भारतीय संस्कृती प्रत्येक पाऊल बुद्धिपूर्वक टाकावयास सांगत आहे. “दृष्टीपूतं न्यसेत्पादम् वस्त्रपूतं पिबेज्जलम्!” –विचार करून वागा, पाहून पाऊल टाका, गाळून पाणी प्या. भारतीय संस्कृती सांगते की विचार सर्वत्र घेऊन जा. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे प्रत्येक क्रिया डोळसपणे करणे. सकाळी सात वाजता स्नान करून संध्या करणे, एवढाच धर्म या शब्दाचा अर्थ नव्हे. धर्म म्हणजे चोवीस तास होणारी कर्मे. जन्मभर होणारी कर्मे. धर्म का देवघरापुरता असतो? धर्म सर्वत्र आहे. हवा ज्याप्रमाणे आपण जेथे जेथे जाऊ तेथे तेथे पाहिजे, त्याप्रमाणे धर्म सर्वत्र हवा. तुम्ही विधिमंडळात जा, स्वयंपाकघरात जा, कारखान्यात जा, कोठेही जा, जे जे कर्म कराल ते ते धर्ममय पाहिजे.

धर्ममय पाहिजे म्हणजे वेदमय पाहिजे, विचारमय पाहिजे. याचाच अर्थ प्रत्येक कर्म बुद्धिपूर्वक करा. परंतु बुद्धी शुद्ध व्हावयास हृदयाची जरूर असते. हृदय व बुद्धी यांच्या एकतानतेतून जो महाविचार निर्माण निर्माण होईल तो धर्म होय! अशी एकतानता ज्याची होते; त्यालाच आपण धर्मस्थापक म्हणतो. समर्थांनी एकच धर्मस्थापक सांगितला नाही.

“धर्मस्थापनेचे नर। झाले आहेत, पुढें होणार”

त्या त्या काळातील परिस्थितीचा खोल विचार करून, त्या त्या काळातील बहुजनसमाजाच्या सुखदु:खांचा एकरूपतेने विचार करून, महापुरुष त्या त्या काळातील युगधर्म देत असतो. त्या त्या काळाला नवीन दृष्टी देतो, नवीन विचार देतो. अशा रीतीने धर्म वाढत जातो.

भारतीय धर्म हा वर्धिष्णू धर्म आहे. नवीन नवीन तो घेईल व पुढे जाईल. नवीन नवीन क्षेत्रांत घुसेल. सारे ज्ञान आपलेसे करून समाजाचे धारण करू पाहील. विचाराशिवाय समाजाची धारण कसे होणार? ज्ञान ही शक्ती आहे. खरा सनातन धर्म ते ज्ञान घेतल्याशिवाय कसा राहील? मारुती ज्याप्रमाणे लाल दिसणा-या सूर्याला धरावयाला उडाला, त्याप्रमाणे भारतीय संस्कृती क्षितिजावर दिसणा-या भव्य, दिव्य, नव्य विचारांना कवटाळू पाहील. भारतीय संस्कृती ही स्थाणूंची स्थाणुसंस्कृती नाही. ती गतिशील आहे, पुढे जाणारी आहे. ती कधी थांबणार नाही. सत्याची नवनवीन दर्शने घ्यावयास भारतीय आत्मा तडफडेल. सत्याचा संशोधक “आता बस झाले” असे कधी म्हणणार नाही. अनंत क्षेत्र त्याच्या डोळ्यासमोर उघडे असते. आज महात्मा गांधीच पाहा. जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही, की ज्या क्षेत्रात ते बुद्धीचा दीप घेऊन शिरले नाहीत! राजकारणाच्या क्षेत्रात नवीन प्रयोग त्यांनी चालविलेच आहेत. उद्योगधंद्यांची गोष्ट घ्या, त्यातही ते शिरतीलच. राष्ट्रीय शिक्षण असो, राष्ट्रभाषा असो, समाजसुधारणा असो, धार्मिक प्रश्न असो, आरोग्य असो, खाण्यापिण्याचे प्रयोग असोत, ब्रह्मचर्यादी मानसिक प्रश्न असोत, प्रत्येक क्षेत्रात ते शिरतील. ते बुद्धीचे उपासक आहेत. शुद्ध हृदयाची शुद्ध बुद्धीला जोड देऊन ते प्रयोग करीत असतात. ख-या सनातनी वेदधर्माचे ते खरे अनुयायी आहेत.

बुद्धिवादी मनुष्य निर्भय असतो. तो कोणाचे तुणतुणे वाजवीत बसणार नाही. तो आपल्या विशंकतेने पुढे पाऊल टाकील. जुने लोक कलियुग, कलियुग म्हणतात. नवीन लोक यंत्रयुग, यंत्रयुग म्हणतात. गांधी म्हणतील, “मी माझे युग निर्माण करीन. मी चरख्याचे युग आणीन. ग्रामोद्योगाचे युग आणीन.” बुद्धिमान मनुष्य री ओढीत बसणार नाही. तो स्वत:च्या विचारांचे युग आपल्याभोवती निर्माण करू पाहतो.

जगात स्वतंत्र बुद्धि फार थोडी असते. सनातनी लोक दहा हजार वर्षांपूर्वीच्या ऋषींचे गुलाम होतात, तर नवीन लोक पाश्चिमात्य पंडितांचे गुलाम होतात! परंतु भारतीय संस्कृती स्वतंत्र दिवा लावावयास सांगत आहे. तुमच्या देशाच्या स्थितीचा विचार करा, परंपरेचा विचार करा. आजूबाजूच्या देशांचाही विचार करा. आणि स्वत:च्या समाजाला काय हितकर ते बघा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel