कधीं कधीं स्मिताचें परिवर्तन मनमोकळ्या हास्यांतहि होई. या बाबतींत ग्रीक लेखक अ‍ॅरिस्टोफेन्स याच्याशीं त्याचें साम्य आहे. आपण असेंहि म्हणूं शकूं कीं, लिओनार्डो हा रेखा व रंग यांचा अ‍ॅरिस्टोफेन्स होता. ग्रीक अ‍ॅरिस्टोफेन्स शब्दसृष्टींतील तर हा रंगसृष्टींतील. त्या ग्रीक नाटककाराप्रमाणें मानवी जीवनाच्या हास्यरसात्मक नाटकांतील जे अधिक हास्यास्पद प्रकार दिसत त्यांवर दृष्टि टाकणें त्याला बरें वाटे. जीवनांतील नाना प्रकारचे हास्यास्पद चेहरे त्यानें आपल्या नोटबुकात काढले आहेत. त्याचीं नोटबुकें अशा चेहर्‍यांनीं भरलेलीं आहेत. कधीं कधीं तो शेतकर्‍यांना आपल्या घरी बोलावी व गोष्टी सांगून त्यांची हंसवून हंसवून मुरकुंडी वळवी. हंसतांना त्याचे चेहरे निरनिराळ्या प्रकारचे होत ते पाहून तो लगेच कागदाच्या तुकड्यांवर ते टिपून घेई व नंतर आपल्या अमर स्केचबुकांत त्या चेहर्‍याना तो अमरत्व देई.

अपूर्व अशा परिस्थितींत मानवी भावना कशा दिसतात हें पाहण्याचें लिओनार्डोला जणूं वेडच होतें ! ज्यांचा शिरच्छेद व्हावयाचा आहे अशा गुन्हेगारांचे चेहरे काढण्यासाठीं तो तासन् तास बसे व त्यांच्या मरणान्तिक भावना रेखाटी; पण त्या मरणोन्मुखांचीं करुण मुखें रंगवितांना त्याला आसुरी आनंद मात्र होत नसे. तो त्या वेळीं केवळ शास्त्रीय दृष्टीनें तें भावनांचें आविष्करण पाहत असे. तो जणूं मानसशास्त्राचा अभ्यास करी व त्यावर रेखारूप निबंध लिही. तो कालावान् होता. जीवनाची व मरणाची प्रत्येक स्थिति, प्रत्येक दशा अभ्यासावयाची जिज्ञासा त्याला असे. कलावान् या नात्यानें तो अभ्यास करी; पण मनुष्य या नात्यानें त्यानें जीवनालाच गौरविलें आहे व मरणाला धिक्कारलें आहे. त्याचा चरित्रलेखक व्हासरि लिहितो, ''जेथें पांखरें विकलीं जात त्या जागीं तो जाई, आपल्या हातांनीं पिंजर्‍यांतील पक्षी घेई, त्यांची मागण्यांत येई तितकी किंमत देई व नंतर त्यांना सोडून देऊन त्यांचें स्वातंत्र्य त्यांना परत देई !''

त्याला प्राणिमात्राबद्दल अनुकंपा वाटे, प्रत्येक जीवन पवित्र वाटे. तो शाकाहारी झाला. आपण जर प्राणी निर्मूं शकत नाहीं तर त्यांना ठार मारण्याचा आपणांस काय अधिकार ? तो लिहितो, ''कोणत्याहि प्राण्याचा जीवन घेणें ही अत्यंत अमानुष गोष्ट आहे. रागानें अथवा मत्सरानें आपण कोणाचा प्राण घ्यावा अशी आत्म्याची खरोखरच इच्छा नसते. ज्याला प्राणांची किंमत वाटत नाहीं, ज्याला दुसर्‍याच्या जिवाची पर्वा नाहीं, तो जिवंत राहण्यास अपात्र नव्हे काय ?''

लिओनार्डो स्वानुभवानें बोलत होता. आपण कशाच्या जोरावर हें असें बोलूं शकतों हें तो जाणत होता. जीवनांतील दुर्दैव, करुणा, विरोध व क्रूरता या गोष्टी त्यानें स्वत: पाहिल्या होत्या. लुडोव्हिको स्फोर्झाच्या दरबारांत व नंतर सीझर बोर्जिआ याच्या राजवाड्यांत त्याला दिसलें कीं, अत्यंत क्षुद्र स्वार्थासाठीं व क्षुद्र कारणांसाठीं माणसें माणसांची कत्तल करीत असतात. तो मानवांतील सौंदर्याचा उपासक होता व म्हणून तो कलावान् झाला. पण मानवांतील दुष्टता व जंगलीपणा पाहून तो तत्त्वज्ञानी झाला.

- ५ -

लिओनार्डोचे तत्त्वज्ञान सर्वसंग्राहक आहे. तत्त्वज्ञानाच्या प्रत्येक संप्रदायांत जें जें चांगलें दिसलें तें तें सारें त्यानें घेतलें. सर्व ठिकाणचे उत्कृष्ट विचार घेऊन त्यानें स्वत:चें तत्त्वज्ञान उभारलें. जीवनमरणांसंबंधींचे लिओनार्डोचें विचार सुसंबध्द नाहींत. त्याच्या स्फुट व विस्कळित विचारांना 'दर्शन' किंवा 'मीमांसा' म्हणतां येणार नाहीं. त्यानें टीपा, टिप्पणी लिहिल्या. त्याच्या पांच हजार पृष्ठांत सर्व कांही संक्षेपानें आलें आहे. तो डाव्या हातानें लिही, म्हणून त्याचें बरेंचसें लिखाण लागत नाहीं. तसेंच तो आपलें इटॅलियन अक्षर हिब्रू व अरेबिक यांप्रमाणें उजवीकडून डावीकडे लिही. लिओनार्डोच्या तत्त्वज्ञानात्मक सूत्रांची नीट व व्यवस्थित मांडणी अद्यापि कोणीं केलेली नाहीं. पण त्याच्या इतस्तत: विखुरलेल्या विचारांतून स्टोइकांची धैर्यशीलता व ख्रिस्ताची मधुर सौम्यता यांचें मिश्रण आपणांस आढळून येतें. लिओनार्डो चर्चचा सभासद नव्हता; पण तो येशूचा अनुयायी होता. त्यानें काढलेल्या ख्रिस्ताच्या चित्रांतील ख्रिस्ताचे मुखमंडल रंगवितांना ख्रिस्ताचा आत्मा आपण ओळखला आहे असेंच जणूं तो दाखवीत आहे. पण त्यानें ख्रिस्ताचें मुख तेवढेंच नीट रंगविलें असें नाहीं, तर ख्रिस्ताचे विचारहि सहानुभूतिपूर्वक समजून घेतले होते. तो ख्रिस्ताप्रमाणें, स्टोइक बंधूंप्रमाणें, स्वत:चीं दु:खें समाधानानें व सहजतेनें सहन करी; तो त्यांचा बाऊ करीत नसे. दुसर्‍यांच्या दु:खांविषयीं तो सहानुभूति दाखवी. शत्रूंचा द्वेष व मित्रांचा मत्सर यांमुळें त्याला बराच त्रास होई. मायकेल एंजेलो हा त्यांचाच समकालीन महान् चित्रकार; पण लिओनार्डोच्या कलेकडे तो सहानुभूतीनें बघत नसे व त्याचा सार्वजनिकरीत्या अपमान करण्याची एकहि संधि गमावीत नसे. लिओनार्डो मात्र हे सर्व अपमान सोशी, धीरोदात्ततेनें सहन करी. तो आपल्या हस्तलिखितांत एके ठिकाणीं लिहितो, ''कपड्यांमुळें थंडीपासून बचाव होतो, तसा सहनशीलतेमुळें दुसर्‍यांनीं दिलेल्या त्रासापासून बचाव होतो. थंडी वाढेल तसतसे अधिकाधिक कपडे अंगावर घातल्यास थंडी कांहीं करूं शकणार नाहीं; तद्वतच लोक तुमच्या बाबतींत अधिकाधिक अन्याय करूं लागले तर अधिकांधिक सहिष्णु व सहनशील बना. म्हणजे त्या अन्यायांनीं व निंदा-अपमानांनीं तुमचें मन त्रस्त होणार नाहीं व त्यांची शक्ति नष्ट होईल.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel