संध्याकाळची वेळ . गोकुळात तरुण आणि अवखळ  गोपींचा खेळ रंगात आला होता . त्या झोके खेळत होत्या . फेर धरत होत्या आणि गाणीही म्हणत होत्या . मनभावन श्रावणऋतु होता ना .

राधा मात्र सख्यांची नजर चुकवून पळाली . तिला आता यमुनाकाठ गाठायचा होता .

हुरहूर लावणारीच ती वेळ . हवेत सुखद  गारवा .  सोनेरी पिवळसर ऊन . झाडांच्या शेंड्यांशी सलगी करणारं . घरी जाण्यापूर्वी  प्रियाच्या गळ्यात लडिवाळपणे झुलणाऱ्या अभिसारिकेसारखं . पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला . घरट्यांकडे परतण्यापूर्वीचा . गुरं आपापल्या घराकडे निघालेली . त्यांचा हंबरण्याचा आणि गळ्यातल्या घंटांचा गोड किणकिणाट . प्रत्येकालाच एक ओढ लागलेली ...

यमुना   वहात  होती . श्रावणसरींनी नुकतंच एक हलकं शिंपण घातलं होतं . गवतावर पाण्याचे थेंब  होते , मोत्यांसारखे . तर काही थेंब  हळदुल्या उन्हामुळे सोनेरी भासत होते .

सोनसरींनी न्हायलेलं इतकं निसर्गरम्य वातावरण की  भान हरपून जावं !

राधेचंही भान तस्संच  हरपलेलं होतं ; पण तो निसर्ग पाहून नव्हे ,तर ते तिच्या प्रियासाठी - कृष्णासाठी !  तिलाही ओढ लागली होती, त्याच्या भेटीची.    

ती अभिसारिका लगबगीने एका सुनिश्चित कदंबवृक्षापाशी चालली होती.  तिला तो निसर्ग जणू दिसतच नव्हता . तिचा निसर्ग , तिचं  विश्व म्हणजे फक्त कृष्णच !

श्रावणसरी  बरसून गेल्या तरी राधेच्या तापल्या मनाला त्यामुळे शीतलता लाभणार नव्हतीच .

ती कदंबापाशी पोचली , पण तिथे कुणीही नव्हतं . ती बिचारी एकदम बावरली.  तिचे  कावरेबावरे नेत्र  भिरभिरले . पण तो खरंच आला नव्हता . तिने कदंबामागे , आजूबाजूच्या झाडांमागे डोकावून पाहिलं . कदाचित , तिची फिरकी घेण्यासाठी तो कुठे दडून बसला असेल , तर त्याला शोधण्यासाठी . कान्हाच तो , काही कमी खोडकर नव्हता !   

आकाशी सप्तरंगी इंद्रधनू उमटलं होतं . पण त्या चित्तकठोराची पावलं अजून तिथे उमटायची  होती .

ती कदंबाच्या झाडाला टेकून उभी राहिली . स्तब्ध , चिंताक्रांत . तिची शांतता भंग पावली ती वर उडालेल्या बगळ्यांच्या पांढऱ्या माळेने . तिने त्रासून वर पाहिलं आणि तिच्या कपाळावरच्या आठ्या पाहून यमुना खळखळून हसली . त्यावर राधेने तीच त्रासिक नजर तिच्याकडे वळवली .

" यमुने,  भारी गं !  अजून आवाज कर . मला तो एरव्हीचा तुझा नादमधुर खळाळसुद्धा नकोसा  वाटतोय . तू मला आणखी छळ . हस मला .  माझ्या जीवाला अगदी नकोसं झालंय तर तू माझ्या अणिकच खोड्या  काढ ," राधा तिला दुःखाने  आणि रागाने म्हणाली.  

तिच्या  त्या बोलण्यावर यमुना अवखळ  खळखळली .  खोडीलसारखी ती आणिकच  लचकत - मुरडत वाहू लागली . ते पाहून राधेचा राग वाढला .

आणि दुरून बासरीचे कर्णमधुर स्वर कानी आले.  स्वर्गीय संगीताने आसमंत भरून गेला .

वेडी राधा मनी मोहरली . तिचा राग कुठे पळून गेला. कृष्णमीलनासाठी तिचं मन , तिचा देह रोमांचितपणे थरथरू लागला .

तिकडे त्या  स्वरांनी यमुनाही क्षणभर थबकली आणि म्हणाली , " राधे , आलाय  गं तो ! ... आता झालं ना समाधान ? त्याच्यामुळे तुझं मन अस्थिर असतं . तुला दुसरं काही सुचत नाही अन काही कळत नाही . मला तर तुझी मनोवस्था पाहून तुला चिडवून  द्यावंसं वाटतं .   मजा वाटते गं मला . लहान आहेस तू माझ्यापेक्षा . अगं वेडे,  त्याची वाट तर मीही पहातच  असते . तो येईपर्यंत मलाही काही सुचत नाही . त्याच्या विचारांमध्ये मग मीही वाहवत जाते. वेड्यासारखी ! जसं तुझं नातं त्याच्याशी , तसंच माझंही . तुला झालेली बाधा तर मलाही आहे . अगदी  आधीपासून ! “

 घनदाट झाडांच्या गर्दीमध्ये कृष्ण नीट दिसत नव्हता . पण पानांमधून, त्याने खोचलेलं मोरपीस मात्र हळूहळू जवळ  येताना दिसत होतं .

राधा यमुनेच्या बोलण्याने भय पावली होती . तेव्हा यमुना खळखळून म्हणाली , " अगं राधे , घाबरू नकोस . मी काही तुझ्या प्रेमात वाटेकरी नाही गं . तो जसा तुझा प्रियकर आहे  तसा तो माझाही भगवंत आहे ! "

आता कान्हा , त्या दोघींच्या समीप आला होता .

-------------------------------------------------

BIPIN SANGLE- bip499@hotmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel