एका माणसाचे एक मूल अंगणात खेळत असता त्याला साप चावला व त्याच्या विषाने ते मूल लगेच मरण पावले. तेव्हा त्या माणसाला फार राग आला व तो कुर्‍हाड घेऊन त्या सापामागे लागला. साप बिळात जात असता त्याने त्याच्यावर कुर्‍हाडीचा घाव घातला, त्यामुळे सापाचे थोडेसे शेपूट मात्र तुटले. तेव्हा काहीतरी लोभ दाखवून सापाला बाहेर काढावे आणि त्याच्यावर पुरता सूड उगवावा या हेतूने, दुधाची वाटी बिळाच्या तोंडाजवळ ठेवून तो माणूस त्याला हाका मारून म्हणाला, 'मित्रा, झालं ते झालं. आता तू बाहेर ये आणि हे दूध घे. यानंतर आपण एकमेकांचे मित्र होऊ.' यावर साप आतूनच म्हणाला, 'बाबा रे, मित्रत्वाची खटपट आता विनाकारण करू नकोस, कारण तिचा काही उपयोग नाही. जोपर्यंत तुझ्या मेलेल्या मुलाची आठवण तुला आणि माझ्या तुटलेल्या शेपटाची आठवण मला राहील, तोपर्यंत तुझी माझी मैत्री बिलकुल शक्य नाही.'

तात्पर्य

- ज्यांनी एकमेकांवर पूर्वी कधीतरी अपकार केले आहेत, त्या लोकांची मैत्री होणे शक्य नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel