५३

महात्माजींचे हास्य म्हणजे अपूर्व वस्तू होती. जवाहरलाल आत्मचरित्रात म्हणतात : ‘महात्माजींचं हास्य ज्यानं पाहिलं नाही, त्यानं फार मौल्यवान वस्तू गमावली, असं मी म्हणेन.’ महात्माजींनी कोठे तरी म्हटले आहे, ‘माझ्या ठिकाणी हास्य नसतं, विनोद नसता तर मी कधीच चिरडला गेलो असतो.’ काकासाहेब कालेलकर महात्माजींच्या हास्याला मुक्त पुरुषाचे हास्य म्हणत.

१९३४ च्या अखेरीस मुंबईस राष्ट्रसभेचे अधिवेशन भरले होते. अधिवेशन समाप्त झाले. पुढारी आपापल्या गावी जाऊ लागले. त्या वेळेस राजेंद्रबाबू अध्यक्ष होते. ते आज परत जायचे होते. सकाळी आठाची वेळ. तेथील सभांगणात महात्माजी, राजेंद्रबाबू, सरदार आदी थोरथोर मंडळी उभी होती. मी दुरूनच तो प्रसंग पाहत होतो. राजेंद्रबाबूंनी महात्माजींच्या चरणांना स्पर्श केला. वातावरण गंभीर झाले. डोळ्यांतून अश्रू चमकले. वातावरणाचा भार कमी करण्याची जादू महात्माजीच जाणत. शेजारी एक स्वयंसेवक होता. महात्माजींनी त्याच्या डोक्यावरची टोपी घेऊन सरदारांच्या डोक्यावर चढवली! सारे मोठ्याने हसले. महात्माजींनी मुक्त हास्य केले. गंभीर वातावरण पुन्हा आनंदमय झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel