भीम-अर्जुन परत आल्यावर बाहेरूनच त्यांनी ’भिक्षा आणली आहे’ असे कुंतीला म्हटले व तिने ’पाचांत वाटून घ्या’ असे म्हटले. द्रौपदी दृष्टीला पडल्यावर मग तिने युधिष्ठिराला, ’आता तूच योग्य काय ते ठरव’ म्हटले. त्याने प्रथम अर्जुनालाच ’तूच द्रौपदीशी विवाह कर’ म्हटले. त्याने ’प्रथम तुझा, मग भीमाचा व मग माझा विवाह होणे उचित तेव्हा तूच विचार कर’ असे म्हटले. विचारांती त्याने द्रौपदी पांचांची पत्नी होईल असा निर्णय दिला. हा सर्वपरिचित कथाभाग एक बनाव वा नाटक होते व त्याच हेतु वेगळाच होता, पांचांनी द्रौपदीला वरावे असे कुंती व पांडवांचे पूर्वीच ठरलेले होते असे वाटते. याचा खुलासा यथावकाश करूं.
यानंतर लगेचच कृष्ण व बलराम आले व आपली ओळख देऊन इतर कुणाला हे पांडव आहेत हे एवढ्यात कळू नये म्हणून घाईने परत गेले. पाठोपाठ धृष्टद्युम्न येऊन गुपचुप पांडवांची व द्रौपदीची हालहवाल पाहून गेला. त्याने द्रुपदाला पांडवाचे आचारविचार, बोलणीं यावरून हे पांडवच आहेत असे म्हटले व आपला हेतु सफळ झाला असे सांगितले. रात्र उलटली. सकाळी द्रुपदाचा पुरोहित येऊन युधिष्ठिराला भेटला व ’आपण पांडवच ना?’ असे विचारले. युधिष्ठिराने मुत्सद्देगिरीने ’ज्याने पण जिंकला तो सामान्य माणूस नव्हेच, द्रुपदाला इच्छेप्रमाणे उत्तम जावई मिळाला आहे’ असे ऐकविले पण स्पष्ट ओळख दिली नाही व पांचांचा द्रौपदीशी विवाह करण्य़ाचा बेत मुळीच कळू दिला नाही. पांडव द्रुपदाच्या वाड्यावर गेल्यावर त्यांच्या चालचलणुकीवरून द्रुपदाची खात्रीच पटली कीं हे पांडवच. त्याने स्पष्टच विचारल्यावर युधिष्ठिराने सर्वांची ओळख करून दिली. द्रुपदाने वारणावताची हकीगत समजून घेतली, धृतराष्ट्राची निर्भर्त्सना केली व पांडवांना त्यांचे राज्य मिळवून देण्यासाठी सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर द्रुपदाने म्हटले की आजच अर्जुनाने द्रौपदीचे पाणिग्रहण करावे. येथून घोटाळ्याला सुरवात झाली!
प्रथम युधिष्ठिराने म्हटले की मलाही विवाह करावयाचा आहे. त्यावर द्रुपदाने त्याला व इतर पांडवांना, ’माझ्या वा माझ्या कुळातील इतर कोणाच्याही कन्या तुम्ही पसंत करा.’ म्हटले. मात्र द्रुपदाची सूचना न स्वीकारतां युधिष्ठिराने ’आम्हा पाचही भावाना द्रौपदीशी विवाह करावयाचा आहे’ असे म्हटले! हे ऐकून द्रुपद हतबुद्धच झाला. ’ही धर्मविरुद्ध, वेदविरुद्ध व जगरहाटीविरुद्ध गोष्ट करावी असे तुला वाततेच कसे?’ असे त्याने म्हटले. यावरचे युधिष्ठिराचे उत्तर अतिशय महत्वाचे आहे. त्यात त्याच्या विचारांचा पाया कशावर आधारला आहे हे दिसून येते. त्याने तीन-चार गोष्टी मांडल्या. १. धर्माची गति गहन आहे. २. माझी वाणी असत्य बोलत नाही ३. माझ्या आईचा माझ्यासारखाच विचार आहे. ४ हा प्राचीन काळापासूनचा आमच्या पूर्वजांचा आचार आहे. ५. हा शाश्वत धर्म आहे. नवलाची गोष्ट म्हणजे हे विचार ऐकल्यावर द्रुपदाने हात झटकले व ’तू, तुझी आई व धृष्टद्युम्न काय ते ठरवा’ असे म्हटले! द्रौपदीची काय इच्छा आहे हे कोणीच विचारले नाही! या वेळी नेमके व्यासांचे आगमन झाले.
द्रुपदाने प्रष्न त्यांच्यासमोर मांडला व हा माझ्या दृष्टीने निव्वळ अधर्म आहे असे म्हटले. धृष्टद्युम्नाने तेच म्हटले. युधिष्ठिराने पुन्हा आपल्या मनाचा व आईच्या मताचा निर्वाळा दिला व कुंतीनेहि त्याला दुजोरा दिला. यावर व्यासांनी ’हा सनातन धर्म आहे व हे कसे ते मी तुला एकट्यालाच सांगतो’ असे म्हटले. मग एकांतात व्यासानी द्रुपदाला द्रौपदीची पूर्वजन्मीची कथा सांगितली. पांडव हे इंद्र, द्रौपदी ही लक्ष्मी, द्रौपदीने तप करून उत्तम पति दे असा वर पांच वेळा मागितला व शंकराने तो दिला. पांच वरांचे फळ म्हणून पांच पांडवांचा व द्रौपदीचा विवाह हा देवांनीच, विशेषत: शंकरानेच योजलेला आहे असे बरेच काही सांगितले! यावर बोलण्यासारखे काही न उरल्यामुळे ’शंकरानेच हे योजले असेल तर मग हा धर्म असो वा अधर्म, माझ्याकडे दोष नाही’ असे म्हणून, अजूनही द्रौपदीला न विचारतांच द्रुपदाने विषय समाप्त केला! त्यानंतर पांचहि पांडवांचा एकेका दिवशी क्रमाक्रमाने द्रौपदीशी विवाह झाला. द्रुपदाने अनेक अहेर केले. नवल म्हणजे पांडवाचे तर्फे कौरव, यादव वा इतर कोणीही उपस्थित नव्हते. कृष्णाने अहेर पाठवून दिले. विवाहांची बातमी स्वयंवराला जमलेल्या राजेलोकांना गुप्तदूताम्कडून कळली! पांडव लाक्षागृहांतून वांचल्याचे कळ्ल्यावर या राजांनी कौरवांची, खुद्द भीष्माचीहि, निंदा केली व सर्व परत गेले. कौरवही पांडवांना वांचलेले पाहून चरफडत हस्तिनापुराला परत गेले. अशा प्रकारे हा लोकविलक्षण विवाह पांडव व द्रुपद यांनी गुपुचूप उरकून घेतला! प्रत्यक्ष विवाहाची कथा येथे संपली. याचे मागील खरी कथा पुढे पाहू.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel