अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।

स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः॥४१॥

मग सारासार । राहे ना विचार । कळे ना साचार । योग्यायोग्य ॥३९०॥

कर्तव्याकर्तव्य । ओळखे ना कांहीं । ऐसी दशा होई । पापें येणें ॥३९१॥

मालवोनि दीप । चालतां अंधारीं । उजू मार्ग तरी । लागे ठेंच ॥३९२॥

कुलक्षयीं तैसा । आद्यधर्म सरे । एकलें चि उरे । पाप मात्र ॥३९३॥

मग तेथें मन । राहे ना स्वाधीन । दशेंद्रियगण । स्वैर वागे ॥३९४॥

हीन पुरुषाशीं । घडोनि संगति । तेणें बिघडती । कुलस्त्रिया ॥३९५॥

ऐसे वर्णावर्ण । जातां मिसळोन । लोपती संपूर्ण । ज्ञातिधर्म ॥३९६॥

चव्हाटयावरील । भक्षावया अन्न । कावळे धांवोन । येती जैसे ॥३९७॥

तैसीं महा - पापें । संचरती कुळीं । लोपे जिये वेळीं । कुल - धर्म ॥३९८॥

संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।

पतन्ति पितरो ह्यषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥४२॥

तया कुलघ्नांच्या । सर्वें त्या कुळास । सर्वा घडे वास । नरकींच ॥३९९॥

वंशांतील प्रजा । पावे अधोगति । पूर्वज भ्रष्टती । स्वर्गातील ॥४००॥

लोपतां तीं कर्मे । नित्य नैमित्तिक । अर्पी तिळोदक । कोणा कोण ॥४०१॥

कोठोनि तयांसी । मग स्वर्ग - वास । सवें नरकास । ते हि जाती ॥४०२॥

जरी सर्पे केला । नखाग्रातें दंश । वेगें चढें विष । सर्वागातें ॥४०३॥

तैसे सत्यलोका - । पासोनि सत्वर । सर्व हि पितर । भ्रष्ट होती ॥४०४॥

दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः ।

उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्व शाश्वताः ॥४३॥

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।

नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥४४॥

अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् ‍ ।

यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥४५॥

ऐकें देवा आतां । आणिक हि एक । भीषण पातक । घडे येथें ॥४०५॥

कीं ह्या कुलघ्नांची । घडतां संगति । तेणें लोकरीती । नाश पावे ॥४०६॥

गृहीं एकाएकीं । उफाळला अग्नि । टाकितो जाळोनि । आणिकांसी ॥४०७।
तैसा कुलघ्नांचा । जयां सहवास । तयांचा हि नाश । होय तेणें ॥४०८॥

नाना दोषें व्याप्त । होतां चि तें कुळ । दारुण केवळ । नरक भोगी ॥४०९॥

मग कल्पांती हि । सुटे ना त्यांतून । एवढें पतन । कुल - क्षयीं ॥४१०॥

नाना परी आम्हीं । आलों हें ऐकत । उपजे ना खंत । अजूनि हि ॥४११॥

सांगें देवा आतां । येथें कैसें मन । करावें कठिण । वज्राऐसें ॥४१२॥

जयालागीं राज्य - । सुख अपेक्षावें । तें तरी स्वभावें । नाशिवंत ॥४१३॥

देवा जाणतां हि । ऐसे महादोष । आम्हीं कां निःशेष । त्यजावे ना ॥४१४॥

येथें हे सकळ । आपुले वडील । वधाया केवळ । पाहिले जे ॥४१५॥

हें चि काय थोडें । घडलें पातक । आतां निरर्थक । जगावें कां ॥४१६॥

यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।

धार्तराष्टा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ‍ ॥४६॥

होवोनि निःशस्त्र । सुखें ह्यांचे बाण । करावे सहन । हें चि बरें ॥४१७॥

ऐशा परी मृत्यु । आला तरी चांग । परी नको संग । पापाचा ह्या ॥४१८॥

मग बोले पार्थ । देखोनि स्व - कुळ । राज्य तें केवळ । नरक - भोग ॥४१९॥

संजय उवाच ---

एवमुक्त्वाऽर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् ‍ ।

विसृज्य सशरं चापं शोकसंविग्रमानसः ॥४७॥

इति श्रीमद्धगवद्धीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम

प्रथमोऽध्यायः ॥१॥

ऐकें राया रणीं । बोलिला जें पार्थ । तें चि तुज येथ । सांगितलें ॥४२०॥

मग तो अर्जुन । खिन्न झाला फार । आला गहिंवर । आवरे ना ॥४२१॥

रथांतूनि तेव्हां । उतरोनि खालीं । दुःखें अश्रु गाळी । ढळढळां ॥४२२॥

जैसा राजपुत्र । होतां पदच्युत । कोणी ना ठेवित । मान त्याचा ॥४२३॥

नातरी राहूनें । टाकितां ग्रासून । दिसे प्रभाहीन । भानु जैसा ॥४२४॥

किंवा सिद्धीलागीं । भुलोनि तापसी कामनेच्या फांसी । दीन होय ॥४२५॥

तैसा दुःखभारें । जाहला जर्जर । रणांगणीं वीर । धनंजय ॥४२६॥

मग धनुर्बाण । ठेवोनि परते । बैसोनियां तेथें । अश्रु ढाळी ॥४२७॥

ऐशा परी रणीं । घडलें जें काय । रायासी संजय । तें चि सांगे ॥४२८॥

खिन्न अर्जुनासी । आतां कृष्णनाथ । कैसा परमार्थ । निरुपील ॥४२९॥

ती च कथा पुढें । ऐका अभिनव । म्हणे ज्ञानदेव । निवृत्तीचा ॥४३०॥

इति श्री स्वामी स्वरुपानंदविरचित श्रीमत् ‍ अभंग - ज्ञानेश्वरी प्रथमोऽध्यायः ।

हरये नमः । हरये नमः । हरये नमः । श्रीकृष्णार्पणमस्तु ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel