सावकाराने एक दगड आणून त्याला दिला; परंतु त्या माणसाने तो घरी नेताच पुन्हा तो केवळ दगड दिसू लागला. कोठे आहे सोने? हा तर दगड. तो माणूस मनात म्हणाला, ‘जयंता वेडबंबू दिसतो. आणि बापही बावळट दिसतो; परंतु दगड सोन्यासारखा दिसत तर होता. जाऊ द्या. पुन्हा दगड होणारे सोने काय कामाचे?’

जयंता आनंदात होता आणि आता ती मोठी यात्रा येणार होती एका गावी. ते प्रसिद्ध तीर्थक्षेत्र होते. लाखाची यात्रा तेथे जमे. त्या वेळी दूरदूरची शेकडो दुकाने तेथे येत! सारे राष्ट्र तेथे जमे. यात्रा म्हणजे राष्ट्राच्या संसाराचे संमेलन, यात्रा म्हणजे सर्वांचे मीलन-स्थान.

‘जयंता, त्या यात्रेत जातोस का माल घेऊन? जा भरपूर माल घेऊन.’ बापाने सांगितले.

‘होय बाबा, जाईन.’ जयंत म्हणाला.

‘एके दिवशी पाच-पन्नास गाड्या जायला तयार झाल्या. त्यांच्यांत माल भरण्यात आला. जयंता निघाला. ते यात्रेचे ठिकाण आले. जयंताने पाल लावले. सारा माल तेथे त्याने मांडला. गाड्या परत गेल्या. यात्रा भरली. राव रंक सारे आले. जिकडेतिकडे गर्दी.

जयंताच्या दुकानात कोणाची ही गर्दी” हे श्रीमंत लोक नाहीत. हे सारे गरीब लोक आहेत. ह्या पाहा आयाबाया. अंगावर चिंध्या, उघडी मुले कडेवर. जयंता त्यांना फुकट कापड देत होता. त्या दुवा देऊन जात होत्या.

‘दादा, फुकट घेऊ नये परंतु आमच्याजवळ काही नाही,’ त्या आयाबाया म्हणत.


‘तुम्ही फुकट नाही घेत. किंमत भरपूर देत आहात.’ जयंता म्हणे.

‘कोठे रे दिली किंमत?’

‘तुमचे आशीर्वाद हीच किंमत. मनापासून मिळालेला आशीर्वाद म्हणजे अमोल वस्तू आहे.’

जयंताचे दुकान खलास झाले. तो आता बाजारात हिंडू लागला. यात्रा पाहू लागला. तो हजारो लोकांना नीट खायला नाही असे त्याने पाहिले. भावभक्तीने लोक यात्रेला आले; परंतु जवळ ना खायला ना प्यायला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel