आतां महाभारतांतील दुसरे उपकथानक पाहूया. हे कथानक कच, देवयानी, ययाति व शर्मिष्ठा यांचे आहे. या कथानकाने खाडिलकरांचे विद्याहरण व शिरवाडकरांचे ययाति-देवयानी हीं दोन नाटके व वि. स, खांडेकरांची गाजलेली ययाति कादंबरी या तीन प्रमुख व सुपरिचित साहित्य कृतीना जन्म दिला आहे. या लेखकानी महाभारतातील मूळ कथेमध्ये मोठे फेरफार केलेले दिसून येत नाहीत. या साहित्यकृतींमुळे ही कथा सुपरिचित आहे. त्यामुळे मूळ कथेची तपशीलवार उजळणी न करतां मला जाणवलेल्या काही खास गोष्टींचाच उल्लेख करणार आहे.
देवगुरु बृहस्पति व दैत्यगुरु शुक्राचार्य यांचेतील स्पर्धा कच-देवयानीच्या प्रेमाच्या आड आली असे विद्याहरण नाटकावरून वाटते. ब्रह्नदेवाचे अंगिरस व भृगु हे दोन पुत्र. बृहस्पती हा अंगिरसपुत्र व कवि हा भृगुपुत्र. शुक्राचार्य हा भृगुपुत्र व कच हा बृहस्पतिपुत्र म्हणजे कच व शुक्र हे एकाच कुळातील व नात्याने भाऊ. त्यामुळे, कच व देवयानी यांचे काका-पुतणीचे नाते होते. हे नाते त्यांच्या विवाहाच्या आड आले काय? देवयानीची विवाहाची याचना नाकारताना मात्र कचाने हे कारण सांगितलेले नाही. कचाने देवयानीची अभिलाषा धरू नये असे शुक्राचार्याने कधीच म्हटले नाही. कच व देवयानी समवयस्क होतीं व देवयानीचे प्रेम कचालाही हवे होते. देवांनी कचाला शुक्राचार्याकडे पाठवले तेव्हा त्यांचाहि तोच हेतु होता की कचाला देवयानी व संजीवनी विद्या दोन्ही मिळवतां येतील! देवयानीचे कचावर खरेखुरे प्रेम होते. त्यापोटी पित्याला गळ घालून तिने कचाला वारंवार जिवंत करविले. अखेर दैत्यांच्या अविचारामुळे कचाची राख शुक्राचार्याच्या पोटात गेल्यामुळे त्याला जिवंत केले तर शुक्र मरणार असा पेच पडल्यावरहि तिने अगतिकपणे, मला तुम्हीहि हवेत व कचहि हवा असा हट्ट धरला. नाइलाजाने, इच्छेविरुद्ध, शुक्राचार्याला कचाला संजीवनी विद्या द्यावी लागली. जिवंत झालेल्या कचाने शुक्राचार्याला जिवंत केले. विद्याहरण नाटकात दाखवल्याप्रमाणे तो लगेचच देवलोकाला गेला नाही तर दीर्घकाळ शुक्रापाशी राहून तपाचरण केले असे महाभारत म्हणते. त्यानंतर तो देवलोकी जाण्यास निघाला तेव्हा देवयानीने, आपल्याला वरावे अशी त्याला विनंति केली ती त्याने नाकारली. तपाचरणाच्या काळात त्याने देवयानीबद्दलचे आकर्षण मनातून काढून टाकले असावे. संसार हा आपला मार्ग नाही व आपण देवयानीला सुखी करू शकणार नाही हे त्याने ओळखले होते. तिचा उतावळा व रागीट स्वभावहि त्याने जाणला असणार. शुक्राचार्याने मला पुनर्जन्म दिल्याने आपले भावाबहिणीचे नाते झाले आहे हे त्याने पुढे केलेले कारण खरे नव्हते. त्यांचे खरे नाते काका-पुतणीचे होते. कचाने नाकारल्यावर रागीट देवयानीने ’संजीवनी विद्या तुझ्या कामास येणार नाही’ असा त्याला शाप दिला. त्यामुळे त्याचे काहीच अडणार नव्हते. आवश्यक तर त्याने ती विद्या देवलोकी इतर कोणाला दिली असती! त्यानेहि तिला उलट शाप दिला की कोणीहि ब्राह्मण तुला वरणार नाही. पुढे ययाति हा क्षत्रिय पतिच तिला लाभला.
कचाची कथा हे एक रूपक असावे असे मला वाटते. गुरु-शुक्र हे ग्रह, कच हा गुरूचा उपग्रह, त्याचे मृत्यु व पुनर्जन्म म्हणजे त्याची ग्रहणे, एक ग्रहण खुद्द शुक्राच्या मागे (शुक्राच्या उदरात) गेल्यामुळे झालेले, तो शुक्राच्या पाठीमागून बाहेर पडताना प्रथम शुक्र तेजोहीन (मृत) व नंतर पुन्हा तेजस्वी (जिवंत) होणे असा काही खगोलशास्त्रीय प्रकार या कथेमध्ये रूपक रूपाने सांगितलेला असावा अशी माझी कल्पना आहे. याला आधार काहीहि नाही! गुरु,शुक्र हे ग्रह आहेत, देवयानी, शर्मिष्ठा, ययाति,वृषपर्वा हे सर्व तारे-तारका आहेत. कचाचा तारा नाही. यावरून दुसरा तर्क म्हणजे कच हा गुरूचा उपग्रह नसून एखादा धूमकेतू असावा! तो प्रथम गुरूजवळ (म्हणून गुरुपुत्र), मग शुक्राजवळ, दिसणे, नंतर शुक्रामागे जाऊन न दिसणे, मग पुन्हा दिसू लागणे व दीर्घकाळ शुक्राच्या जवळपास दिसून मग दिसेनासा होणे असा काही घटनाक्रम या कथेने सुचवला आहे काय अशी कल्पना मला सुचते! याहि कल्पनेला आधार नाहीच!
देवयानीच्या कथेचा उत्तरार्ध पुढील भागात पाहू.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel