आज सर्व जगात हेच अधर्माचे अर्थशास्त्र अमलात आहे, म्हणून तर सर्वत्र विषमता आहे, म्हणून  दु:ख, दैन्य, दारिद्रय यांचा सुकाळ आहे. काही भांडवलवाले सर्व जगावर सत्ता गाजवीत आहेत. भारतीय संस्कृती ही गोष्ट सहन करणार नाही. भारतीय संस्कृती अद्वैतावर उभारलेली, समाजधारणेवर उभारलेली आहे.

''सर्वेऽत्र सुखिन: सन्तु
सर्वे सन्तु निरामया:
सर्वे भद्रणि पश्यन्तु ॥''


ही भारतीय संस्कृतीची ध्येये आहेत, एकाला सुखी करण्यासाठी, एकाला चैनीत लोळावयास मिळावे म्हणून लाखो लोकांनी कसे तरी कीडमुंगीप्रमाणे जगावे, मर मर मरावे, असे भारतीय संस्कृती सांगत नाही.

''अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक ॥''


ही भारतीय संतांची घोषणा आहे. सर्वांना सुखी व समृध्द करण्याचा झेंडा संतांनी खांद्यावर घेतला आहे. मजुरांना पशुंप्रमाणे गुलामांप्रमाणे वागवणारे दांभिक कारखानदार, शेतक-यांना पिळणारे दांभिक सावकार, कुळांना गांजणारे खोत व जमीनदार, आणि या पिळवणूकीला आर्शीवाद देणारे दांभिक संत; मंहत हे भारतीय संस्कृतीचे उपासक नाहीत. सनातन संस्कृती निर्मिली आहे. संकुचित व क्षुद्र वृत्तीच्या अनुदार लोकांना ती समजेल असे मला वाटत नाही. आज भारतीय संस्कृतीच्या नावाखाली मोठमोठ्या गप्पा मारणारे लोक विषमता नि:शंक पाहात आहेत. त्यांना त्याचे दु:ख नाही. श्रमहीन छळणा-या श्रीमंतांना त्यांचे शत आशीर्वाद आहेत. हे श्रीमंत किती जणांना रडवीत आहेत इकडे त्यांचे लक्ष नसते. ''भारतीय संस्कृती, भारतीय संस्कृती'' म्हणून गाजावाजा करणारे हे लोक भारतीय संस्कृतीचा वध करीत आहेत! संतांना व ऋषींना धुळीत मिळवीत आहेत! उपनिषदे व वेदान्त यांना मूठमाती देत आहेत ! भारतीय संस्कृतीचा आत्मा साम्यवादीचा ओळखू शकेल.

''दरिद्रान् भर कौन्तेय ''

असा महाभारतात अर्थशास्त्राचा सिध्दांत सांगितला आहे. जो दरिद्री आहे त्याचे भरण केले पाहिजे. जे खळगे असतील ते भरुन काढले पाहिजेत. परंतु एकीकडे खळगे भरुन काढावयास दुसरीकडच्या टेकड्या खणाव्या लागतील. आज समाजात एकीकडे पैशाचे ढीग आहेत आणि दुसरीकडे कवडीही नाही, हे पैशाचे ढींग सर्वत्र वाटून दिले पाहिजेत.

समाजातील संपत्तीची साधने समाजाच्या मालकीची हवीत. व्यक्तीची त्याची मालकी अपायकारक आहे. विशेषत: प्रचंड उत्पादनाची साधने तरी खाजगी असता कामा नयेत. याशिवाय समाजातील हे खळगे दूर करता येणार नाहीत. समाजात जी संपत्ती निर्माण होईल तिचे नीट विभाजन झाले पाहिजे.

आजपर्यंत जो तो आपल्या विशेष गुणधर्मांची विशेष किंमत करीत असे. परंतु कोणत्याही कर्माची, कोणत्याही कौशल्याची किंमत आपण कशी ठरविणार? मजुराच्या आठ तास अंग मोडून केलेल्या कामाची का दोन आणेच किंमत, आणि डॉक्टराच्या पाच मिनिटे भेटीची का तीन रुपये किंमत? कारकुनाच्या कामाची का महिना पंधरा रुपयेच आणि मामलेदाराच श्रमांची चारशे रुपये? प्राथामिक शाळेतील शिक्षकांच्या अध्यापनाची का वीस रुपये किमत, आणि प्रोफेसरांच्या प्रत्ययही दोन-तीन तास शिकविण्याची का हजार पाचशे किंमत? थंडीवा-यात, रात्री; बेरात्री दिवा दाखविणा-या रेल्वेच्या कामागाराची का दहा रुपये किंमत, आणि गाडीवरुन हिंडणार इंजिनियर त्याच्या श्रमांची का पाचशे रुपये किंमत? रस्ता झाडणा-याला महिना पाच रुपये आणि एका गवयाच्या तासभर गायनाला पाचशे रुपये?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel