हस्तिनापूरच्या राजवाड्याच्या गच्चीवर दुर्योधन फेऱ्या मारत होता. काही अंतरावर यमुना नदीचे पाणी खळखळ वाहत होते. थोड्या वेळाने शकुनी, दु:शासन आले आणि कर्ण देखील सोबत आला.

"काय रे दुर्योधना, तू कोणत्या विचारात आहेस?" आसनावर बसून शकुनीने विचारले.” शकुनीचे शब्द दुर्योधनाच्या कानाला टोचले.

"तो एखाद्या काही गंभीर चिंतेत आहे असे दिसते." शकुनी पुटपुटला ।

"दादा, दादा बघ!" दु:शासन दुर्योधनाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.

"मामाश्री आणि कर्ण आले आहेत."

"या मामाश्री।"

"काय? कोणत्या विचारात पडला आहेस? समोर एकटक काय बघतोयस?

"माझी जीवनकथा."

"म्हणजे? तुझी जीवनकथा त्या पाण्यावर लिहिली आहे का?

“हो, त्या पाण्यावर लिहिली आहे; समोरच्या झाडांवर लिहिली आहे; वर शाश्वत आकाशात लिहिली आहे; आणि सर्वात जास्त बहुतेक माझ्या अंत: करणात स्पष्टपणे लिहिलेली आहे." दुर्योधन शांतपणे म्हणाला.

"महाराज निराश झाले आहेत म्हणून तर असे बोलत आहेत?" कर्ण बोलला।

"हो, आता मी इतका निराश झालो आहे की या निराशेतून आशेचा किरण दिसण्याची किंचितशी आशाही उरली नाही." दुर्योधन म्हणाला.

“दुर्योधना, तू तर समस्त मानव समाजाकडे पाठ फिरवली आहेस. अरे भाच्या, निराशेतूनच तर आशा जन्माला येते. जेव्हा माणूस खूप उदास होतो, तेव्हा आत्मा देखील हे शरीर सोडून देऊन स्वतःचा मार्ग शोधतो." शकुनी म्हणाला.

"मग कदाचित माझे पण असेच होईल. आता माझ्या आयुष्याचे काहीच प्रयोजन नाही." दुर्योधन हताश होऊन म्हणाला.

"महाराज, तुम्ही हे काय बोलताय? उद्या सकाळी तुम्ही चक्रवर्ती राजा होणार आहात आणि तुम्हाला उद्या सर्वत्र आनंदी आनंद दिसेल." कर्ण म्हणाला.

"कर्णा, वाईट वाटू नकोस. परंतु घोड्याचा चाबूक धरून धरून अचानक  एके दिवशी जो अंगदेशाचा राजा होतो तो माझ्या दु:खाची कल्पनाही करू शकत नाही.” दुर्योधनाचे डोळे रागाने लाल झाले होते.

"पण दुर्योधना, आता आपण प्रयत्न करणं कुठे थांबवलंय?" शकुनी म्हणाला.

"त्याच गोष्टीचा तर मला त्रास होतो. आम्ही खूप प्रयत्न केले, पण एकातही यश मिळालं नाही. बघा ना? हे यमुना नदीचं पाणी माझ्याकडे बघून मला हसतंय. भीमाला विष पाजल्यानंतर आम्ही त्याला गंगेत बुडवून टाकलं होतं पण तो  पाताळातून आणखी बलवान होऊन बाहेर आला! असा आमचा प्रयत्न आहे!” दुर्योधन बोलला.

"पण कधीतरी आपला डाव उलट पडू शकतो न?"

"कधीतरी? कधीतरी नाही, आपले सर्वच प्रयत्न फसले मामा! तुमच्या सांगण्यावरून मी लाखेचा महाल बांधला  आणि तेथे पांडवांना जाळून मारण्यासाठी पुरोचनास तिकडे पाठवले. तरीही पांडव दगावले नाहीत, उलट त्यांनी द्रौपदीला मिळवले आणि अधिक सामर्थ्यवान होऊन परतले." दुर्योधन बोलला.

"आता ह्या भूतकाळाच्या गोष्टी आठवून काय उपयोग?"

"मामा, तुमच्या मनातून ते सर्व विस्मरणात गेले असेल. पण या सगळ्या गोष्टी माझ्या मनात इतक्या ताज्या आहेत की अगदी आजच त्या माझ्यासमोरच घडल्या आहेत. आणि माझ्या अंतर्मनाला एखाद्या उंदराप्रमाणे कुरतडत आहेत. समोर अंधारातील नदीवरचे ढग मला सांगत आहेत की दुर्योधन, तू कितीही प्रयत्न केलेस तरी शेवटी तुझा पराभव निश्चित आहे.”

"म्हणजे तुझा विश्वास आहे की प्रयत्न करणे व्यर्थ आहे? अरे, प्रयत्न निष्फळ ठरले असते तर पांडव आज या महालात आनंद उपभोगत असते आणि दुर्योधन आणि भानुमती वल्कले परिधान करून द्वैत वनात भटकत असते. जे निव्वळ नशिबाबद्दल बोलतात, त्यांचे मन निश्चितच आजारी आहे, हे तू निश्चितपणे समजून घेतले पाहिजे.” शकुनी शब्दांवर जोर देऊन म्हणाला.

“काहीही असो, मी माझ्या आयुष्यात एक पक्के अनुभवले आहे की आपण पांडवांना चिरडण्याचा जेव्हा जेव्हा  प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्यांना देवाने मदत केली. राजसूय यज्ञात मामा, तुम्ही अजिबात नव्हते. जेव्हा शिशुपालाने श्रीकृष्णाच्या पूजेला विरोध केला तेव्हा काही काळ माझ्या मनात असा विचार नक्कीच आला की आता या वेळी या यज्ञात बाधा येईल आणि तो अयशस्वी होईल. पण तितक्यात शिशुपालाचे डोके धडापासून वेगळे झाले आणि यज्ञ यशस्वी झाला नाही." दुर्योधन म्हणाला.

"ती गोष्ट घडून गेली! पण बघ ना, आज ती सगळी माणसं अरण्यात भटकत आहेत! आता कसली काळजी करतोयस?" शकुनीने विचारले.

"मामा, काळजी हे लोक जिवंत असेपर्यंत राहिलच. पांडवांना शाप देण्यासाठी आम्ही हजारो शिष्यांसह दुर्वास ऋषी यांना अरण्यात त्यांच्या मागावर पाठवले पण का ते कळत नाही दुर्वास आणि त्यांचे शिष्य परत फिरले." दुर्योधन म्हणाला.

"विचार असा होता की दुर्वास अवेळी पांडवांच्या कुटीत जातील आणि जर त्यांना भोजन मिळाले नाही तर ते त्यांना शाप देऊन भस्म करतील." दु:शासन म्हणाला.

“होय अगदी असेच होते. का कुणास ठाऊक पण जेव्हा जेव्हा आपण विचार करतो कि आता काम होणार असे वाटते  तेव्हा तेव्हा आपल्या युक्त्यांमधूनही पांडवांना कुठून तरी बाहेर पडण्याचा मार्ग सापडतोच सापडतो आणि आपली सगळी मेहनत व्यर्थ जाते." दुर्योधन म्हणाला.

"हो न तेच आहे. बघा ना, द्रौपदीला पळवून नेण्यासाठी आम्ही जयद्रथाला पाठवले होते....” दु:शासन बोलू लागला.

"आणि तो स्वतःच पकडला गेला." आणि कर्णाने वाक्य पूर्ण केले.

"आणि मामा, आम्ही सर्व गंधर्वांशी लढत होतो तेव्हा पांडवांनी जाऊन त्यांना सोडवले होते." दु:शासन म्हणाला ।

"मामा, या सगळ्या गोष्टी एक एक करून माझ्या आठवणींच्या स्मृतीपटलावर उभ्या राहिल्या की, माझ्या अंगावर काटा येतो, मला घाम फुटतो आणि रक्त उकळल्यासारखे वाटू लागते."

"असं होणं साहजिक आहे. पण धीर सोडायची गरज नाही." शकुनी म्हणाला.

"मामा, तू आधी कुरुराज धृतराष्ट्राचा मुलगा बनून बघ काही काळासाठी, मग तुला माझ्या मनाची अवस्था काय ते समजेल आणि मग मला काय उपदेश द्यायचा हे देखील तुला कळेल." दुर्योधनाला चीड आली.

"जे घडले त्याबद्दल शोक व्यक्त करत त्याच त्या गोष्टीला कोळशासारखे उगाळत राहणे, हे कमकुवत मनाचा माणूस असल्याचे लक्षण आहे. जे घडले ते घडून गेले आहे. आता उद्या काय करायचे याचा विचार सुज्ञ माणसांनी करायचा असतो."

"उद्या आज मुळेच घडतो. भूतकाळ विसरून उद्याचा विचार करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाचे लक्षण आहे. मामा, तुला जे काही दिसत असेल ते असेल, पण मला लख्ख आणि स्पष्टपणे दिसत आहे की आपल्या सर्व युक्त्या आणि डाव व्यर्थ ठरले आहेत." दुर्योधन स्पष्टपणे म्हणाला.

"छान मग गच्चीवर हातावर हात डाळून नदीचा प्रवाह बघत बसा आणि भूतकाळाचा विचार करा. अगदी लगेचच साम्राज्याचा मुकुट आकाशातून खाली येईल आणि दुर्योधनाच्या पुढ्यात येऊन पडेल." डोकं खाजवत शकुनी म्हणाला.

"हे करून साम्राज्य मिळालं." दुःशासन अस्वस्थपणे म्हणाला.

"साम्राज्य तलवारीच्या जोरावर मिळवता येईल!" कर्ण बोलला.

"तुम्ही सगळे लबाड आहात. कर्णा, वाईट वाटू नकोस. पण विराटच्या रणभूमीवर गाईंच्या कळपातून सिंहासारखा एकटा अर्जुन उसळी मारून वर आला तेव्हा तुझ्या तलवारीची धार कुठे गेली होती? तुम्ही सगळे फक्त हो ला हो म्हणणारे आहात.” दुर्योधन रागावून म्हणाला.

"महाराज, तुमच्या हो ला हो म्हणायचा प्रश्न नाहीये."

"मग काय प्रश्न आहे? पांडवांना वनात पाठवल्यावर तेरा वर्षात आपले बस्तान नीट बसेल असे आपल्याला वाटायचे. पण ही तेरा वर्षे हा हा म्हणता निघून गेली आहेत आणि उद्या मी पाचही पांडव आणि द्रौपदी यांना हस्तिनापूरच्या दारातून आत प्रवेश करताना पाहतोय." दुर्योधन बोलला.

"हस्तिनापूरचे दरवाजे केवळ लाकडापासून बनलेले नाहीत." कर्ण बोलला.

"लाकडाचेच काय साधे गवताचेही नाहीये. त्या विराटच्या रणांगणात एका सहा वर्षाच्या मुलाने आमचे कपडे उतरवले. त्या दिवशी आमच्या तलवारी लाकडाच्या होत्या की गवताच्या?" दुर्योधन बोलला.

"आता काही करायचं की नाही? जर हीच तुझी इच्छा असेल तर आम्ही सर्वजण आपापल्या घरी जातो तू तुला   आवडेल तसे करू दुशासन, चला उठूया!" शकुनी जरा तापला.

"तुम्ही कुठे जाणार आहात?"

"का? आता आमचं इथे काही काम नाही म्हणून जातो."

"आता आपण चौघे एकत्र जाऊ. आजपर्यंत मी तुमचा सल्ला ऐकला आहे, आणि आज जेव्हा मला मार्ग दिसत नाही, तेव्हा मी तुम्हाला बरा जाऊ देईन? आता मी स्वत: पडेन आणि तुम्हालाही पाडेन ." दुर्योधन बोलला.

"मजा तेव्हाच येईल. तू हिम्मत हारलास तर मला ते आवडत नाही. हे राज्य मिळवण्याच्या प्रयत्नात तर खरी मजा आहे." शकुनी म्हणाला.

"मामा, मी खरे सांगतो. पांडवांना वश करण्याचे माझे आजपर्यंतचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले आहेत. आज जेव्हा मी या सर्व गोष्टींकडे पाहतो तेव्हा असे वाटते की जगात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पण आणखी करण्याची गरज होती हे नक्की. केवळ इतकेच प्रयत्न केले असते तरी पांडवांचा कधीतरी नाश झाला असता.पण मामा! तुमच्या या मोजणीत नेहमी फक्त एक अंक कमी पडतो आणि सगळा हिशोब चुकतो.” दुर्योधन बोलला.

"मग आता काय करायचं, याचा विचार कर ना?" कर्ण बोलला.

" विचार काय करायचा? मामांचा जो विचार आहे तोक सगळ्यांचा विचार आहे.” दुःशासन बोलला।

"मामा, तुला सर्व माहीत आहे. विराट सभेत पांडवांचे दर्शन झालेच आहे. त्यांनी द्रुपद वगैरेंना विराटच्या सभेत जमवले आहे. आता ते राज्याची मागणीही मांडतील, यात शंका नाही." दुर्योधन म्हणाला.

"ठीक आहे. मग आपण काय करावे?

"दुर्योधनाने पांडवांच्या हाती राज्य सोपवावे आणि तुम्ही सर्व आपापल्या राण्यांना घेऊन द्वैत वनात जा. मीही तुमच्याबरोबर जाईन आणि तुम्हाला तेथे घेऊन गेल्यावर मी थेट गांधार देशात जाईन.." शकुनी टोमणे मारीत म्हणाला

"मी पांडवांना राज्य का देऊ?" दुर्योधन गर्जना करत म्हणाला.

"मी अगदी इतका दुर्बल आहे का? मी तुझा सख्खा भाचा आहे."

"माझा भाचा असशील तर जिवंतपणी कुठलीही कसर सोडू नकोस आणि अशा युक्त्या शोधून काढ की स्वतः देवसुद्धा चकित होऊन म्हणेल की होय हाही कोणीतरी आहे. आणि यातही जर तु यशस्वी होऊ शकत नसलास आणि निष्फळ झालास तरी हसत हसत पुन्हा धूळ झटकून उभे राहा. माझा भाचा असाच आहे.” शकुनीने स्पष्ट केले.

"मग मामा, पांडवांना संपवण्याचा मार्ग तरी शोधा, ना? मी त्याच्यासाठी सर्व काही करायला तयार आहे."

" बघ पांडव त्यांचे राज्य मागतील."

"मी नाही देणार."

"ते तुझ्या वडिलांच्या पाया पडतील."

"मी हार मानणार नाही."

"परंतु भीष्म आणि द्रोण शांतता आणि न्यायाचा सल्ला देतील."

"मी कधीही भीष्म आणि द्रोण विकत घेतले आहेत. त्यांना खरे बोलल्याचे समाधान मिळावे म्हणून मी त्यांना त्यांचे टुमणे लावू देतो बाकी ते आपल्या बाजूने आहेत हे निश्चित आहे.” दुर्योधन म्हणाला.

"माहित आहे म्हणूनच तर ते भांडत नाहीत. ही दोन माणसे सोबत ठेवलीस तर यश आपलेच आहे.” शकुनी म्हणाला.

“हे लोक माझ्या खिशात आहेत.”

"तू निश्चिंत राहा आणि तुझ्या वडिलांनाही धीर दे. आणि या काही दिवसात पांडव काय करतात ते बघूनच आपण पुढचा कार्यक्रम ठरवू." शकुनी म्हणाले.

"ठीक आहे मामा! तुला विचार करावा लागेल. आता फार वाट बघता येणार नाही असं वाटतंय."

"वाट बघायची गरज नाही आणि घाई करायचीही गरज नाही. बघू आता हे लोक काय करतात ते." शकुनी म्हणाला.

बघता बघता रात्र उलटून गेली होती. आजूबाजूच्या शेतातले पक्षी शांत झाले होते. त्या शांततेत कुठेतरी एक घुबड  मध्येच शांतता भंग करत होते. हस्तिनापूरची चांडाळ चौकडी शून्य आकाशात आपले भविष्य पाहून निघून गेली.

समाप्त

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel