले राजगड किल्ल्याला ॥ ज्यानें पंतोजी तो काका ।

ज्यानें हुजर्‍या बोलविला ॥ "पंतोजी तो काका ।

जावें पुण्याचे शहराला ॥ मंडईच्या बाजारीं ।

आहे तुळशीदास शाहीर ॥ घेऊन यावें त्याला ।

राजगड किल्ल्याला" ॥ तुळशीदास शाहिर ।

त्यानें सदरेला आणिला ॥ डफ तुणतुणें घेऊन ।

मग त्या तान्हाजी सुभेदाराला ॥ शिवाजी महाराजांचा ।

पोवाडा कटिबंध केला ॥ हजार रुपयांचा तोडा ।

हातामधीं घातला त्या रे तुळशीदास शाहीराच्या ॥ शूरमर्दाचा पोवाडा ।

शूरमर्दानें ऐकावा ॥ शिवाजीचे राज्यांत ।

ऐसा उमराव होणें नाहीं ॥ पोवाडा गात्याला उद्राण ऐकत्याला घडो पुण्य ।

सत्य युगींचा पोवाडा कलयुगीं वर्तला ॥ सत्तावीस किल्ल्यांचा सरदार निघूनशानी गेला ।

ऐसा पुनः होणें नाहीं ॥५५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel