झाले जीवनकार्य पुरे जर । होऊं मी कां भार धरेवर ॥धृ०॥
तत्त्वें पांचहि विणती जीवन । समय धरी कर, नेई वाहुन ।
ज्ञात जगाच्या मर्यादेतुन ।
सीमा सरतां मृत्युचे घर । होऊं मी कां भार धरेवर ॥१॥
जिथे जन्मलों जिथे वाढलो । भूच्या त्या चिंतनी लागलो ।
तिच्या अंशत: कामी आलो ।
करुं पाहतां मन जन्मांतर । होऊं मी कां भार धरेवर ॥२॥
भट्ट कुमारिल, गौरांग मुनी । अपुले अपुले कार्य उरकुनी ।
सद्वि साधती, पृथ्वी त्यजुनी ।
गुहेत गेले श्रीज्ञानेश्वर । होऊं मी कां भार धरेवर ॥३॥
जगद्गगुरुंचा रव दुमदुमला । बौद्विक पक्षाघात संपला ।
ध्वज हिंदूंचा उन्नत झाला ।
देह फेकती प्रसन्न शंकर । होऊं मी कां भार धरेवर ॥४॥
शक्ति लाभली पंचत्वांतुन । घडवायाला भूमि सचेतन ।
रक्ताश्रुंचे केले सिंचन ।
धन्य धन्य मी । दिसला अंकुर । होऊं मी कां भार धरेवर ॥५॥
उघडे मी ह्रन्नेत्र ठेवले । इष्ट तेवढे ह्रदांत भरले ।
त्याज्य काय लोकांना कथिले ।
गात भैरवी थकलेला स्वर । होऊं मी कां भार धरेवर ॥६॥
जाऊं द्यावें अमुच्या गावा । रामराम जगता सांगावा ।
घेतों अज्ञातांत विसावा ।
येतो ! वसुधे ! मला क्षमा कर । होऊं मी कां भार धरेवर ॥७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel