पंढरपूरची कार्तिकी यात्रा जवळ आली होती. व-हाड-खानदेशकडे भोळा भक्तीभाव फार. हजारो यात्रेकरु पंढरीच्या यात्रेला जातात. हजारो वारकरी निघतात.

ते एक लहान स्टेशन होते. ते पाहा शेतकरी. ते वारीला निघाले आहेत. खांद्यावर पताका आहेत. हातात टाळ आहेत. कोणाजवळ वीणा आहे. धुळे-चाळीसगाव रेल्वे लाईनवरचे ते स्टेशन. जामदे त्याचे नाव. गाडीची वेळ होत आली. घंटा वाजली.

“दे रे भाऊ लवकर तिकीट. गाडी येईल, दे.”

“पैसे आहेत का ?”

“आम्ही का फुकट मागू तिकीट ? फुकट नको कुणाचं. आम्ही शेतकरी. आम्ही जगाला पोसू. कोणाचं फुकट नको आम्हाला. दे लवकर तिकीट. चार तिकीटं दे.”

“वीस रुपये मोजा.”

“वीस ?”

“हो, वीस.”

“एका तिकीटाला ५ रुपये ?”

“हो ! हो ! ! हो ! ! !”

“मागं तर कमी होतं !”

“आता वाढले. तुमच्या आजोबांच्या वेळेस आगगीडी तरी होती का ? सारखं बदलतं सारं ! मोजा २० रुपये.”

“घ्या. काय करायचं ? सारीच महागाई ! पोटाला कमी खाऊ पण देवाला बघून घेऊ ! विठ्ठलाच्या पायांवर डोई ठेवून येऊ. द्या तिकीटं. घ्या या चार नोटा पाचा-पाचाच्या.”


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel