“उद्यां तुम्ही जाणार का ?” बाळनें विचारलें.

“राहूं का ?”

“नको. जा. भेटीचं पत्र टाकलं आहे. कल्याण वाट पाहील. कां आली नाहीं संध्या असं म्हणेल. आमचं आजारीपण रोजचंच आहे. तें थांबणार आहे थोडंच !”

दुस-या दिवशीं संध्या एकटीच जायला निघाली. तिच्याबरोबर स्टेशनवर हरिणी जाणार होती. विश्वास पडून होता. त्याचें तोंड कोमेजून गेलें होतें. संध्या आपल्याच विचारांत गर्क होती. परंतु ती एकदम भानावर आली.

“विश्वास, जातें हां. तुमच्या मित्राला भेटून येतें. प्रकृतीला जपा.”

“कल्याणला सांगा कीं प्रकृतीची काळजी घे. माझ्या तापाचं त्याला सांगूं नका.”

टांग्यांत बसून हरिणी व संध्या स्टेशनवर आलीं. बायकांच्या डब्यांत सामान दोघी मैत्रिणी एका बाकावर बसल्या.

“संध्याताई, तुमचा किती प्रेमळ स्वभाव.”

“आणि हरणे, तूं किती चपल, उत्साही.”

“आपण पुढं एकत्र राहूं.”

“विश्वासला ताप येतो. मला वाईट वाटतं. वाटतं त्याच्याजवळ राहावं. त्याच्या डोक्यावर हात ठेवून बसावं. परंतु हल्लीं येतें तेंसुध्दां दादाला आवडत नाहीं. मामा म्हणतात कीं, हरिणीचं लग्न करून दिलं पाहिजे. आई थोडंफार माझं मन ओळखते. परंतु तिलाहि हा भिकारी विश्वास पसंत नाहीं. पूर्वी कॉलेजमध्यें असतांना विश्वास तिला पसंत होता. तेव्हां वडील म्हणायचे, हा जोडा छान दिसतो, नाहीं ? परंतु आतां वडीलहि नाहींत. मामा सारा कारभार पाहतात. दादा जरा द्वेषी व मत्सरी. काय करावं ? कसं अभ्यासांत मन रमेल ? माझा विश्वास किती ध्येयवादी ! त्याच्यासाठीं काय करूं असं होतं. संध्याताई, या तरुणांना पैशाचा पाठिंबा नाहीं. नाहीं तर सारा महाराष्ट्र यांनीं चेतवला असता. काय करतील बिचारे ! मनांत जळतात व असे आजारी पडतात. उपासमार, निराशा, कष्ट यांनीं हो विश्वासची अशी दशा झाली. कसा दिसे पूर्वीं ? त्याच्या चेह-यावर दृष्टि ठरत नसे. लाखांत उमटून पडे माझा विश्वास. परंतु आज किती मलूल दिसतो ! संध्याताई, आपण समदु:खी आहोंत. तुमचे वडील नाहींत, माझेहि नाहींत. तुमची आईहि तुमच्या लग्नाच्या प्रथम थोडी विरूध्दच. तशीच माझीहि आई. माझा विश्वास आजारी; तर तिकडे तुमचा कल्याण आजारी. कल्याणला माझा प्रणाम सांगा हो तुम्हांला पाहून तो आनंदेल. तुमच्यावर फार आहे हो त्याचं प्रेम. तुमचीं पत्रं अंधारांत हृदयाशीं धरून कल्याण बसायचा.”

अशीं बोलणीं चाललीं होतीं. तों घंटा घणघणली. दोघी मैत्रिणी डब्याजवळ गेल्या. संध्या डब्यांत बसली. हरिणी खालीं होती. शिटी झाली. गाडी सुटली. दोघी मैत्रिणींनीं हातरुमालाच्या खुणा केल्या. शेवटीं संध्या आंत बाकावर बसली व इकडे हरिणी घरीं गेली.

संध्या आतां कल्याणमय राज्यांत रंगली. मध्येंच एखादें स्टेशन येई व तिची समाधि भंगे. परंतु पुन: समाधि लागे. कल्याणजवळ काय काय बोलायचें तें ती ठरवीत होती. मध्येंच तिचें तिला हंसूं येई. असें करतां करतां मुक्कामाला तर ती आली. परंतु उतरणार कोठें ? ती टांगा करून जेलच्या दरवाजाजवळ आली. टांगा निघून गेला. तिनें आंत अर्ज दिला. सायंकाळीं चार वाजतां या असें सांगण्यांत आलें. संध्या तेथेंच एका झाडाखालीं बसली. कल्याणचा पत्रसंग्रह ती वाचीत बसली. तोच तिचा आवडता ग्रंथ होता. ती तिची गीता, तीं उपनिषदें. सारें कांहीं त्या पत्रांत होतें. संध्या जेवली नाहीं. कल्याणला फळें देईन. मग मी जेवीन, असें जणूं तिनें ठरविलें होतें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel