पक्ष्यांचा राजा गरुड जेव्हा जेव्हा आपला दरबार भरवीत असे तेव्हा तेव्हा बहुतेक सगळे पक्षी दरबारात हजर राहत असत. पण त्या दरबाराच्या शांततेत दोन पक्ष्यांच्या वागणुकीमुळे नेहमी व्यत्यय येत असे. हे दोन पक्षी म्हणजे घार व डोमकावळा. दोघात अधिक उंच उडणारा कोण याबद्दल व दरबारात जास्त मान कोणाला मिळावा यावर दोघांचे नेहमी भांडण होत असे. एके दिवशी हे भांडण इतके जोराचे झाले की, ते मिटविण्यासाठी त्या दोघांनाही आपले म्हणणे गरुडाच्या कानावर घालून त्याचा निकाल लावण्याची विनंती करावी लागली. ते ऐकून गरुड म्हणाला, 'तुम्हा दोघात श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण हे सांगताना मी तुमची मनं दुखवू इच्छित नाही. तरीही मला वाटतं की तुम्हा दोघात जो अधिक मूर्ख असेल त्यानं प्रथम दरबारात यावं आणि कमी मूर्ख असेल त्यानं नंतर यावं आणि या नियमाप्रमाणे तुम्हा दोघांत श्रेष्ठ कोण हे तुम्हीच ठरवावे.'

तात्पर्य

- ज्यांना समाजात फारसा मान नसतो, असे लोक आपापसात स्वतःच्या मानासाठी फार वेळा हमरीतुमरीवर येतात. पण त्यामुळे ते आपले हसे मात्र करून घेतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel