तुरुंगातील सारी शक्ती तेथे जमा झाली. दिगंबर रायांना त्यांच्या कोठडीत फेकून देण्यात आले. पोलीस व वॉर्डर यांना औषधपाणी मलमपट्टी वगैरे करण्यात आली. त्या इतर पाच कैद्यांना प्रत्येकी तीस तीस फटक्यांची शिक्षा देण्यात आली ! ती ताबडतोब अंमलात आणण्यात आली व त्यांनाही कोठडीत फेकून देण्यात आले. “मर जाव सब !” कोणी म्हणाले.

“पाणी-पाणी !” दिगंबर राय कण्हत म्हणाले. अंगात अपरंपार ताप होता. ते तळमळत होते. कोण पाणी देणार ? तेथे कोण होते ? कोणी नव्हते. “हाय-पाणी- मा गो मा ! मा !” दिगंबर रायांनी शेतकर्‍यांच्या मुलांना दुधे द्यावी, त्यांना पाण्याचा थेंब- अंगाची लाही लाही होत असता मिळू शकला नाही. दिगंबर राय, लौकरच ताप शांत होईल बरे तुमचा ! लौकरच सारे अंग कसे थंडगार होईल ! मग पुन्हा मुळीच ताप येणार नाही ! ! हा शेवटचा ताप, थोडा आणखी सहन करा ! ! “ओ रे दीनबंधू ! पार कर कृपासिंधू” कृपासिंधूने तहानलेल्या वासराची हाक ऐकली. दिगंबर राय त्या अंधारमय कोठडीत शांत झाले- व ज्योतिर्मय परमेश्वरात मिळून गेले ! त्यांच्या पाठोपाठ पाच फटके खाऊन विव्हळणारे ते त्यांचे मित्र-  तेही एकापाठोपाठ लगबग करीत आले. सरकारने यमराजाकडे कारागीर लोकांच्या दिव्य जीवनदुग्धाचा रतीब लावला होता !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel