कल्याण आगगाडींत बसून निघाला. तो प्रथम आपल्या घरीं जाणार होता. अनेक विचार त्याच्या मनांत येत होते. काय करावें, काय नाहीं तें तो ठरवीत होता. संध्येकडे तो जाणार होता. तिच्याकडे गेल्यावर काय बोलायचें ? तेथें जेवायला राहायचें का ? कीं उभ्या उभ्या निघून यायचें ? संध्या जेवल्याशिवाय येऊं देणार नाहीं. ती रागवेल. ती काय विचारील, काय काय बोलेल ? ती उंच झाली आहे. पूर्वीपेक्षां निराळी दिसेल. आणि मी कृश झालों आहें. संध्याहि अशक्त झाली असेल का ? तीहि माझ्या आठवणी येऊन पोटभर जेवली नसेल. कदाचित् माझें जेलमधील ते पत्र वाचून तिची निराशा झाली असेल. परंतु आतां पैसे मागितल्यामुळें हंसली असेल, आनंदली असेल. मागें तिने फुलांची माळ दिली. आतां काय देईल ? त्या वेळीं मी विजयी बालवीर होतों. आज कोठली तलवार मारून जात आहे ? तुरुंगांत चक्की पिसून जात आहें. देहावर, स्वार्थावर विजय मिळवून जात आहें. मी घरीं खात पीत नाहीं बसलों. तुरुंगांत गेलों. हाहि विजयच नाहीं का ? कमावलेलें शरीर सेवेंत झिजवून आलों. कोणतें बक्षिस संध्या देईल ? तिची आई काय म्हणले ? माझें तिच्याकडे जाणें तिच्या आईला आवडेल का ? बाकी संध्येच्या आईला आतां सारें माहीत असेल. संध्येनें तिला सांगितलें असेल. तिची आई मला काय म्हणेल ? लग्न करण्याची गळ घालील का ? जर मला विचारण्यांत आलें, तर मी काय उत्तर देऊं ? संध्येची काय इच्छा असेल ? ती मनांत काय योजित असेल ? मीं नकार दिला तर तिला वाईट वाटेल का ? ती अशीच राहील का ? तिनें सारें जीवन का मला दिलें आहे ? परंतु मीं माझें जीवन क्रान्तीला दिलें आहे. मी संध्येला काय देऊं ? परंतु मी तिला विसरूं शकेन का ? माझें मन मला तरी कळतें का ? मी मला तरी ओळखतों का ? समुद्राच्या तळाशीं काय काय असते, याची समुद्राला जाणीव, कीं समुद्रांत डोकावणा-याला जाणीव ? संध्येलाच माझे स्वरूप अधिक यथार्थपणें कळेल. ती माझ्या मानससरोवरांत डोकावील. मी नाहीं मला जाणूं शकणार.

परंतु आम्हीं लग्न केलें तर राहायचें कुठें, पोट कसें भरायचे ? मुंबईला कामगारांत मी राहूं इच्छितों. साधी एक तरी खोली हवी. आम्ही दोघें राहणार. पंचवीस तीस रुपये तरी हवेत. कशाची एजन्सी घेतां येईल का ? मिलमध्येंच काम केलें तर ? जमेल का सारें मला ?

किती तरी विचार कल्याणच्या मनांत येत होते. शेवटीं त्याचें स्टेशन आलें. तो उतरला. आपल्या गांवाला निघाला. जसजसें त्याचें घर जवळ येत होतें, तसतसें त्याचे हृदय खालींवर होत होतें. घरीं काय असेल परिस्थिति ? गांवांतील लोक कल्याणकडे पाहात होते. बाळपणचे त्याचे मित्र धांवत आले. चारपांच वर्षांत भेट नव्हती.

“कल्याण तुरुंगांतून आलास ?”

“बरा आहेस ना ?”

“आतां इथंच राहा हो.”

“कल्याण, तुझ्या घरीं भानगडी आहेत रे ! “

“रंगा रडत बसतो.”

“तुझी आईहि रडते.”

“आतां नको रे त्याला सांगूं. आधीं त्याला घरीं जाऊं दे. मग आपण बोलूं. भीमेच्या तीरावर बसूं.”

घर जवळ आलें. मित्र गेले. कल्याण घरांत शिरला. रंगा दारांतच होता.

“आई, दादा आला, दादा आला !” रंगानें आनंदानें घरांत धूम ठोकली.

आई बाहेर आली. कल्याण आईच्या पायां पडला. तिनें त्याला जवळ घेतलें. तिच्या डोळयांतून पाणी आलें. कल्याण सद्गदित झाला. आईनें त्याच्याकडे व त्याने तिच्याकडे पाहिलें. अश्रुच अनंत बोलले. वडील वरती होते. आणखीहि कोणी वर होतें. कल्याण जायला निघाला.

“वर नको जाऊं, दादा !” रंगा म्हणाला.

“जाऊं दे; बाबांच्या पायां पडून येऊं दे.”

कल्याण वर गेला. मुलगा तुरुंगांतून आल्याचें कळलें तरी पिता खालीं गेला नाहीं. तो वर हंसत होता, बोलत होता. कल्याण एकदम वर जाऊन उभा राहिला; तो पित्याच्या पायां पडला. पितां कांही बोलला नाहीं. पित्याच्या कपाळाला आंठया पडल्या. आणि पित्याजवळ एक आशुकमाशुक होतें. तें मिस्किलपणे हंसलें. कल्याणनें रागानें पाहिलें. तो नागाप्रमाणें फणफणत खालीं गेला. आईजवळ जाऊन बसला.

“किती रे वाळलास, बाळ ! “

“आणि आई, तुझी काय दशा ?”

“आम्हां बायकांचं असंच हो. पण तूं कशाला तुरुंगांत गेलास ? चांगलं शिकायचं सोडून कशाला रे गेलास ?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel