“मी येऊं ना गुणा?”

“नको आतां. पुन्हां तुला पोचवायला मला यावे लागेल.”

“मग ये. तेवढ्याने पाय दुखतील वाटतं तुझे?”

“बरे चल.”

इंदु व गुणा दोघं निघून गेली. गुणाची आई वाटच पहात होती.

“किती रे उशीर गुणा?” आई म्हणाली.

“सारखें वाजवीत बसला हा. शेवटी मी उठवले तेव्हा आला.”

“चला आतां जेवायला. इंदु, तुझे झाले का जेवण?”

“जेवण झाले परंतु पोट भरले नाही.”

“मग जेव येथे. घे पान.”

“गुणाच्या आई, तुम्ही सारी बसा. मी वाढतें. उरेल ते मग मी जेवीन.”

“मग पुष्कळ आहे हो. बस गुणाबरोबरच.”

“नाही. तुम्ही आधी बसा. आज मी तुम्हांला वाढीन. मला इच्छा झाली आहे.”

“वाढूं दे ग आई. वाढतां येते की नाही ते तरी कळेल.” आणि खरेच रामराव, गुणा, गुणाची आई जेवायला बसली. आणि इंदु वाढूं लागली.

गुणा रेंगाळत जेवत होता.

“काय रे जेवत नाहींस तो?” आईने विचारले.

“भूक नाही आज.”

“इंदूला उरावे म्हणून काळजी की काय?”

“तसें नाही ग आई.”

ती बसली नाहीं म्हणून त्याला वाईट वाटत असेल. इंदु, तू आतां बस. आम्हांला काही नको.” रामराव म्हणाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel