पांडव बारा वर्षांच्या वनवासासाठी गेले. या काळात कर्णाची कसोटी लागण्याचा प्रसंग उद्भवला. मात्र कसोटीच्या वेळी तो पूर्णपणे उणाच ठरला. वनात गोधनाच्या पाहणीच्या निमित्ताने जावयाचे व आपले वैभव दाखवून पांडवाना खिजवायचे हा बेत दुर्योधनाला शकुनि व कर्ण यानीच सुचवला. दुर्दैवाने द्वैतवनात दुर्योधनाची गाठ चित्रसेन गंधर्वाशी पडली व युद्धप्रसंग उभा राहिला. कर्णाच्या नेतृत्वाखाली कौरवांनी गंधर्वाचा सामना केला. मात्र गंधर्वांपुढे मात्रा न चालून, कर्णाला जीव वांचवण्यासाठी विकर्णाच्या रथावर बसून पळून जावे लागले. गंधर्वांनी दुर्योधनावर मात करून त्याला बंदी बनवले. सैनिकांनी पळून जाऊन पांडवांना हकीगत कळवली तेव्हां कुरुकुळाचा अभिमान धरून, वयं पंचाधिकं शतं असे भीमार्जुनाना समजावून त्याना गंधर्वांशी सामना करावयास पाठवले. त्यांनी दारुण युद्ध करून गंधर्वांचा पराभव करून दुर्योधनाला सोडवले. युधिष्ठिराने दुर्योधनाची समजून घालून, ’पुन्हा असे साहस करू नको’ असे सांगून हस्तिनापुरास परत जाण्यास सांगितले. अपमानाने व अपरिमित लाजेने दुर्योधन विमनस्क होऊन, परतीच्या वाटेवर बसूनच राहिला. पराजित होऊन पळून गेलेला कर्ण खूप दूर गेलेला असावा. कारण येवढा वेळ गेल्यावर मग सावकाश तो दुर्योधनापाशी परत आला व त्याला बांधवांसह सुखरूप पाहून, दुर्योधनानेच गंधर्वांवर विजय मिळवला असे वाटून, त्याने दुर्योधनाचे अभिनंदन केले! दुर्योधनाने कर्णावर राग न धरता, त्याला सत्य परिस्थिति सांगितली. कर्ण हतबुद्धच झाला! दुर्योधनाने हाय खाऊन ’आपण हे अपेशी मुख घेऊन हस्तिनापुराला येणार नाही व भीष्मद्रोणविदुरांना भेटू शकत नाही’ असे म्हणून बैठक मारली. दु:शासन शोकाकुल झाला. कर्णाने व शकुनीने कशीबशी दुर्योधनाची समजूत घातली. पांडवांच्या पराक्रमाची, ’ते कुरुराज्याचे नागरिक, तेव्हा तुझे रक्षण करणे त्यांचे कर्तव्यच होते, ते त्यानी केले, त्याचे काय येवढे मोठेसे?’ अशी वासलात लावली! त्यानंतर नेहेमीप्रमाणेच कर्णाने ’तेरा वर्षांनंतर युद्धात मी अर्जुनाला मारीन’ अशी प्रतिज्ञा केली. कर्णावरच्या दुर्योधनाच्या भरंवशाला अजूनहि तडा गेला नव्हता हे नवलच! सर्वजण तोंडे लपवीत हस्तिनापुराला परत गेले. सर्व हकिगत कळल्यावर भीष्माने, ’धनुर्वेद, शौर्य व धर्माचरण यांत कर्ण हा पांडवांच्या चतुर्थांशहि योग्यतेचा नाही’ असे दुर्योधनाला स्पष्ट सांगितले. या निंदेने राग येऊन कर्णाने दुर्योधनाच्या वतीने दिग्विजय केला व दुर्योधनाला एक खास यज्ञ करण्याचा अधिकार मिळवून दिला. कर्णाच्या पराक्रमाचे हे एकुलते एक उदाहरण म्हणावे लागेल. कर्णाच्या खालावलेल्या प्रतिमेला उजाळा देण्यासाठी हे प्रकरण मागाहून घुसडलेले असावे असे माझे मत आहे. अध्याय २५४ मध्ये ३१ श्लोकांमध्ये हे प्रकरण उरकले आहे! सर्व राजेलोकाना भेटून त्याना दुर्योधनाच्या पक्षाला वळवण्यासाठी या सदिच्छाभेटी असाव्या असे वाटते.
यानंतर अज्ञातवासाच्या अखेरीला पुन्हा कर्णाची कसोटी लागली त्याबद्दल पुढील भागात वाचा.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel