एका सरदाराचा घोडा जरतारी जीन पाठीवर घेऊन लगाम चावीत फुरफुरत वाटेने जात असता ओझ्याने खचून गेलेले एक गाढव त्याला दिसले. त्याला धमकी देऊन तो म्हणाला, 'अरे, सरक, सरक ! नाहीतर मी तुला आता पायाखाली तुडवून टाकेन.' गाढव बापडे दुर्बळ. तेव्हा ते घाईघाईने बाजूला सरकले. पुढे काही दिवसांनी त्या घोड्याला लढाईत गोळी लागली व सरदाराने त्याला एका भाडेकर्‍याला विकले. मग तो ओझी वाहू लागला. एकदा पाठीवर मोठे गाठोडे घेऊन तो रस्त्याने जात असता त्या गाढवाने पाहिले व त्याला हाक मारून ते म्हणाले, 'काय राव, रामराम ! त्या दिवशी मला पायाखाली तुडविणारे तुम्हीच नाही का ? मी तेव्हाच भविष्य केलं होतं की एखाद्या दिवशी तरी आपला गर्व उतरेल.'

तात्पर्य

- जो गर्वाने मोठेपणा मिळवू पाहतो, त्याच्याजवळ सामर्थ्य असेपर्यंत लोक त्याला नमून असतात. पण तो निर्बल झाला म्हणजे त्याचा उपहासच केला जातो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel