यानंतर खराचा ससैन्य नाश झाल्यामुळे फार उद्विग्न झालेली शूर्पणखा स्वत:च रावणाकडे गेली. स्वत:चा झालेला अपमान तिने रावणाला सांगितला व त्याला फटकारले कीं ’जनस्थानातील तुझी सत्ता रामाने उखडून टाकली याचा तुला पत्ता नाही काय?’ तिच्याकडून सर्व हकीगत ऐकून रावण चिंतातुर झाला. शूर्पणखेने राम-लक्ष्मण-सीता यांचे बळ व सौंदर्य याचे वर्णन रावणाला ऐकवले. मी सीतेला तुझ्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत होते म्हणून मला लक्ष्मणाने विरूप केले असे खोटेच सांगितले. ’सीतेला तूं पळवून आण’ असे तिने सुचवले नाही. रावणाने स्वत:च मंत्रिगणांशी बोलणे करून सीतेचे हरण करण्याचा बेत नक्की केला.
रावण रथातून समुद्रकिनार्‍यापर्यंत आला व मग विमानाने भारतात येऊन पुन्हा मारीचाला भेटला. विमानाचा उल्लेख आहे पण वर्णन नाही. विमान म्हणजे काय हे गूढच आहे. रावणाने पुन्हा मारीचाला खर-दूषणांचा ससैन्य नाश झाल्याचे सांगून रामाने दंडकारण्याचे अभयारण्य केले आहे असे म्हटले. रामाला त्याच्या पित्याने क्रोधाने पत्नीसह घराबाहेर काढले आहे असेहि म्हटले व सीतेला पळवून आणण्याचा बेत सांगून मारीचाचे सहाय्य मागितले. ते ऐकून मारीचाचा भयाने थरकाप झाला. त्याला रामाच्या पराक्रमाचे दर्शन घडलेले होते. त्याने रावणाला पुन्हापुन्हा विनवले कीं ’तूं हा बेत मनात आणू नको, रामाने पितृवचनाचा मान राखण्यासाठी वनवास पत्करला आहे. त्याच्याशी वैर धरू नको. तुला ते झेपणार नाही. तूं बिभीषणाचा सल्ला घे. विश्वामित्राच्या सांगण्यावरून राम बालवयातच आमच्या पारिपत्यासाठी आला तेव्हा आमचा सर्वनाश झाला. माझा जीव कसाबसा वांचला. हल्लीच पुन्हा मृगरूपाने दोन मित्रांबरोबर दंडकारण्यात गेलो असतां रामाच्या बाणाने मरतांमरतां वांचलों, माझे मित्र मेले. त्यामुळे मला रामाची फार भीति वाटते. एकतर तूं सरळ रामाशीं युद्ध कर किंवा सर्व विसरून लंकेत सुखाने रहा. खराने रामावर आक्रमण केले व रामाने त्याला युद्धात मारले यांत त्याचा काय दोष? त्याच्याशी वैर धरू नको’. मारीचाने पुन्हापुन्हा हिताचा सल्ला दिला पण रावणाने तो मानला नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel