ते मित्र गेले. मुलाखत संपून भाईजी आपल्या खोलींत आले. ते विचार करीत येरझारा करीत होते. काँग्रेसचा महान् लढा येणार असें त्यांना नक्की वाटलें आपण मागितलेलें सरकारनें दिलें नाहीं, तर कधींहि स्वस्थ बसूं नये, अशी शिकवण आजपर्यंत महात्माजींनीं दिली आहे. इतर संस्था आणि काँग्रेस यांच्यांतील हाच महत्त्वाचा फरक आहे. काँग्रेस केवळ ठराव करणार नाहीं. पोकळ मागणी करणार नाहीं. क्रिप्सजवळ किती मिळतें घेण्याचा प्रयत्न करण्यांत आला. ते कांहीं नाहीं. राष्ट्रानें उभे राहिलेंच पाहिजे. कोणावर विसंबून राहण्यांत अर्थ नाहीं. हा स्टॅलिनच सांगे कीं, क्रान्ति बाहेरून आयात करतां येत नसते. आम्हींच सारी शक्ति एका विवक्षित क्षणीं ओतून क्रान्ति करण्यासाठीं उठलें पाहिजे. उद्यां म्हणे युध्दानंतर स्वातंत्र्य आपोआप येईल ! वेडे ! अशीं स्वातंत्र्ये येत नसतात. उद्यांच्या शांतता परिषदेंत आमच्या स्वातंत्र्यासाठीं कोण भांडणार आहे ? कोणी नाहीं. अमेरिका गप्प बसेल. रशिया तसाच. कोणी कोणासाठीं नाहीं. आम्ही कोणावरहि अवलंबून राहण्यांत अर्थ नाहीं. ज्यानें त्यानें स्वत:च्या पायांवरच उभें राहिलें पाहिजे. माझी काँग्रेस आंधळी नाहीं. संकुचित राष्ट्रीयतेला ती उराशीं धरून बसणारी नाहीं. या जगांत खरी आंतरराष्ट्रीय दृष्टि असलेली जर कोणती संस्था असेल, तर ती माझी काँग्रेसच आहे. जपाननें चीनशीं युध्द सुरू केलें, तेव्हां सर्वांआधीं चीनविषयीं सहानुभूति कोणीं    दाखविली ? इंग्रजी व्यापा-यांचीं शिष्टमंडळें जपानशीं चुंबाचुंबी तेव्हां करीत होतीं. अमेरिका युध्दोपयोगी सामान जपानला खुशाल विकत होती. त्या अमेरिकन विमानांत बसून जपान चिनी गांवें भस्मसात् करीत होता. अशा वेळीं काँग्रेसनें जखमी चिनी सैनिकांची शुश्रूषा करायला पथकें पाठविलीं. स्पेनमधील त्या यादवीच्या वेळीं शेतकरी-कामगार पक्षाला काँग्रेसनें धान्य पाठविलें. जगांतील फॅसिझमचा पदोपदीं कोणीं धिक्कार केला असेल, तर तो काँग्रेसनेंच. आजहि आम्हांला स्वातंत्र मिळालें, तर या फॅसिझमविरोधी महायुध्दांत आम्ही भाग घेऊं असें काँग्रेसनें जाहीर केलें. परंतु ४० कोटी लोकांच्या प्रतिनिधींना न विचारतां येथील व्हाइसरॉय सा-या राष्ट्राला एकदम युध्दाच्या खाईंत लोटतो. एकाच्या हातीं सारी सत्ता. हा फॅसिझमच नव्हे का ? हें युध्द फॅसिझमविरोधी असेल, तर आधीं हिंदुस्थानला राष्ट्रीय सरकार द्या. हें युध्द फॅसिझमविरोधी आहे असें तेव्हां पटेल. वास्तविक स्वातंत्र्य मिळाल्यावरहि आम्ही एकदम युध्दांत सामील झालेंच पाहिजे असें नाहीं. स्वातंत्र्य ही कांहीं सौद्याची गोष्ट नाहीं. तो सर्व राष्ट्राचा जन्मसिध्द हक्क आहे. जर्मनी, जपान आमच्या देशावर चालून आले, तर आम्ही पाहूं असें काँग्रेस म्हणूं शकेल. अमेरिका का एकदम युध्दांत सामील झाली ? रशिया का एकदम युध्दांत आला ? ईजिप्त, तुर्कस्तान, आयर्लंड हे देश तर तटस्थच राहिले. हिंदुस्थाननें स्वातंत्र्य मिळाल्यावरहि एकदम कां म्हणून या महायुध्दांत भाग घ्यावा ? महात्माजींसारखी महान् विभूति शांततेसाठीं जर्मनी, जपान यांच्याजवळ बोलणीं करायलाहि जाईल. स्वतंत्र हिंदुस्थानच्या थोर वकिलाच्या शब्दाला का कांहीं किंमत नसेल ? परंतु काँग्रेस वकिली डावपेंच करीत बसली नाहीं. आमचें स्वातंत्र्य द्या, आम्ही युध्दांत भाग घेतों, असें तिनें स्पष्ट सांगितलें. सकुंचित राष्ट्रीयता तिच्याजवळ नाहीं, याचा हा पुरावा नाहीं का ?

माझ्या काँग्रेसची दृष्टि म्हणजे जणूं योग्याची दृष्टि आहे. योगी ज्याप्रमाणें अर्धोन्मीलित दृष्टि ठेवतो, तशी काँग्रेसची दृष्टि. योगी केवळ आंत स्वत:कडेच पाहात नाहीं, किंवा केवळ बाहेर जगाकडेच पाहात बसत नाहीं. तो दोहोंचें भान राखील. स्वत:कडे पाहील व जगाकडेहि पाहील. तशी माझी काँग्रेस आहे. काँग्रेस स्वत:च्या देशांतील स्थिति काय आहे तेंहि पाहते नि आंतरराष्ट्रीय प्रश्न काय आहेत, तेंहि पाहते. स्वत:च्या देशांतील सत्ता आपल्या हातीं असल्याशिवाय आंतरराष्ट्रीय दृष्टया आपण पै किंमतीचे आहोत, ही गोष्ट काँग्रेस ओळखते.

फिरतां फिरतां भाईजी थांबले. त्यांनीं सद्गदित होऊन काँग्रेसला प्रणाम केला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel