“परंतु सुख मानून नको का घ्यायला?”

“मानीव सुखात काय अर्थ? सुखाचा झरा हृदयात निर्माण झाला पाहिजे. कृत्रिमतेत काय अर्थ? खर्‍या सुखाचा अखंड झरा लाभला पाहिजे.”

“मानवी जीवनात हे अशक्य आहे.”

“तर मग हे दु:खच बरे. कृत्रिम सुखापेक्षा, दु:ख पुरवले. खोटेच वरपांगी हसणे, खोटेच आनंदी स्वरूप दाखवणे, ते किती विद्रूप दिसते !”

“तुम्ही कल्याणहून कोठे जाणार?”

“मला नागपूरकडे जायचे आहे.”

“मग चला की आमच्याबरोबर. जळगावला आमच्याकडे राहा एक दिवस. मग जा. तुमच्याविषयी मला आस्था वाटते. काही तरी वाटते.”

“माझे अश्रू पाहून तुम्हाला कीव आली असेल.”

“काही असो. तुमच्याजवळ बोलावे, मनातले सांगावे, असे वाटते. मी कॉलेजमध्ये शिकत होत्ये. पुष्कळ मैत्रिणी होत्या. परंतु आम्ही वरवर हसत असू. मी मनातील सुखदु:ख कधी कुणाजवळ बोलल्ये नाही. तुमच्याजवळ आता किती बोलल्ये ! तुम्हाला आश्चर्य वाटले असेल.”

“माझ्या डोळयांमुळे तुम्हाला विश्वास वाटला असेल.”

“मग येणार ना आमच्याबरोबर?”

“कल्याण स्टेशनवर जर कोणी भेटले नाही तर येईन.”

“कोण येणार आहे?”

“एक मित्र.”

सरला व नलू दोघी मैत्रिणी झाल्या. नलूची आई उठली.

आणि आता घाटातून गाडी जात होती. पावसाळयाचे दिवस. अपार सृष्टिसौंदर्य दिसत होते. कधी कधी खाली खोल दर्‍यांत काहीच दिसत नसे. मेघांचे बुरखे घेऊन त्या दर्‍या उभ्या आहेत असे वाटत होते. दूर मध्येच डोंगर दिसत. जरा मेघपटले विरळ असली की सुंदर प्रवाह डोंगरांतून पडताना दिसत. किती पाहिले तरी तृप्ती होत नव्हती. खिडकीतून पाणी आत येऊ लागले. सर्व लोक खिडक्या लावू लागले. सरला व नली उघडया खिडकीशी तशाच होत्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to रामाचा शेला


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
गावांतल्या गजाली
सापळा
झोंबडी पूल
अजरामर कथा
गांवाकडच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
गोड शेवट
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
खुनाची वेळ
कथा: निर्णय
पैलतीराच्या गोष्टी