पाणिनी  प्रकरण १३

पटवर्धन, विहंग विरुध्द शेफाली या दाव्यातील कागदपत्रे तपासात होता तेव्हा सौम्या आत येऊन म्हणाली, “आर्या बाहेर आली आहे.ती सारखी रडत्ये, झटका आल्या सारखं करत्ये.मला नाही वाटलं की तिला बाहेर जास्त थांबवाव.”

“ रडायचं कारण काय तिला?”  पाणिनी  म्हणाला.

“ बहुदा तिच्या मामाला अटक केल्याचा धक्का तिला बसला असावा.”

“ मला वाटत नाही तसं, त्याला अटक होईल याचा तिला अंदाज आला तेव्हा ती खंबीर पणे उभी होती.”  पाणिनी  म्हणाला

“ तिच्यावर लक्ष ठेवा पण.म्हणजे जरा काळजीने बोला तिच्याशी नाहीतर काय होईल तिचं सांगता येणार नाही.” –सौम्या

“ ठीक आहे सौम्या , पाठव तिला आत. आणि तू ही इथेच थांब.”

सौम्या ने फोन वरून आर्या ला आत पाठवायची सूचना रिसेप्शनिस्ट ला  दिली.

ती आत येताच सौम्या ने तिच्या खांद्यावर हात ठेवून धीर दिला आणि तिला खुर्चीत बसवलं. तो आधार मिळताच आर्या ला अजूनच रडू आलं.

“ काय झालं ? ”  पाणिनी  म्हणाला.

“ हर्षद  ला पोलिसांनी बरोब्बर सापळ्यात अडकवला.” आर्या मुसमुसत म्हणाली.

“ म्हणजे काय झालं नक्की? ” पाणिनी  म्हणाला.

“ आपण जे सांगतोय त्याचा परिणाम काय होणार आहे याचा विचार न करता तो बोलून गेला पोलिसांना आणि आता त्याचा परिणाम गंभीर  होणार हे लक्षात येताच ,आपल्याला साक्षीदार म्हणून कोर्टात जायला लागू नये  म्हणून कुठेतरी गायब होण्याच्या विचारात आहे.”

“ असं काय सांगितलं त्याने ? ”

“ खांडवा ला जाण्यापूर्वी अर्धा तास आधी नाश्ता करताना त्याने  टेबलाच्या ड्रॉवर ला हात घातला तेव्हा तो टोकदार चाकू तिथे नव्हता.! ”

 पाणिनी  एकदम हादरून खुर्ची वरून खालीच उतरला. “ त्याची खात्री आहे तशी? ”

“ तो म्हणतोय की नक्कीच नव्हता , त्याची खात्री आहे ”

“ त्याने तशी जबानी पोलिसांना दिली ? ”  पाणिनी  म्हणाला.

“ हो ,दिली.”

 पाणिनी  चा चेहेरा काळवंडला.

“ त्याचा हा जबाब मोठा परिणाम करणारा ठरणार आहे का? ” त्याच्या चेहेऱ्या वरील काळजी पाहून सौम्या ने विचारलं.

“ खूपच ! लक्षात घे, विहंग ने जाणून बुजून खून करायचे ठरवले असेल आणि त्याला भासवायचे असेल की झोपेत असताना त्याच्या हातून हे कृत्य घडलंय तर तो काय करेल? झोपायाला जाण्यापूर्वी तो चाकू टेबलाच्या कप्प्या तून काढून स्वतःकडे ठेवेल कारण त्याला माहिती आहे की आर्या त्याला संरक्षण देण्याचे दृष्टीने टेबलाच्या त्या कप्प्याला कुलूप लावेल.आपल्याला विहंग ला वाचवण्यासाठी असं सिध्द करावं लागणार होतं की झोपेत असतानाच त्याने चाकू बाहेर काढला आणि तसाच तो  बाहेरगेला आणि त्याच्या हातून झोपेत खून झाला.पण आता हर्षद च्या जबानी मुळे असे सिध्द होणार आहे की त्याने झोपेत  असताना टेबलाच्या कप्प्यातून चाकू नाही काढला कारण, झोपेत चालणारा माणूस कुलूप लावलेला कप्पा नाही उघडणार. म्हणजे ज्या अर्थी  हर्षद म्हणतोय की त्याला कप्प्यात चाकू दिसला नाही त्या अर्थी विहंग

ने जाणते पणेच , पूर्ण जागा असतानाच कप्प्यातून चाकू काढला आणि खून केला. थोडक्यात हा पूर्व नियोजित आणि थंड माथ्याने केलेला खून ठरतो.-कोल्ड ब्लडेड मर्डर. ”  पाणिनी  म्हणाला

“ कदाचित हर्षद ची चूक होत असेल. ” सौम्या ने आशा व्यक्त केली.”

“ नाही.”  पाणिनी  ठाम पणे म्हणाला.  “ तो चुकू शकत नाही.लक्षात घे  सौम्या, त्या ड्रॉवर ची किल्ली फक्त आर्या कडेच होती.तिने तो ड्रॉवर लॉक केला तेव्हा मी तिथेच होतो.आम्ही दोघांनी असं गृहित धरलं होतं की लॉक करताना चाकू आतच होता.आम्ही ड्रॉवर उघडून खात्री न करताच लॉक केलं.किल्ली शोधण्यासाठी मदत कर असं सांगत बल्लव आर्या कडे आला, तिने थातूर मातूर कारण सांगून किल्ली तिथेच वर होती असं त्याला भासवलं. ”  पाणिनी  म्हणाला

विचार करत तो फेऱ्या मारायला लागला.त्याची ती खास सवय होती.फेऱ्या मारल्या की त्याच्या विचार शक्तीला चालना मिळत असे ”

ही शांतता आर्या ला सहन नाही झाली. ती एकदम उद्गारली, “ आम्ही आता सर्व ठरवलंय. हर्षद आता लगेच कुठले विमान मिळाले तर ते पकडून आशा ठिकाणी जाईल की कोणाला कळणार नाही तो कुठे गेलाय.त्याला अजून समन्स आलेले नाहीये ,साक्षीला किंवा चौकशीला यावे म्हणून.त्याच्या आतच तो निघून जाईल.पटवर्धन, मला सल्ला द्या ठीक राहील ना असं केलं तर? ”

“ त्याने जबाब दिलाय नक्की? ”  पाणिनी  म्हणाला.

“ हो ,दिलाय.”

“ त्यावर सही केल्ये त्याने ? ”  पाणिनी  म्हणाला.

“ सही?.... मला.... मला नाही वाटत त्याने सही केली असेल ” आर्या म्हणाली.   “ त्याला समन्स मिळण्या पूर्वी तो परदेशात कुठेतरी निघून जाऊ शकत नाही का? ”

“ सरकारी वकील आणि पोलीस त्याचा वर्तमान पत्र मोठा कांगावा करतील त्याने असं केलं तर.वर्तमानपत्रकारांसमोर , साक्ष दयावी लागू नये म्हणून पळून गेला अशी बातमी छापली जाईल.विहंग च्या दृष्टीने जनमानसात त्याची छी:थू होईल. ”  पाणिनी  म्हणाला  “ अत्ता कुठे आहे तो? ”

“ तुमच्या ऑफिस च्या इमारतीसमोर रस्त्याच्या पलीकडे आहे.त्याच्या गाडीत बसलाय. रावसाला न्यायची बॅग गाडीत तयार आहे. विमानाचे तिकीट काढून झालंय.आधी तो .........”

आर्या बोलायची थांबली. बाहेरून आरडा ओरडा ऐकू आला अचानक. “ तुम्ही असे आत घुसू शकत नाही.  पाणिनी  पटवर्धन कामात आहेत. तुम्ही  आधी कळवायला  पहिजे होत.” –एका स्त्री चा किंचाळून  आवाज आला.

पाठोपाठ एक पुरुषी  आवाज आला. “ तुमच्या नियमांना मारो गोली मी आत जाणारच.” धाडकन दार उघडून हर्षद आत आला.त्याच्या हातात एक मोठा कागद होता. “ अहो त्यांनी मला माझ्याच गाडीत बसलो असताना  पकडले , तुमच्या ऑफिस समोरच. आणि उद्याच सकाळी दहा वाजता कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावलं.”तो म्हणाला.

“ खांडेकर आपल्या पुढे एक पाऊल टाकणारा निघाला.तो चतुर आहे.” पाणिनी  म्हणाला

“ आज रात्रीच विमान आहे.कोर्टात उद्या जायचंय, तो निघून गेला तर काय होईल? ” आर्या ने  पाणिनी  ला विचारलं.

“ त्यांनी त्याला नक्कीच नजरेखाली ठेवलं असलं पाहिजे.समन्स मिळाल्यावर त्यांनी माझ्या ऑफिस मधे त्याला येताना पाहिले असणारच. आता जर तो परदेशात निघून गेला,समन्स मिळाल्या नंतर सुध्दा तर  मीच सल्ला दिला असं म्हणून माझ्यावरच त्याचं बालंट आणतील खांडेकर.”  पाणिनी  म्हणाला  “ मला तशी ही कल्पना आधीपासून मान्य नव्हतीच. आता आलं अंगावर तर घेऊ शिंगावर. मला सगळ सांग प्रथम पासून हर्षद.”  पाणिनी  म्हणाला

“ मला भीती वाटत्ये आता,मी बोलून गेलो एकदम.मला खूप इच्छा आहे की मी जे बोलून गेलो ते चुकून सांगितलं अस म्हणायची संधी मला पुन्हा मिळावी.”

“दहा लाखात एक संधी मिळणार नाही तुला”  पाणिनी  म्हणाला  “ तुझी साक्ष न घेता सुध्दा त्यांना जे सिध्द करायचं आहे ते सिध्द करता येईल.कारण आर्या ने  ”ड्रॉवर लॉक केलं होतं आणि किल्ली तिच्याकडे ठेवली होती.त्यावेळी आत चाकू असू शकत नव्हता, आत असता तर विहंग ला तो काढता आला नसता.”

“ पण मी ड्रॉवर लॉक केलं होता हे त्यांना कुठे माहिती आहे? ” आर्या म्हणाली.  “ मी शपथेवर सांगेन मी उघडाच ठेवला होता म्हणून.”

“ तू सत्यच सांगायचं आहेस. खोटी साक्ष देऊन अशिलाला सोडवायची वेळ येत असेल तर मी अशी प्रकरणे स्वीकारतच नाही.माझं अशील निर्दोष आहे असं मला वाटलं तरच मी त्याची वकीली घेतो.परिस्थितीजन्य पुरावा सकृत दर्शनी आरोपीच्या विरोधात आहे असं वाटत पण आपण जर त्या परिस्थितीजन्य पुराव्याचा योग्य अर्थ लावला,तर तो खऱ्या गुन्हेगारांपर्यंत बरोबर पोचवतो.”  पाणिनी  म्हणाला

फोन वाजला.ओजस चा होता.  “ खूप महत्वाचा आहे असं म्हणतोय कनक.” सौम्या म्हणाली.

“  पाणिनी  मधे काहीही न बोलता ऐक.” ओजस म्हणाला.  “ माझी माणसं शेफाली च्या मागावर होती वकीलांच्या ऑफिस मधून निघाल्या पासून. त्यानीच मला अत्ता सांगितलं की ती बया अत्ता तुझ्या ऑफिस मधे येण्याच्या विचारात दिसत्ये कारण तिची गाडी आपल्या ऑफिस च्या इमारतीच्या समोरच लावल्ये . तुला जरा तयारीला वेळ मिळावा म्हणून तातडीने फोन केला. ”

“ हर्षद आणि आर्या दोघांनी नीट ऐका ”  पाणिनी  ,ओजस चा फोन झाल्यावर म्हणाला.  “शेफाली अत्ता इथे येते आहे.तुम्हाला इथे पाहिलं तर ती कदाचित ज्या कारणासाठी इथे येते आहे तो विचार ती बदलेल.तिला तुम्ही दिसत कामा नये.नाहीतर गोंधळ माजेल.सौम्या तुम्हाला दुसऱ्या खोलीत घेऊन जाईल.सर्व आलबेल झालं की तुम्ही त्या खोलीतून बाहेर च्या रस्त्याला लागा.तुम्ही रस्त्यात गेलात की आर्या, तुला ही  समन्स देण्यासाठी  ते पुढे येतील.त्यांना टाळू नकोस.हुलकावणी देऊ नकोस.हसत मुखाने घे. सौम्या, या दोघांना लायब्ररीत बसव.”

सौम्या त्यांना घेऊन दुसरी कडे बसवून येई पर्यंत ऑपरेटर ने आत फोन करून सांगितलं की बाहेर शेफाली खोपकर नावाची स्त्री आल्ये आणि तिला अत्यंत तातडीने भेटायचं आहे.

“ आत पाठव तिला.”  पाणिनी  म्हणाला  “ सौम्या तू तुझ्या केबिन मधे पळ पटकन.मी इथून तुझ्या केबिन मधे इंटर कॉम जोडून ठेवतो.तुला आम्ही बोलू इथे ते सर्व ऐकता येईल.त्याच्या नोट्स घे. जा पटकन.”

ती गेल्यावर  पाणिनी  दाराकडे पाहत शेफाली आत येण्याची वाट पहात राहिला. शेफाली ला घेऊन ऑपरेटर आत आली. पाणिनी  ने पाहिलं, ती तिशीच्या घरात होती.आकर्षक. पाणिनी  कडे बघून हसली.ओठाला  लाल लिपस्टिक,, पिंगट छटा असलेले केस.अजिबात अवघडल्यासारखं वाटून ण घेता ती सरळ  पाणिनी  जवळ आली आणि तिने त्याच्याशी शेक हॅंड केला. “ खूप आनंद झाला भेटून तुम्हाला. मी खूप ऐकल होत तुमच्या बद्दल.”

 पाणिनी  ने तिला सोफ्यावर बसायची खूण केली.

“ मला असं कळलंय की तुम्ही खूप हुशार आहात. ”

“ माझ्या बद्दल ची माहिती एखाद्याला आरोपी कडून मिळते की तक्रारदाराकडून यावर माझा नाव लौकिक ठरतो ! ”  पाणिनी  हसून म्हणाला.

“ असं काहीच नाही.तुम्हाला माहिती आहे की स्वत:ला की तुम्ही चांगले वकील आहात,मग मान्य का नाही करत ?तुम्हा वकिलांचं  मला हेच कळत नाही,कोणतीही गोष्ट मान्य करत नाहीत ते.त्यांना नेहेमी वाटत आपल्याला कोणी तरी अडकवेल एखाद्या जाळ्यात,जर आपण मान्य केली एखादी गोष्ट तर.” शेफाली खोपकर म्हणाली.

पटवर्धन हसला. “ ठीक आहे , मी चांगला आहे असं मान्य करतो.पुढे काय ? ” त्याने विचारलं.

तिचा चेहेरा जरा उतरला.गंभीर झाला, डोळ्यात अस्वस्थपणा आला पण ओठावरचं हसू  तसचं राहिलं.त्यातून पांढऱ्या दंत पक्ती दिसतं होत्या. “ तर मग तुम्ही आमच्या नवरोजींच वकीलपत्र

घेतलय तर ! ”

पटवर्धन  काही बोलता  नाही,फक्त मान हलवली .

“ तुम्ही त्याला बाहेर काढू शकाल? ” शेफाली खोपकर ने विचारल

पटवर्धन ने पुन्हा मन डोलावली.

“ मी इथे आल्ये ती हे पाहायला की मी तुम्हाला काही मदत करू शकते का . म्हणजे बिचाऱ्या विहंग ला.” शेफाली उद्गारली.

 पाणिनी  पटवर्धन ने आपली सिगारेट भर काढून शिलगावली. “ नेमकं काय करायचं मनात आहे तुमच्या ? ”

“  मी साक्ष द्यायला तयार आहे की विहंग हा गेले काही दिवस मानसिक रोगाची शिकार बनला आहे त्यामुळे तो असमंजस पणे वागतो, विशेषतः रात्रीच्या वेळी. अनेकदा रात्री त्याला संभ्रमित अवस्थेत फिरायची सवय आहे.सुरवातीला तर मला वाटायचं की तो मला ठार मारेल पण नंतर थंड डोक्याने विचार केला तेव्हा कळल की  तसं नाहीये, तो बिचारा मन ताळ्यावर नसल्याने हे करतोय.” ती म्हणाली.

“ आणखी काय? ”  पाणिनी  म्हणाला.

“आणखी काय अपेक्षित आहे तुम्हाला ? ” आता तिच्या चेहेऱ्या वरील हास्य लोप पावले होते.

“ काहीही, मला सांगण्यासारखे असेल तर.”

“ मी नेमकी या सर्वात कुठे बसते हे जो पर्यंत मला समजत नाही तो पर्यंत मला नाही वाटत की मी आणखी काही सांगू शकेन म्हणून.” शेफाली  म्हणाली.

“ काय समजत नाही तुम्हाला ? ” पाणिनी  म्हणाला.

“हेच की तुम्ही मला सहकार्य करणार होतात की नाही ”

“ यात सहकार्य करायचं की नाही हा प्रश्न उपस्थित होतो असं मला वाटत नाही.तुला जर स्वत:हून काही साक्ष द्यायची असेल तर माझी तयारी आहे ऐकायची.”

“ मी बऱ्याच गोष्टी सांगू शकते. तुम्हाला बचाव पक्ष म्हणून मी काय बोलल्याचा फायदा होईल हे तुम्हीच सांगा. ” शेफाली  म्हणाली.

 पाणिनी  काही बोलला  नाही , ती पुढे काय बोलते ते त्याला पाहायचे होते.

“ असं आहे  पाणिनी  पटवर्धन, की नवरा बायको म्हणून एकत्र संसार करताना अनेक प्रसंग घडतं असतात रोजच. कालांतराने ते विसरले जातात पण कधी कधी काही कारण घडलं तर ते पुन्हा आठवले जातात.म्हणून म्हणते मी तुम्हाला काय हवंय ते सांगा.आणि माझ्या उलट तपासणीची काळजी नका करू, मी मारून नेईन सहज.”

“ न्यायाधीशांना पण तू गुंडाळून ठेऊ शकशील? ”  पाणिनी  म्हणाला.

“ तुम्हाला तसे म्हणायचे असेल तर तसे समजा.”

“ ठीक आहे ,तुझा पत्ता आणि फोन नंबर मला देऊन जा.मला वाटलं, काही सुचल तर मी संपर्क करीन तुला.”  पाणिनी  म्हणाला

“ नंतर कशाला ? अत्ता नाही का करू शकणार विचार? ” तिने विचारलं ”

“ नाही.” ठाम पणे  पाणिनी  म्हणाला “ इथे आल्या बद्दल धन्यवाद पण तूं काही सांगायचं असेल तर तुझा वकील तुझ्या बरोबर असलेला चांगला.”

“ हा विषय तुम्ही काढलात बर झालं पटवर्धन ! मी अजून माझ्या वकीलाला लेखी वकीलपत्र दिलाच नाहीये.तो मागे लागलाय पण मी अळंटळं करत्ये.” शेफाली  म्हणाली

“ काय म्हणायचयं तुम्हाला? ”

“ माझ्या वकीलाला असा करार करायचाय माझ्याशी की मला जे काही उत्पन्न मिळेल त्याच्या निम्मे मी त्याला द्यायचे.पण ते मला कबूल नाही. माझा नवरा माझ्याशी चालू असलेल्या वादात यशस्वी होईल असं मला वाटत नाही.”

“ का नाही? ”  पाणिनी  ने विचारलं

“ कारण त्यासाठी  त्याला माझ्या साक्षीची गरज भासणार आहे.तो मानसिक दृष्टया संतुलन बिघडलेला माणूस आहे या आधारावर साक्ष देऊन मी त्याला खुनाच्या आरोपातून मुक्त करू शकले की मी घटस्फोटाचा दावा बाजूला ठेवीन.म्हणजे मी त्याची पत्नी म्हणूनच राहीन आणि त्याच्या मालमत्तेची पालक होईन. ” शेफाली  म्हणाली

“ माझ्या हे सगळ लक्षात येतंय पण तुझा वकील असल्याशिवाय मी तुझ्याशी नाही बोलणार.”  पाणिनी म्हणाला.

“ माझ्या साक्षी बद्दल तुम्ही का चर्चा नाही करू शकत ? माझ्या लक्षातच येत नाहीये.”

“साक्षी बद्दल  चर्चा करू शकतो पण घटस्फोटा बद्दल नाही. ”  पाणिनी म्हणाला.

“ मला वाटतंय पटवर्धन तुम्ही अती सावधपणे वागताय आणि अती तत्वाने पण.”

“ होय.”

“ अतीच करताय तुम्ही. ” ती म्हणाली. ती चिडली नव्हती पण  पाणिनी  ने अॅश ट्रे मधे टाकलेले थोटूक बाहेर काढून तिने जोरात खाली जमिनीवर आपटले.आणि पायाखाली चिरडले.

( प्रकरण तेरा समाप्त)

 

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel