भारतीय संस्कृती साधना शिकविते. अधीर होऊ नका. उल्लू होऊ नका, फळासाठी लालचावलेले होऊ नका, घायकुतीस येऊ नका. महान फळे चुटकीसरशी मिळत नाहीत. अनंत साधना व अखंड अविरत श्रम त्यासाठी लागतात. वडाचे प्रचंड झाड दोन दिवसांत वाढत नाही. मेथीची भाजी दोन दिवसांत वाढते, चार दिवसांत सुकते. परंतु वडाचे झाड एकदा उभे राहिले म्हणजे हजारोंना छाया देते. त्याच्या शाखा आकाशाला कवटाळायला जातात. त्याचे शिर गगनाला भिडते, त्याची मुळे पाताळगंगेची भेट घेतात. परंतु असा हा स्पृहणीय व महनीय पसारा, हे महान वैभव प्राप्त व्हावयास दगडधोंड्यांतून मुळे रोवीत रोवीत कित्येक वर्षे त्या वटवृक्षाला धडपडावे लागते.

विनता व कद्रू यांची गोष्ट सुप्रसिद्ध आहे. कद्रूला एक हजार सर्पबाळे होताच विनता अधीर झाली. तिने एक अंडे फोडले. परंतु ते परिपक्व नव्हते ; त्यातून लुळापांगळा अरूण बाहेर पडला. विनता कष्टी झाली. तिच्या उतावीळपणाचे बक्षीस तिला मिळाले. परंतु ती अनुभवाने शहाणी झाली. दुसरे अंडे तिने फोडले नाही. एक हजार वर्षे ती थांबली आणि मग एक हजार वर्षानंतर त्या अंड्यातून पक्षिराज गरूड बाहेर पडला. भगवान विष्णूचे तो वाहन झाला !

तुमच्या कर्मातून दुबळी फळे मिळवयास नको असतील व अशी भव्यदिव्य फळे पाहिजे असतील तर शेकडो वर्षे श्रमावे लागेल, साधना करावी लागेल. भारतीय संस्कृतीचे उपासक आज साधना विसरले आहेत. त्यांना चुटकीसरशी फळे हवी असतात. पटकन स्वातंत्र्य हवे आहे. क्रांती क्षणात होत नसते. राष्ट्रीय शिक्षणाचे महान आचार्य विजापूरकर एकदा म्हणाले, “इंग्रजांना राज्य घ्यावयास दीडशे वर्षे लागली. त्यांना घालवावयास तीनशे लागतील, अशा आशेने सारखे धडपडले पाहिजे.”

कर्मफलत्यागी मनुष्य कधी निराश होत नाही. कारण फलाकडे त्याचे डोळेच नाहीत. जो सारखे फलाचे चिंतन करील, तो कष्टी होईल. निराश होईल. भगवान बुद्ध एकेक गुण अंगी येण्यासाठी एकेक जन्म घेत होते. जीवनाची परिपूर्णता गाठावयास त्यांना शेकडो जन्म घ्यावे लागले.

एकदा दोन साधक तपश्चर्या करीत होते. देव भेटावा अशी त्यांना इच्छा होती. देवदूत प्रथम एकाकडे आला व म्हणाला, “काय रे, देव कधी भेटावा असे तुला वाटते ?” तो म्हणाला, “या क्षणी ; मी अगदी अधीर झालो आहे.” देवदूत म्हणाला, “तुला हजारो वर्षे झाली तरी तो भेटणार नाही !” देवदूत दुस-याकडे गेला. त्यालाही तोच प्रश्न त्याने विचारला. त्या साधक म्हणाला, “किती वर्षानी भेटू शकेल ?” देवदूत म्हणाला, “दशसहस्त्र वर्षांनी.” साधक सद्गदित होऊन म्हणाला, “काय ; इतक्या लौकर. देव मला भेटेल ? देवाची प्राप्ती व्हावयास कोट्यवधी वर्षे लागतात. मला खरेच का इतक्या लौकर तो मिळेल ?” इतक्यात परमेश्वर तेथे आला व म्हणाला, “मी आत्ताच तुला भेटतो. तुझ्या हृदयमंदिरात येऊन राहतो.”

देवाची प्राप्त व्हावयास कितीही साधना केली तरी ती थोडीच आहे. ध्येयप्राप्तीसाठी अशी ही अमर आशा हवी. प्रयत्नांचा, कष्टांचा, उद्योगांचा कंटाळा येता कामा नये. उत्तरोत्तर अधिकच उत्कट कर्म होऊ लागले पाहिजे. जो हजारो वर्षे श्रमावयास तयार आहे, त्याला त्या घटकेला फळ मिळेल.

परंतु स्वतःच्या मनाचे समाधान हे फळ तर सारखे मिळतच असते. मी माझी पराकाष्ठा करीत आहे, कष्टांची शर्थ करीत आहे, हे माझे आन्तरिक समाधान कोण हिरावून नेणार ? आपणांस हा देह, ही बुद्धी, हे हृदय यांची जोड मिळाली आहे. देवाने हे भांडवल आधीच दिले आहे. हे जे मिळाले आहे, त्याचे उतराई होण्यासाठी म्हणून सेवा केली पाहिजे. समाज आपणांस अपरंपार देत आहे. सृष्टी देत आहे. त्यांचे अनृणी होण्यासाठी म्हणून सदैव झिजणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

आणि फळ आपणांस न मिळाले तरी समाज अमर आहे. व्यक्ती जातात, परंतु समाज चिरंतन आहे ; कार्य करणार जातात, परंतु कार्य उरतेच. ते कार्य पुरे करावयास समाज आहेच. माझे पडलेले काम दुसरा कोणी उचलील. मी लाविलेल्या झाडाला दुसरा कोणी पाणी घालील. माझ्या श्रमाचे फळ कोणाला तरी मिळलेच ; आणि ज्या कोणाला मिळेल, तो माझाच आहे. त्याच्यात व माझ्यात भेद आहे कुठे ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel