विश्‍वामित्र राम-लक्ष्मणांसह मिथिलेला आले, तेव्हा जनकराजाचे कुलगुरू शतानंद विश्‍वामित्राची कीर्ती जनकाला सांगू लागले.
सूर्यवंशात त्रिशंकू नावाचा राजा होता. त्याने नैमिबारण्यात यज्ञ सुरू केला व कुलगुरू वसिष्ठपुत्रांची प्रार्थना केली, की तुम्ही असे हवन करा, ज्यायोगे मी सदेह स्वर्गाला जाईन. त्या वेळी वसिष्ठपुत्रांनी राजाला स्वर्गाला सदेह जाणे अशक्‍य असल्याचे सांगितले. तेव्हा त्रिशंकू म्हणाला,"तुम्हाला यज्ञ नीट करता येत नाहीसे दिसते. मी दुसर्‍या आचार्यांकडून करून घेतो." हे ऐकून वसिष्ठपुत्रांना राग आला व त्यांनी यज्ञपूर्ती होणार नाही, असा राजाला शाप दिला. नंतर त्रिशंकू ऋषी विश्‍वामित्रांना शरण गेला व सर्व हकिगत त्यांना सांगितली. विश्‍वामित्रांनी त्याला निर्दोष करून सदेह स्वर्गाला नेण्याचे वचन दिले व त्यासाठी यज्ञाला आरंभ केला. यज्ञाची पूर्णाहुती होताच यज्ञदेव प्रसन्न झाला व त्याने त्रिशंकूला सदेह स्वर्गात नेण्याची योजना केली; पण ऋषीपुत्रांच्या शापामुळे कलंकित झालेल्या त्रिशंकूचे सदेह स्वर्गात येणे योग्य नाही, असे वाटल्यामुळे सर्व देव एकत्र आले व ते त्रिशंकूला खाली डोके वर पाय अशा स्थितीत करून खाली लोटून देऊ लागले.
पुन्हा त्रिशंकूने विश्‍वामित्रांची प्रार्थना केली. विश्‍वामित्रांनी आपल्या मंत्राच्या सामर्थ्याने त्याला आकाशात दक्षिणध्रुवाचे स्थान दिले. नंतर ते प्रतिसृष्टी निर्माण करू लागले; पण यामुळे घाबरून जाऊन देवांनी माघार घेतली व त्रिशंकूला सदेह स्वर्गात घेण्याची तयारी दाखवली. नंतर देवांनी विमान पाठवून त्रिशंकूला स्वर्गात नेले. अशा प्रकारे विश्‍वामित्रांच्या तपःसामर्थ्याची ख्याती आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel