स्वातंत्र्याचे वारकरी, सामाजिक, आर्थिक अन्यायाविरुध्द अंगार ओकणारे, राजकारणाच्या धकाधकीतही संतांच्या भक्तिरसात डुंबणारे साने गुरुजी, सौन्दर्यपूजक होते. सृष्टीतील वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे । असे मानणारे होते. त्यांच्या निसर्ग वेडाची ही हृदयगम गीता.

जगात आगडोंब केव्हा भडकेल नेम नाही. अमेरिकेजवळ किती अणुबाँब आहेत, त्याची मोजदाद होत आहे. अमेरिकेत अणुबाँब तयार करण्यासाठी शहर बसले आहे तेथे मध्ये स्फोट होईल वाटले, परंतु आता सावधगिरी आहे असा स्फोट झाला असता तर सारी अमेरिका भस्म झाली असती. अटलांटिक पॅसिफिक महासागर एक झाले असते. अणुबाँम जेथे पडतो त्याच्या आसपास जमीन जणू  वितळते. जळजळीत रसमय होते. इतकी ती आग असते लाट आकाशाला भिडू पाहतात. जेथे अणुबाँम तयार करतात तेथे एक अर्धा फर्लाग लांबीचा लोहचुंबक असतो, कित्येक टन त्याचे वजन असते. त्याच्याभोवती विद्युत तारांची भेंडोळी असतात. तेथे काम करणार्‍यांची काय स्थिती असेल. तेथले कामगार ज्या घरात राहतात, त्यांच्या भिंती आर्धा फूट जाड शिशाच्या पत्र्याच्या असतात. कामगारांच्या अंगावरचे कपडे समुद्राच्या तळाशी बुडवतात. आजचे सारे विज्ञान तेथे मरणाची आयुधे तयार करीत आहे. जर्मनीहि हा शोध लावीत होता. नॉर्वे वगैरे देशांतील धबधब्याच्या पाण्यांतील विद्युत्मय हैड्रोजन परमाणु त्यांना हवा होता. त्या अणुतून ते बाँब तयार करणार होते. जर्मनीत थोरियम, युरेनियम वगैरेच्या खाणी नाहीत. ज्या अणुगर्भाच्या आधारावर हा बाँब तयार करावयाचा, तो अणुगर्भ अत्यंत चंचल हवा. थोरियम वगैरेचा अणु तसा असतो. एकमेकांनी एकमेकास धक्के द्यावेत त्याप्रमाणे हा चंचल अणुगर्भ फोडला की तो दुसर्‍यात, दुसरा तिसर्‍यास अशाप्रकारे ते कोटयवधी अणु प्रचंड स्फोट करतात. अनंत शक्ती जन्मते, जी त्रिभुवन भस्म करील. महायुध्द आलेच तर पुराणांतील दोन ब्रह्मास्त्रे पृथ्वी जाळू लागली असे वर्णन आहे तसे व्हायचे. सारी प्रचंड शहरे जातील. संस्कृतीचा पुन्हा श्रीगणेशा सुरू होईल. संस्कृतीची अशी का सदैव चाकोरी सुरू राह्यची?

आपण या मोठया प्रश्नात कशाला शिरायचे, असे म्हणले तरी हे प्रश्न समोर येतात. आपले हिंदुस्थानात सरकार जुनी क्रुझर, जुन्या पाणबुडया खरेदी करीत असते. जगातील तिसर्‍या महायुध्दात आमच्या या बाहुलीच्या खेळातील विनाशिका हास्यापद ठरतील. जाऊ दे या मारण मरणाच्या गोष्टी.

मी फुलांत रमणारा. पावसाळी फुलांचा हंगाम संपत आला. आता कमळाचे दिवस, झेंडूचे दिवस. कोरांटक्या आता फुलू लागतील. आमच्या गावातील तळयातून निरनिराळी कमळे आहेत. लाल कमळे आहेत. शुभ्र कमळे आहेत आणि निळसर पाकळया असणारी ती लहान कमळे आहेत. सकाळच्या वेळी ही कमळे सूर्याला प्रणाम करीत असतात. पाण्यातून माना वर काढून बघत असतात. कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel