जे हाती घेतले होते ते मी पुरे करू शकलो नाही हे एका अर्थी बरेच झाले.  कारण पुरे झाले असते तर प्रकाशकाकडे ताबडतोब पाठवण्याचा मोह झाला असता.  त्या माझ्या लिखाणाकडे आता मी पाहिले की त्याची फारशी किंमत नव्हती हे मला दिसून येते.  त्यातील कितीतरी भाग निरस व शिळा, कंटाळवाणा वाटतो.  ज्या घटनांचे घडामोडींचे तेथे मी वर्णन केले आहे त्यांचे महत्व आज लुप्तप्राय झाले आहे.  अर्धवट विस्मृत अशा भूतकाळात त्यांना जवळजवळ मूठमाती मिळाली आहे.  नंतरच्या ज्वालामुखीच्या स्फोटांनी त्यांच्यावर लाव्हा पसरला आहे; धूळ, राख जमली आहे.  त्यांचे नावही उरले नाही.  त्या प्रश्नांची मलाही आता गोडी नाही.  ज्या व्यक्तिगत अनुभवांचे माझ्यावर अमर ठसे उमटलेले आहेत ते अनुभव तेवढे डोळ्यांसमोर उभे आहेत; काही व्यक्तींशी आलेले संबंध, काही विशिष्ट घटनांशी आलेले संबंध, जनसंमर्दाशी हिंदी जनतेशी आलेला संबंध, किती विविधता या हिंदी जनतेत, परंतु या विविधतेतही दिसून येणारी ती आश्चर्यकारक एकता- मनाची काही साहसे, दु:खशोकांच्या लाटा, आणि त्यांतून पुन्हा डोके वर काढल्यामुळे वाटणारा आनंद, सोडलेला सुटकेचा नि:श्वास, कामाची वेळ आली की भरलेल्या उत्साहाची धुंदी हे सारे मला आठवते.  यातील बर्‍याचशा गोष्टींबद्दल मनुष्य लिहिणारही नाही.  आपल्या काही भावना, काही विचार आपल्या जीवनाशी इतकी एकरूप झालेली असतात, आपले आंतरिक जीवन हे आपले स्वत:चे इतके खाजगी झालेले असते की, दुसर्‍याला त्याची आपण कल्पना देणार नाही, देऊ शकणारही नाही. असे असले तरी ते प्रत्यक्ष व्यक्तिगत किंवा अप्रत्यक्ष दुरूनचे असे जे संबंध, त्यांच्यात फार अर्थ असतो.  व्यक्तीवर त्यांचा मोठा परिणाम होत असतो.  जीवनाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टीत, स्वत:च्या राष्ट्राकडे पाहण्याच्या, इतर देशांकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टीत त्यामुळे फरक घडून येत असतात.  त्याच्या स्वत:च्या जीवनाला विशिष्ट आकार, वळण त्यामुळे मिळते.

इतर तुरुंगातल्याप्रमाणे या नगरच्या किल्ल्यातही मी बगिचाच्या कामात रंगलो.  कितीतरी तास मी या कामात घालवीत असे.  प्रखर ऊन पडलेले, सूर्य बराच वर आलेला, तरी माझे खणणे, फुलांसाठी वाफे करण्याचे काम चालू असे.  जमीन वाईट होती, मधून दगड लागे, पूर्वीच्या बांधकामांच्या वेळचे अवशेष-चुना, दगड, विटा लागत.  प्राचीन स्मारकांचे पडके अवशेषही तेथे होते.  कारण ही ऐतिहासिक जागा आहे.  गतकाळात येथे कितीतरी लढाया झाल्या, राजवाड्यातील खलबते झाली.  हा इतिहास काही हिंदुस्थानातसुध्दा फारसा जुना नाही, किंवा व्यपक दृष्टीने पाहिले तर त्या इतिहासाला फारसे महत्त्वही नाही.  परंतु तेथील एक प्रसंग डोळ्यांसमोर स्पष्ट उभा राहतो, तो कोण विसरेल ? त्या शूर सुंदर चांदबिबीच्या धैर्याचा विसर कसा पडणार ?  किल्ला लढवताना फौजेच्या आघाडीवर खुद्द हाती तलवार घेऊन तिने अकबराच्या बादशाही सैन्याशी मुकाबला केला आणि अखेर स्वत:च्याच एका माणसाकडून पुढे तिचा खून झाला.

अशा या अपेशी जागेत खणताना एकदा प्राचीन भिंतीचे अवशेष सापडले; खाली खोल गाडलेल्या इमारतींच्या घुमटांची शिखरे सापडली.  आम्ही फार खोल खणत गेलो नाही.  कारण हे आमचे पुराणवस्तुसंशोधन, हे खोल खणणे अधिकार्‍यांना पसंत नव्हते.  आणि ते संशोधन करण्याची साधनेही आमच्याजवळ नव्हती.  एकदा तर एका भिंतीवर दगडात खोदलेले सुंदर कमल आढळले.  कदाचित एखाद्या दारावरचे ते असेल.

मला डेहराडूनच्या तुरुंगातील एक आठवण आली.  तेथेही असाच शोध लागला होता.  परंतु तो काही इतका शुभ नव्हता.  तीन वर्षांपूर्वी त्या तुरुंगातील माझ्या अंगणात मी खणित असताना गतकाळातील एक चमत्कारिक अवशेष मला आढळला.  जमीनीच्या खाली खोलात दोन जुनाट खांब सापडले.  ते पाहून मनाला हुरहुर लागली की काय बरे होते हे ?  तीस चाळीस वर्षांपूर्वी फाशी देण्याची ती जागा होती.  पुढे या तुरुंगात फाशी देणे बंद करण्यात आले आणि फाशी देण्याच्या जागेवरील सर्व दृश्य खाणाखुणा नष्ट करण्यात आल्या होत्या.  परंतु त्या जागेच्या पायाचा आम्ही शोध लावला.  ते सारे दगड आम्ही उपटून फेकून दिले.  मला नि माझ्याबरोबरच्या कैद्यांना— ज्यांनी या उत्खननात भाग घेतला होता, त्या सर्वांना एक प्रकारचा आनंद होत होता.  त्या दुर्दैवी वस्तूंच्या खाणाखुणा आपण पार नष्ट केल्या असे वाटून एक प्रकारचे समाधान होत होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Star

new comment

Star

hello

Star

+8 cooment

Star

This has too many comments.

Star

Loving this book.

Star

Finally.

Star

+2 bhai

Star

+1 bhai

Star

Great book.

आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel