दोन लढाऊ जातीचे कोंबडे एका ठिकाणी चरत असता त्यांची अकस्मात गाठ पडली. ते मुळचेच भांडखोर असल्यामुळे एखाद्या क्षुल्लक कारणावरून त्यांना भांडण्याची सवय होती. तेव्हा त्यांनी एकमेकांकडे पाहताच डोळे वटारले, पंख फडफडावले व मोठ्याने आवाज करून लढाईस सुरुवात केली. ही लढाई इतकी भयंकर झाली की, त्यात दोघेही जखमी होऊन धापा टाकीत जमिनीवर पडले. त्यांची ती लढाई पहात एक बदक जवळच उभे होते, ते त्यांना रागावून म्हणाले, 'माझ्या शहाण्या शेजार्‍यांनो, ही लढाई करण्यात तुम्ही केवढा मूर्खपणा केला ? सर्वात भांडखोर माणसेसुद्धा असल्या लढाया क्वचित् करतात. दुसर्‍याचा आवाज ऐकू आला किंवा आपल्या हद्दीतला एखादा पडलेला दाणा दुसर्‍याने घेतला तर तुम्ही जे भांडता, त्याचा तुम्हाला काहीच फायदा होत नाही, पण हातपाय मात्र मोडून घेऊन जन्माचे निकामी होऊन बसता !'

तात्पर्य

- क्षुल्लक गोष्टीसाठी भांडण करणे मूर्खपणाचे होय.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel