बर्‍याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता  त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज  मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे ,  व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी  वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्‍हास  झाल्यामुळे  बर्‍याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही .  पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास  या प्रयोगामुळे  संस्कृत सुभाषिते माहीत होतील  .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता  लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक व भाषा कमनीय, सौष्ठवपूर्ण होईल
         
न धैर्येण विना लक्ष्मीः न शौर्येण विना जयः |
न ज्ञानेन विना मोक्षो न दानेन विना यशः ||

धीराने [प्रयत्न केल्याशिवाय] संपत्ती मिळत नाही. पराक्रमाशिवाय विजय होत नाही. [तत्व] ज्ञान झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. दान केल्याशिवाय कीर्ति मिळत नाही. 

सर्व चरण महत्त्वाचे आहेत तरीही-- न ज्ञानेन विना मोक्षॊ-- जास्त लक्ष देण्यासारखा आहे .मोक्ष याचा अर्थ अध्यात्मिक मोक्ष असा न घेता ध्येय असा घेतला पाहिजे .कोणतेही ध्येय मिळवण्यासाठी त्याला आवश्यक असे ज्ञान मिळविले पाहिजे .गुह्य ज्ञानाशिवाय मोक्ष नाही हे तर उघडच आहे .शौर्य धैर्य ज्ञान दान या सर्व गोष्टी एकमेकांना पूरक आहेत हेही लक्षात  ठेवणे आवश्यक आहे .यापैकी एकच असेल तर अंतिम ध्येय (जय ,लक्ष्मी ,मोक्ष ,कीर्ति )साध्य करणे कठीण जाईल

                स्मरणीय
           न ज्ञानेन विना मोक्षॊ--

२१/८/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com             

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel