शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्रात उघडयावर मलविसर्जन-हागणदारीची समस्या आहे. ग्रामीण भागात सुमारे 70-80% कुटुंबांकडे संडासची सोय नाही. काही ठिकाणी कधीकाळी बांधलेले संडास आता नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे अजूनही उघडयावर मलविसर्जन केले जाते. स्त्रियांना लाजेकाजेस्तव पहाटे किंवा रात्री संडासला जावे लागते. लहान मुले तर रस्त्यावर किंवा घराजवळच बसतात.

शहरी भागात झोपडपट्टया किंवा अनधिकृत वस्त्यांमध्ये जागेची समस्या असल्याने संडास नाहीत. अशा ठिकाणी सार्वजनिक संडास बांधलेले आहेत, पण त्यांचा वापर नीट होत नाही. लोकसंख्येच्या मानाने ते पुरत नाहीत.
महाराष्ट्राच्या 'हागणदारी मुक्त' धोरणानुसार अनेक ग्रामपंचायती उघडयावर संडासला बसणा-यांविरुध्द कारवाई करीत आहेत. उघडयावर संडासला बसणा-यांना दंड केला जातो. याचबरोबर संडास बांधकामासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सक्ती केली जात आहे.

हागणदारीने रोगराई -
उघडयावर मलविसर्जनाची प्रथा अडाणीपणाची आहे. आरोग्याच्या दृष्टीने हागणदारीचे अनेक दुष्परिणाम होतात. हागणदारीचा मैला पावसाळयात वाहून जाऊन पाणीसाठे प्रदूषित होतात. उघडयावर मैला पडल्याने मानवी वस्तीचा आणि मळाचा संपर्क निरनिराळया प्रकारे होतो. यामुळे त्यातले जीवजंतू मानवी अन्नसाखळीत फिरत राहतात.
१. हात, पाय, पाणी, भाजीपाला, माशा या सर्वांमधून रोगराई घराघरात पसरते.
२. पटकी, कावीळ, अतिसार, जंत, विषमज्वर, आव या आजारांचा भारतात सर्वत्र कमीजास्त प्रमाणात प्रभाव आहे.
३. या आजारांमुळे बालपणापासून कुपोषणाची समस्या मागे लागते. यामुळे भूक कमी लागणे, पचन कमी होणे, खाल्लेले अंगी न लागणे असे दुष्परिणाम होतात. कुपोषणामुळे शिक्षण आणि उत्पादकता कमी होतात.
४ आजार आणि रोगराईमुळे आर्थिक तोटाही होतो. कुटुंबाचा तोटा आणि देशाचाही तोटा होतो.
५. स्त्रिया, मुले, वृध्द माणसे यांना हागणदारीमुळे हाल सोसावे लागतात.

ही सर्व समस्या आरोग्यसंवादातून कुटुंबा-कुटुंबांना नीट समजावून सांगायला पाहिजे. लोकांनी समजून उमजून स्वच्छता अभियानात सामील व्हायला पाहिजे. अशा सामाजिक सुधारणा कायद्याने करण्यापेक्षा प्रबोधनानेच नीट होतील.

हागणदारीमुक्तीसाठी तंत्रज्ञान-
जंगलात अनेक प्राणी आपापली विष्ठा गाडून टाकतात. पाळीव प्राण्यांपैकी मांजर आपली विष्ठा लगोलग गाडून टाकते. आपला वास दुस-यांना लागू नये हे शिकारी तत्त्व मांजर वर्गातील प्राणी वापरतात.
मानवी विष्ठा आणि माणूस यांचा संबंध येणार नाही अशा प्रकारे विष्ठेची विल्हेवाट लावणे हे मुख्य तत्त्व आहे. यासाठी विष्ठा सरळ जमिनीत पडणे किंवा गाडणे महत्त्वाचे असते.

यात्रा किंवा शिबिरांच्या वेळी चराचे संडास करताना विष्ठा जमिनीत गाडणे हेच तत्त्व वापरले जाते. विष्ठा जमिनीत गाडण्यासाठी दैनंदिन वापराची सोय करायची तर संडास हाच एक पर्याय आहे. यासाठी अनेक तांत्रिक पर्याय आहेत. मात्र त्यातली मूलतत्त्वे आधी समजायला पाहिजे. मूलतत्त्वे समजली की त्यातले तंत्रज्ञान सोयीप्रमाणे बदलून वापरता येईल.

कोणत्याही साध्या संडासमध्ये निदान 3 मूळ घटक असतात.
 (अ) आडोसा,
(ब) मळपात्र किंवा भांडे
(क) खड्डा किंवा टाकी. थोडया प्रगत संडासमध्ये
(ड) S पाईप किंवा कोंबडा आणि
(इ) हवा-पाईप

हे आणखी दोन घटक असतात. या प्रत्येक बाबतीत विविध तांत्रिक पर्याय आहेत. प्रत्येक पर्यायाला काही फायदेतोटे व मर्यादा असतातच. प्रत्येकाचा खर्च वेगवेगळा असतो. भारत सरकारच्या ग्रामीण विकास खात्याने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शास्त्रीय पर्याय मांडले आहेत. याचा इथे आपण थोडक्यात विचार करू या.

ग्रामीण भागासाठी संडासचे पर्यायी प्रकार-
या सर्व विविध घटकांचा विचार करून निवड करण्यासाठी खालीलप्रमाणे मॉडेल्स (प्रकार) दिलेले आहेत.

1. खड्डा-फळी संडास-
- यात 3x3x3 चा चौकोनी किंवा गोलाकार खड्डा करावा. गरज असल्यास बांबूच्या तट्टयाने बाजू पक्की करावी.
- यावर फळया ठेवाव्यात. फळयांची रचना करताना मध्ये 1 फूट x1 फूटाचा भाग मोकळा ठेवावा. बाकीचा भाग पॅक करावा. खिळे ठोकून फळया एकमेकांना पक्क्या जोडाव्यात. म्हणजे बैठक अस्थिर होणार नाही.
- फळयांऐवजी फेरोसिमेंटची 2-3 इंची स्लॅब वापरल्यास बराच त्रास टळतो. या स्लॅबला गोलाकार किंवा मलपात्राप्रमाणे मोकळे भोक ठेवावे.
- योग्य तो आडोसा व दाराप्रमाणे व्यवस्था करावी.
- मलविसर्जनानंतर पाणी किंवा कोरडी पध्दत वापरून स्वच्छता करावी.
- यानंतर थोडी कोरडी माती विष्ठेवर सोडावी. यासाठी बादलीभर माती आतच ठेवून द्यावी.
- खड्डा पाऊण भरल्यावर फळी/स्लॅब आणि आडोसा दुस-या खड्डयावर ठेवावा.
- पहिला खड्डा मातीने भरून टाकावा. सहा महिन्यात सोनखत तयार होते. मग ते सोनखत काढून घ्यावे. हा खड्डा आता परत वापरायला तयार असेल. हा खड्डा-फळी संडास सर्वात स्वस्त आहे. कमी पावसाच्या भागात हा उत्तम चालतो. मात्र याचे काही तोटे आहेत.
- दुर्गंधीचा त्रास थोडाफार होतोच. पावसाळयात तो वाढतो.
- फळया पक्क्या नसल्या किंवा जमीन भुसभुशीत असेल तर घसरण्याचा धोका असतो.
- पावसाळयात यामध्ये पाणी पाझरून जंतू जमिनीत पाझरण्याचा थोडा धोका असतोच. जवळ बोरवेल नसल्यास काही प्रश्न नाही.

2. ड्रम संडास-
गरीब कुटुंबांना परवडेल व ग्रामीण नागरिकांकडून सहज बनविता येईल असा हा ड्रम पध्दतीचा संडास आहे. यामध्ये रस्त्याच्या कामातला डांबराचा रिकामा ड्रम संडासच्या टाकीसाठी वापरला जातो. हा ड्रम जमिनीच्या आत उपडा गाडावा. हे करण्यापूर्वी ड्रमला गोल छिद्रे पाडावीत व विष्ठा वाहून जाण्याकरिता जोडलेला पाईप ड्रमला जोडावीत. बैठकीकरिता बाजूला एक प्लॅटफॉर्म तयार करावा लागतो. यामध्ये भिंतीला लावण्याच्या गुळगुळीत टाईल्सचा उपयोग करून मलपात्र तयार केले जाते. हा संडास अतिशय कमी किंमतीत सहजपणे निर्माण होऊशकतो.

या संडासला लागणा-या साहित्याची यादी -
1. डांबराचा रिकामा ड्रम 1 नग.
2. मलपात्र तयार करण्यासाठी गुळगुळीत टाईल्स 8"x 8" 4 नग.
3. विटा 200 नग
4. सिमेंट अर्धी बॅग
5. रेती 10 घनफूट
6. मजुरी - 1 गवंडी दिवस
3. व्हीआयपी संडास
व्हीआयपी मधील व्ही म्हणजे व्हेंटिलेटेड. म्हणजे सुधारित दुर्गंधमुक्त खड्डा संडास. यात थोडी सुधारणा करून दुर्गंध निघून जाण्यासाठी व्हेंट पाईप लावलेला असतो.
- संडासच्या खड्डयावर बैठक-फळी असते, मात्र ती अर्धी जमिनीवर आणि अर्धी खड्डयावर असते. म्हणजेच खड्डयावर झाकणाचा काही भाग संडासात तर काही बाहेर असतो.
- आडोशाच्या बांधकामाला दरवाज्याच्या वर हवा येण्यासाठी एकच मोठी फट/जाळी असते. दुस-या भिंतीला फट नसते.
- आडोसा बांधकामाच्या मागून व्हेंट पाईप बाहेर काढलेला असतो.
- या विशिष्ट रचनेमुळे हवा-फट-संडासचे भोक (मलपात्र)- खड्डा-व्हेंट पाईप या दिशेने हवा जात रहाते. म्हणजेच खड्डयातला दुर्गंध नेहमीच बाहेरच्या बाहेर जात राहतो. या रचनेमुळे संडासमध्ये दुर्गंध राहत नाही
- या संडाससाठी काही पक्के बांधकाम करणे फायद्याचे ठरते.
- खड्डा देखील बांधून घेतल्यास चांगला. काही ठिकाणी खड्डा बांधून घेण्याऐवजी लोखंडी पिंप (काही भोके पाडून) वापरले जाते.
- या संडासला देखील दोन खड्डे असणे आवश्यक असते. एक भरला की दुसरा वापरता येतो. व्हीआयपी संडासला थोडा जास्त खर्च येतो. आवश्यक वाटल्यास यात कोंबडा किंवा ट्रॅप वापरता येतो.

4. हातफ्लश संडास
जिथे पाण्याची सोय होते तेथे हा संडास उपयुक्त आहे. यात आडोसा, खड्डा, व्हेंट पाईप हे सर्व असणारच. शिवाय यात कोंबडा किंवा ट्रॅप वापरला जातो.
मलपात्र आणि ट्रॅपचे आकारमान छोटेखानी असते. 1-2 लिटर पाणी ओतून साफ होईल असा ट्रॅप बनवलेला असतो.

ट्रॅपमध्ये पाणी शिल्लक असल्याने किडे, दुर्गंध यापासून हा संडास पूर्ण मुक्त असतो. यात अर्थातच कागदाचे बोळे, कपडा, सॅनिटरी पॅड (मासिक पाळीची घडी) हे काहीही टाकता येत नाही.

अनेक शहरांमध्ये सामान्यपणे जे संडास असतात त्यात 5-7 लिटर पाणी फ्लशसाठी लागते. हा पाण्याचा अपव्यय आहे. शहरातली मल: निसारण व्यवस्था जास्त पाण्यावर अवलंबून असते. मात्र पाणी बचत करण्यासाठी अनेक उपाय करणे आवश्यक आहे. लघवी केल्यानंतर 5-6 लिटर पाणी सांडून देणे याचा आपण गंभीरपणे विचार करायला पाहिजे.

या 3 प्रकारच्या संडासांचे अनेक उपप्रकार आहेत. त्यांचा गरजेनुसार वापर करता येईल. अनेक शहरांमध्ये याबद्दल मार्गदर्शन करणा-या संस्था आहेत. त्यांच्याकडे प्रशिक्षण आणि साधने मिळू शकतील.

5. झडपेचा संडास
पाण्याची बचत करण्यासाठी झडपेचा संडास उपयुक्त आहे. यात जलबंद S ट्रॅप (कोंबडा) नसतो. मलपात्रातून सरळ उतरणा-या पाईपमधून मैला खड्डयात पडतो. या पाईपच्या शेवटी झडप असते, ती तात्पुरती उघडते व नंतर मिटते. या झडपेने माशा व दुर्गंध यांचा संडासमध्ये त्रास होत नाही. मलविसर्जनानंतर वेगळे पाणी टाकावे लागत नाही. स्वच्छतेसाठी 1-2 लिटर पाणी वापरतात तेवढे पुरते. या पध्दतीच्या संडासामध्ये पाण्याचा वापर खूपच कमी असल्याने विष्टेचे विघटन कमी काळात पूर्ण होते.

संडासमध्ये पाण्याची बचत करण्यासाठी युक्त्या-
संडासमध्ये कमीत कमी पाणी वापरुन स्वच्छता करण्यासाठी या सूचनांचा विचार करा.
1. मलपात्राचा उतार व गुळगुळीतपणा-
मलपात्राचा उतार व गुळगुळीतपणा जास्त असला की विष्ठा लवकर घसरुन जाते. यासाठी निदान 40 अंश उतार असलेले व लहान भांडे चांगले.
2. जलबंद लहान ठेवणे-
कोंबडा पाईप (जलबंद) 75 से.मी. ऐवजी 20 सेंमी ठेवला तर 5-7 लिटर ऐवजी 2 लिटर पाणी सफाईसाठी पुरते. जलबंद S टाईपचा ठेवण्याऐवजी J (इंग्रजी जे) किंवा P (इंग्रजी पी) आकाराचा चालतो. यात कमी पाणी लागते.
3. जलबंदाऐवजी झडप बसवणे-
मलपात्राच्या नळीच्या शेवटी जलबंदाऐवजी झडप वापरल्यास केवळ 1 लिटर पाणी पुरते. ही झडप स्टेनलेस स्टीलची असते. बिजागिरी गंजू नये म्हणून पितळ व तांब्याची बनवली जाते.
पावलांसाठी उंचवटे नको-
पूर्वी संडास बांधताना पावलांसाठी उंचवटे बनवले जात असत. ही पध्दत स्वच्छतेसाठी आणि मुलांना गैरसोयीची म्हणून बंद केली आहे.
मित्र-मैत्रीणीनी चला एक नवीन सुंदर स्वछ भारत बनवू या ........!!!!!!

- प्रबोधन टीम (संग्रहित लेखं)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel