आदित्यनारायण, मी जेव्हा चांदीच्या ताटातून अमृतासारखे अन्न खातो, तेव्हा माझी प्रजा मला आठवते. मी सोन्याच्या पलंगावर परांच्या गाद्यांवर झोपतो, तेव्हा माझी प्रजा माझ्या डोळ्यांसमोर असते. मी जेव्हा माझ्या विशाल ग्रंथशाळेत हिंडतो, तेव्हा माझी प्रजा माझ्या डोळ्यांसमोर असते. मी मनोरम राजवाड्यातून वावरतो, तेव्हा माझी प्रजा माझ्या डोळ्यांसमोर असते. 
प्रजेला अन्न, वस्त्र, घरदार, ज्ञान सारे असेल का, हा विचार रात्रंदिवस माझ्या डोळ्यांसमोर असतो. मी सुखात असता माझी प्रजा दुःखात असेल, तर देवाघरी मी गुन्हेगार ठरेन. एखादे वेळेस वाटते की सोडावे राज्य, व्हावे संन्यासी व निघून जावे; परंतु अंगावरची जबाबदारी अशी सोडून जाणे, तेही पाप. म्हणून मी शक्य ती काळजी घेऊन हे प्रजापालनकर्तव्य पार पाडायचे असे ठरवले आहे. आपल्या बागेत जशी सुंदर सुगंधी फुले फुललेली असतात, तशी माझ्या प्रजेची जीवने फुलावीत, त्यांच्या जीवनात रस व गंध उत्पन्न व्हावा असे वाटते. आपण माणसे शेवटी अपूर्ण आहोत, परंतु जितके निर्दोष होता येईल तितके होण्यासाठी प्रयत्न करावयाचे.’

इतक्यात एका बगळ्याने झडप घालून एक मासा पकडला. यशोधराचे लक्ष तिकडे गेले.

“पाहिलात ना तो प्रकार?” तो म्हणाला.

“होय महाराज, आदित्यानारायण म्हणाले.”

“माझे अधिकारी असे नसोत. दिसायला गोरोगोमटे; वरुन गोड गोड बोलणारे; परंतु मनात घाणेरडे. खरे नाणे पाहिजे. अस्सल हवे. नक्कल नको. खरे ना?”

“होय महाराज!”

सोमेश्वराच्या मंदिरात घंटा वाजत होत्या. सायंकाळ जवळ आली. नाव माघारी वळली. यशोधर उतरला. शेकडो लोकांचे जयजयकार ऐकत व प्रणाम घेत तो राजवाड्यात गेला. ‘असा राजा असावा’ असे म्हणत लोक घरी गेले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to करुणादेवी