महात्मा गौतम बुद्ध

या व्यासपीठावरून कला व विज्ञान, तत्त्वज्ञान व साहित्य यांच्या इतिहासात ज्यांची नावे अजरामर आहेत, अशा अनेक पाश्चिमात्य विभूतींविषयींची गौरवपर व्याख्याने आजपर्यंत झाली आहेत. परंतु आज पूर्वेकडील एका महात्म्याविषयी आपण विचार करणार आहोत. मानवजातीच्या विचारावर व जीवनावर गौतम बुद्धांनी केलेल्या परिणामास तुलनी नाही. असा परिणाम करणा-या विभूतींत अग्रगण्य आहेत. थोर धार्मिक परंपरेचे एक संस्थापक या दृष्टीने त्यांचे नाव पवित्र झाले आहे. त्या धार्मिक परंपरेने मानवी मनाची घेतलेली पकड इतर धार्मिक परंपरांपेक्षा किंचितही कमी नाही. इतर धर्म परंपरांप्रमाणेच बुद्धधर्माच्या परंपरेनेही मानवी मनावर खोल परिणाम केलेला आहे. जगाच्या वैचारिक इतिहासात बुद्धांचे उच्च स्थान आहे. सर्व सुधारलेल्या मानवजाताचे ते वारस झालेले आहेत. बौद्धिक प्रामाणिकपणा, नैतिक उत्कटता, खोल अध्यात्मिक दृष्टी, यांच्या कसोट्या लावून पाहू, तर नि:शंकपणे असे कबूल करावे लागेल, की गौतम बुद्ध हे इतिहासातील अत्यंत थोर विभूतींपैकी एक आहेत.

।।एक।।

बुद्धांच्या ऐतिहासिकपणाविषयी जरी क्वचित् कोठे शंका घेतली जात असली, तरी आजकाल त्यांचे ऐतिहासिकत्व न मानणारा असा एकही महान पंडित सहसा आढळत नाही. बुद्धांचा काळ आता निश्चित करता येण्यासारखा आहे. त्यांच्या जीवनाची सर्वसाधारण रुपरेषा काढता येण्यासारखी आहे. धार्मिक तत्त्वज्ञानातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवरील त्यांचे विचार व त्यांची शिकवण ही काहीशा निश्चितपणे शिकता येण्यासारखी आहेत. ज्यांनी गौतम बुद्धांस पाहिले होते, त्यांची वाणी ऐकली होती, अशांच्या स्मृती बुद्धधर्माच्या पहिल्या धार्मिक वाङमयात ब-याच आहेत. तो काळ असा होता, की ज्या वेळेस लेखनाचा फारसा प्रघात नव्हता; आणि म्हणून आजच्यापेक्षा त्या काळांत स्मरणशक्तीच अधिक तीव्र असे. आठवणीच अधिक बिनचूक व चिवट असत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel